Saturday, April 11, 2020

सदगुरु ,ईश्वर आणि नाम

*सदगुरु ,ईश्वर आणि नाम*

श्रीसद्गुरूंनी एक सुंदर विषय सर्वाना दिलेला आहे.सदगुरु ,ईश्वर व नाम या एकाच नाण्याच्या तीन बाजू कश्या असू शकतील? 

नाणे जर आपण काळजीपूर्वक बघितले तर त्याला दोन बाजू प्रकर्षाने दिसतातच ज्याला आपण छापा व काटा असे म्हणतो पण त्या नाण्याला एक तिसरी बाजू असतेच आणि ती म्हणजे नाण्याला जाडी प्रदान करणारी बाजू.
नाण्याचा पुष्ठभाग ही बाजू मूल्य दर्शवते ती काटा बाजू हे *श्रीसद्गुरू* आहेत ,नाण्याचा मागील भाग छापा बाजू ज्यावर अशोकस्तंभ चिन्ह आहे हे *ईश्वरमय* आहे आणि नाण्याला जाडी देणारी जी बाजू आहे ज्यावर जपमाळेप्रमाणे बिंदू आहेत ती बाजू *नाममय* आहे.
नीट बघितले तर प्रत्येक नाण्याला वैशिष्ट्यपूर्ण जाडी आहे आणि त्यावर काही उठावदार बिंदू आपल्या हाताला जाणवतात, एखादे समजा पाच रुपयांचे नाणे जर हातात घेतले तर त्याची जाडी आणि त्यावरील बिंदू जे हाताला जाणवतात.  दिव्यांग लोकांसाठी ही योजना केलेली असते की हातात नाणे आले की त्यांना काटा म्हणजे मूल्य समजते व नाण्याच्या जाडीवरील बिंदू ओळखून त्या नाण्याची किंमत ओळखता येते. नाण्यांवरील छापा कायम बदलत राहतो ,कधी अशोकस्तंभ वरील 4 सिंह असतील ,कधी शेतकऱ्यांचे चित्र असेल ,कधी ज्ञानेश्वर माऊली असतील तर कधी गांधीजी असतील. जेव्हा नाण्याच्या आवृत्ती येतात तेव्हा हा छापा बदलत जातो म्हणजेच छापा ही बाजू ईश्वर स्वरूप ज्याची अनेक रूपे आहेत, अनेक अवतारात , अनेक रुपात ईश्वरस्वरुप आपल्याला प्रथमदर्शनी वेगळे जाणवते.
जशीजशी नाण्याची किंमत वाढते तसतशी जाडी वाढत जाते ,व्यवहारात व चलनात 10 रुपये ,5 रुपये ,2 रुपये ,1 रुपये ,पन्नास पैसे ,दहा पैसे ही नाणी आहेत. त्याची जाडी किमतीनुसार वाढत जाते. या जाडी असलेल्या बाजूला जर नाम म्हटले तर जसजसे नाम वाढत जाईल ,तसतसे श्रीसदगुरु(काटा बाजू) व ईश्वर(छापा बाजू) हे एकच आहेत हे समजायला लागेल.याआधी आपल्याला श्रीसदगुरु माहीतच नव्हते ,जगनियंता ईश्वर माहिती होता पण जसजसे आपण श्रीसद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिकायला लागलो ,तसतसे आपल्याला या दोन बाजू दिसायला वेगळ्या असून एकच असतात हे समजायला लागले. नंतर तर ईश्वर व सदगुरु हे एकच आहेत नव्हे नव्हे जर दोघेही एकत्र समोर आले तर श्रीसद्गुरू यांना पहिले वंदन करायचे कारण माझ्या अंतरमनाच्याजागी ज्ञानज्योत जागविणारे हे श्रीसद्गुरू आहेत हे मनापासून पटायला लागते. नाम वृद्धिंगत व्हायला लागले की बाह्यमनातील अनेक दोष जायला लागतील आणि तुमचे मूल्य वाढायला लागेल.मूल्य हे आर्थिक बाजूने बघायचे नसून अध्यात्मिक बाजूने बघायला आपण शिकू.तात्पर्य एकच श्रीसद्गुरू व ईश्वर एकच आहेत आणि हे सदोदित मनाला सांगणारे नाम सदोदित बरोबर घ्यायचे आहे. व्यावहारिक जगात आपण कितीही यशस्वी असलो तरीही या अध्यात्मिक जगात आपण दिव्यांग आहोत ,अपंग आहोत. जसे नाण्यांवरील काटा व जाडी त्या व्यक्तीला नाणी ओळखायला मदत करतात तसेच आपण अध्यात्मिक अपंग आहोत व आपण  श्रीसद्गुरू व नाम यांना बरोबर घेऊन वाटचाल करूया. नाण्यांवरील काटा असलेले माझे श्रीसद्गुरू हेच सर्वकाही आहेत व छापा अर्थात अनेक स्वरूपातील ईश्वर माझ्यासाठी गौण आहे आणि या अध्यात्मात प्रगती व्हायला माझी नामाची बाजू म्हणजे नाण्याची जाडी बाजू जास्तीत जास्त बळकट करायला हवी. त्यासाठी या ठोकळ्याला (नाण्याला काहीजण ठोकळा म्हणतात म्हणजे हे तीन बाजू असलेले नाणे म्हणजे मीच आहे) सद्गुरूंनी नामसाधन दिलेच आहे ते त्यांच्याच स्मरणात व मार्गदर्शनात जास्तीस्त जास्त घेत राहूया. 
जय साईराम

No comments: