Saturday, April 11, 2020

नामपीसा

माझे श्रीसदगुरु श्रीकाकामहाराज (श्री.श्रीपाद अनंत वैद्य) हेही सर्वांना कायम प्रपंचासक्ती सोडून देवपिसा नव्हेतर नामपीसा व्हायला सांगतात.माणूस कितीही धनवान असला ,खिशात लाखभर रुपये असले तरीही तो आनंद क्षणिकच असेल ना? पैसे खर्चून संपले किंवा रस्त्यात हरवले तर पुन्हा दुःख चालू झालेच ना? या सुख व दुःखाच्या फेऱ्यांतून मला कोण बाहेर काढणार आहे ,अशी तळमळ रात्रंदिवस लागली पाहिजे.या प्रपंचासक्तीतून बाहेर कोण काढणार आहे ? त्यांची व माझी गाठ लवकर पडू दे अशी ती ओढ सारखी लागायला हवी मगच ते श्रीसद्गुरू भेटतात.श्री काकामहाराज यावर सुंदर उदाहरण देतात की आपण खुप संकटात आहोत व भिंतीपलीकडे आपली आई बसली आहे तरीही आपण हाक मारल्याशिवाय ती मदतीला येईल का?आई आपल्यासाठी वेळेवर जेवण देईल ,ताट आवरून ठेवेल ,कपडे देईल , पण संकटात तिला आपण ओरडून सांगितल्याशिवाय मदतीला येईल का?
मांजराची पिल्ले तिच्या आसपास उन्हात खेळत असतात ,पण एखादा कुत्रा आसपास आल्यावर जेव्हा ते पिल्लू आकांताने आईला बोलावते ,तेव्हा ती मांजरी धावत जाऊन पिल्लाला तोंडात पकडून सुरक्षित स्थळी आणते.
तसेच श्रीसद्गुरू जगाच्या कोणत्याही ठिकाणावरून तुमचा सर्व चरितार्थ चालवत असतात पण तुमचा उद्धार करण्यासाठी तुम्ही त्यांना हाक मारून बोलवायला हवे ,म्हणजेच ते तुमच्याजवळ येतील व तुम्हाला आपल्या सावलीत घेतील. प्रपंचासक्तीतून नामानंदात यायला ,हा पालट घडायला श्रीसद्गुरूंनी दिलेले नामसाधन शरीराच्या प्रत्येक अणूरेणुतून अंतर्मनातील सद्गुरुस्वरूप दर्शनाच्या ओढीने घ्यायला हवे ,तेव्हाच ती माऊली आपल्याला पंखाखाली घेईल व सद्गुरूमय करून आयुष्य बदलून देईल.
जय साईराम

No comments: