Tuesday, January 16, 2018

पुनःशस्त्रक्रिया #दिव्यानुभव

#दिव्यानुभव

आज बरोबर एक वर्ष झाले,मागच्या 17 जानेवारीला माझे दुसरे ओपेरेशन झाले.याआधी मी पोस्ट केल्याच आहेत की दोनचाकीवर अपघात झाला व तेव्हा हाताच्या फ्रॅक्चरवर रॉड टाकावा लागला.तेव्हा रिकव्हर झालो व कामावर जॉईन झालो.त्यांनतर 6 महिन्यांनी पुन्हा हातात दुखायला लागले व साधे पेनही उचलण्याची ताकत नव्हती.xray काढल्यावर समजले की आधीच्या रोडचे स्क्रू बाहेर आलेत व पुन्हा ऑपरेशन करावेच लागेल.आधीच सुट्ट्या झाल्याने आर्थिक स्थिती नाजूक त्यात पुन्हा ऑपरेशन व रिकव्हरी रेस्ट परवाडणारी नव्हती तरीही आवश्यक कारण डॉ म्हंटले जास्त उशीर केला तर ते स्क्रू त्वचेतून बाहेर येऊ शकतात व परमनंट अपंगत्व येऊ शकते. उजवा हात असल्याने अजून टेन्शन. त्याचदरम्यान मला विचित्र स्वप्न पडू लागली की ऑपरेशन चालू असताना माझी शुद्ध हरपली व मेंदूला ऑक्सिजन कमी पडल्याने मी कोमात जातोय etc etc.
खूप घाबरलो ,आता फक्त स्वामी आधार होते व त्याच दरम्यान आपले समूह सदस्य सचिन यांच्याशी मेसेंजरवर बोलणे झाले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे हनुमान वडवानल स्तोत्र वाचायला लागलो.16 जाने.ला ऍडमिट झालो व मी व बायको एकमेकांना धीर देतोय. स्वामीकृपेने जेव्हा मेडिक्लेम पॉलिसी दाखवली हॉस्पिटल ला , तेव्हा त्यांनी मेडिक्लेमसाठी अर्ज केला. मला वाटत होते की माझी पॉलिसीवर 1 लाखाची मर्यादा आहे कारण याआधीच्या सर्व बोलण्यात एक लाख शब्द वापरलेला ,पण हॉस्पिटल मेडिक्लेम टीमने  त्यांच्या कम्प्युटर डेटानुसार माझी पॉलिसी मर्यादा 10 लाख आहे असे सांगितले (स्वामींनी एक शून्य वाढवले बहुतेक) व सर्व रिपोर्ट्स त्यांना पाठवल्यावर  आधीच 4 लाखपर्यंत मंजूर झाले व अजून काही कोम्प्लेक्सिटी आली तर वाढवून मिळेल असे लेटर होते.आता पैश्याचे काही टेन्शन नव्हते.व डीलक्स रूम मिळाल्याने जास्त टेन्शन नव्हते.
ऍडमिट झालो तर डॉ म्हणाले काही चाचण्या करून त्याच्या रिपोर्टनुसार ऑपरेशन डेट ठरवू. लगेच ब्लड,युरिन सॅम्पल घेतले.xray व इतर चाचण्या पुन्हा केल्या व संध्याकाळी आम्ही निवांत होतो. रात्रौ 9 वाजता नर्स म्हणाली ,आता पेशंटने काहीच खायचे नाही ,पाणी प्यायचे नाही सकाळी 7 ला ऑपरेशन आहे,सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत.
आम्ही अचंबित आणि टेन्शन मध्ये ,मी तर रात्रीच जप चालू केला व वडवानल स्तोत्र पाठ चालू केले.सकाळ झाली ,8 वाजले तरी कोणी येईना म्हणून विचारले तर सकाळची 3 ऑपरेशन उशिरा चालू झाली त्यामुळे माझे साधारण 10 ला होईल ,10 चे 11,12,1 झाला व 1 वाजता मला घेऊन गेले. प्रिपेर्शन रूम मध्ये पुन्हा पाऊण तास गेला व नंतर ऑपरेशन थिएटरला नेले तर तेथील मावशींनी रिपोटचा चुकीचा वापर केला आणि टेबल तिरक्या दिशेने लॉक झाले. माझ्या भुलीची सर्वच तयारी झाली होती. पुन्हा मला प्रिप्रेशन रूमला आणले,20 मिनिटांनी पुन्हा थिएटर ,या सगळ्या वेळेत खूप टेन्शन आले ,मनातल्या मनात जप चालूच होता व एकदाची मला भूल दिली.ऑपरेशन झाले व 8 तासांनी शुद्धीवर आलो,डॉ पण भेटून गेले व दुसया दिवशी जे काही समजले ते हादरावणारे होते व स्वामीकृपा अनुभवायला मिळाली. मनोमन स्वामींचे आभार मानले.
डॉ च्या मते ,माझ्या हाताच्या नसा ,शिरा मॅच होणे खूप महत्वाचे होते व ते नसते झाले तर अपंगत्व येऊ शकले असते ,त्यांच्यामते दुसऱ्या शस्त्रक्रियेत हा धोका जास्त असतो. माझा हात ,बोटे आता छान मूव्ह होत होता.
आधीचा रॉड काढण्यात खूप प्रॉब्लेम आलेले व डॉ ना टेन्शन की माझी भूल नको उतरायला,
3 तासाचे ओपेरेशन साडेपाच तास चालले म्हणून घरचे टेन्शन मध्ये होते,
ऑपरेशन संपल्यावर अचानक सर्वची धावपळ झाली कारण माझा श्वास अपुरा पडत होता व ऑक्सिजन लावावा लागला.
शस्त्रक्रियेदरम्यान माझे बीपी व शुगर एकदम वाढली होती त्यामुळे 2 वेळ भूल डोस बदलून द्यावा लागला.
शस्त्रक्रियेदरम्यान जुन्या रॉडचे स्क्रू निघत नव्हते ,स्लिप झाल्याने व रक्तस्राव खूप झाला ,5 बाटल्या रक्त द्यावे लागले.
सर्वांच्या मते खूपच क्रिटिकल ऑपरेशन पार पडले व डॉ म्हणाले माझ्या 10 वर्षातील एक चॅलेंजिग ऑपरेशन होते.
थोडक्यात स्वामी कृपा व हनुमान वडवानल स्तोत्र प्रभावाने मी यातून सहीसलामत बचावलो होतो व आता हात व्यवस्थित असून नित्य कामे करताना काहीही त्रास होत नाही.
श्री स्वामी समर्थ,ओम् श्री साईनाथाय नमः
-- निलेश जोशी

शंकर महाराज दर्शन

श्री. शंकर महाराज यांनी फोटोतून दिलेले दर्शन.

श्री. शंकर महाराज पुण्यात एका घरी फोटोतून दर्शन देतात असे एकांकडून कळले. म्हणून मी, आई आणि बाबा पुण्यात श्री. धनंजय बापट यांच्या घरी गेलो.

रात्री ८ च्या सुमारास आम्ही त्यांच्याघरी गेलो. त्यांच्या घरी श्री. शंकर महाराजांची एक तसबीर आहे. त्या फोटोच्या डाव्या बाजूला श्री. स्वामी समर्थांचा एक फोटो आहे. तर श्री शंकर महाराजांच्या फोटोच्या उजव्या बाजूला ज्ञानेश्वर माउलींचा एक फोटो आहे.

खोलीतील दिवे बंद झाल्यानंतर फक्त श्री. शंकर महाराजांच्याच फोटोतून प्रकाश येतो. ह्या प्रकाशाचा रंग पांढरा होता. त्यावेळी बाकी कुठलाही फोटो दिसत नाही. महाराजांकडे एकटक बघताना महाराजांच्या डोळ्यांची बुब्बुळे हालताना दिसतात. तर त्यांच्या फोटोतला प्रकाश फिरताना दिसतो. फोटोखाली एक लाल रंगाचे मऊ कापड आहे. त्या कापडावर ॐ अक्षर उमटलेले दिसले. महाराजांना जे केशरी अष्टगंध लावलेले होते ते, दिवे बंद झाल्यानंतर रक्तासारखे लाल झालेले दिसले.

महाराजांच्या फोटोला एक हार घातलेला होता. तो हार दिवे बंद झाल्यावर बाजूला केला असता, त्या हाराची सावली फोटोवर जशीच्या तशी उमटलेली दिसली.

हा अनुभव मलाच नाही तर खोलीत उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना आला.

महाराजांच्या फोटोतून ३०,००० watt ऊर्जा प्रक्षेपित होते, असे एका शास्त्रज्ञाने सिद्ध केले आहे.

हे दर्शन सर्वांसाठी खुले असते.

आपल्याला दर्शनाचा लाभ घायचा असल्यास पुढील पत्त्यावर जावे.

श्री. धनंजय बापट
दुसरा मजला, भारत भवन बिल्डिंग,
बाजीराव रोड मार्ग,
सरस्वती शाळेच्या मागे,
पुणे.

संध्याकाळी ७.०० ते ७.३० प्रार्थना असते. प्रार्थना झाल्यानंतर थोडया वेळाने खोलीतील दिवे बंद केले जातात. आणि मग महाराज फोटोतून दर्शन देतात.

Sunday, January 14, 2018

यशाचे रहस्य #निलउवाच

यश म्हणजे काय? प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी. काहींसाठी पैसा हा मापदंड तर काहींसाठी समाजात मानसन्मान महत्वाचा.
याशिवाय जोडलेली मित्रमंडळी आणि भरपूर कर्तृत्व म्हणजे यश.त्याबरोबरच
व्यक्तिगत व व्यावसायिक संदर्भात यशाच्या संदर्भातील धारणा म्हणजे काहीच्या मते अधिकाधिक उद्दिष्टपूर्ती साध्य करणे. कुणाच्या मते व्यक्ती वा व्यावसायिक संदर्भात ध्येयाकडे यशस्वी वाटचाल करणे म्हणजे यश व काहीच्या मते व्यक्तीचे आपल्या आयुष्यात इतरांना आपापल्यापरी व यथासंभव मदत करणे म्हणजे यश.
यावरूनच ‘यशा’चे वेगवेगळय़ा संदर्भात अर्थ स्पष्ट होतात.
असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक स्त्री असते , 80% हे वाक्य खरेही आहे कारण एका व्यक्तीला,पुरुषाला घडवण्यात त्याची आजी,आई ,बायको ,बहीण सर्वांचा हातभार असतोच .पण त्याचबरोबर या स्त्रीशक्तीसोबत अनेक पुरुष सुद्धा त्यांचे योगदान देत असतात जसे आजोबा,वडील,भाऊ,शिक्षक,मित्र व अनेक आजूबाजूचे लोक.
या सर्वांच्या मदतीने किंवा सहभागाने खरं तर माणूस अनुभवाने मोठा होतो,समृद्ध होतो आणि हाच अनुभवांचा ठेवा त्याची वाटचाल यशस्वीतेकडे करतो.
काल एक हिंदी वाक्य वाचले व त्यावरून वरील सर्व सुचले,ते वाक्य होते, "वोह धागा ही था जिसने छिपकर पुरा जीवन मोतियों को दिया और ये मोती अपने तारीफ पर इतरते रहे उम्रभर"

किती वास्तववादी आहे ना हे वाक्य, मोठे मोठ्या व्यक्ती जसे पु.ल.देशपांडे,अब्दुल कलाम ,नारायण मूर्ती ,सावरकर ,टिळक,आंबेडकर,ज्योतिबा फुले,विवेकानंद,गांधीजी हे सर्व म्हणजे त्यांच्या क्षेत्रात कर्तृत्वाने मोतीच आहेत पण त्यांच्या मोत्याच्या झळालीला एकत्र गुंफून ठेवले त्या मागील अनेक व्यक्तींनी ,विशेष करून महिलांनी.
"आहे मनोहर तरी" सारखे पुस्तक वाचले की हे विशेष जाणवते. शेवटी या धाग्याचे महत्वाचे काम करणाऱ्या असंख्य व्यक्तिमत्वांना ना विसरता त्यांनाही मोतीच्या माळेने महत्व नको का द्यायला? कारण स्पष्ट आहे जेव्हा हा धागा तुटेल तेव्हा मोती विखुरले जातील आणि क्षणात मातीमोल होतील. आपल्याही आयुष्यात अशी धाग्याची माणसे आहेतच ,त्यांचे महत्व लक्षात घेऊन त्यांनाही आपण  आपल्या आयुष्यात सर्वोत्तम मान देऊया, कृतज्ञता व्यक्त करूया व नेहमी या धाग्यांचे महत्व लक्षात ठेवूनच वागूया. काय पटतंय ना?
-- निलेश जोशी

Monday, January 8, 2018

बोल बच्चन #निलउवाच

बोल बच्चन #निलूउवाच

किती बडबड चालली आहे रे ,जरा गप्प राहा की ,नुसती टकळी चालू ,नशीब त्या देवाने ते तोंड चामड्याचे बनवले ,मातीचे बनवले असते तर आतापर्यंत फुटून गेले असते -- थोरामोठ्यांचे उद्गार

असे उद्गार ऐकत मोठे झालो आपण ,हमखास आयुष्यात हा संवाद ऐकला नाही याला अपवाद फार कमी असतील ,जे इतर अपवादात्मक असतील जे अपंग किंवा दिव्यांग श्रेणीतील .
पण खरंच नीट बघितले तर किती बोलतो आपण दिवसभरात ,महिन्याभरात ,वर्षभरात . हे सिद्ध झालेय की 70% बडबड ही अनावश्यकच असते आणि उरलेल्या 30% बडबडीला 10% मध्ये संपवू शकतो पण तरीही आपण बोलतो .
संवाद साधणे आणि त्यासाठी बोलणे हे आवश्यकच पण किती बोलणे हे आपल्या हातात आहे की नाही?
मला तर अशीच वाईट खोड होती की कोणी काही विचारले तर त्याचे उत्तर सविस्तर द्यायचे म्हणजे त्याचा इतिहास ,मला कसा समजला , माझे मत ,इतरांचे मत आणि मग एकदम शेवटी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर , पण यात वेळ वाया गेलाच बरोबर समोरचा माणूस वैतागून जाण्याचा धोका अधिक. पण नंतर समजायला लागले की सगळे थोडक्यात व सुटसुटीत पाहिजे तेवढीच माहिती देता येतेच आणि त्यासाठी पाल्हाळ लावायची काहीच गरज नसते .
8-9 वर्षांपूर्वी मंगेश पाडगावकर यांची मुलाखत ऐकली मालाड वाचनालयात. पाडगावकर महणजे बडबडगीते व बोलगीतांचा बादशाह. तसे मराठी साहित्यात पाडगावकर, विंदा ,गदिमा ,शांताबाई यांची बडबडगीते खूप प्रसिद्ध आहेत पण मंगेश जी त्या मुलाखतवजा कार्यक्रमात म्हणाले "बडबडगीते म्हणजे काय? तर मुलांचा चाळा ,त्यांना नवीन बोलायला आलेले असते मग बडबड करत राहायची ,त्या सवयीत गीते लिहिली म्हणण्यासाठी तर झाली बडबडगीते .बोबड्या बोलतील गाणी म्हणूया हवे तर....
बडबडमध्ये बड शब्द दोनवेळा आला ज्याला स्वतंत्र अर्थ काहीच नाही पण मग जेव्हा बड शब्द 2वेळा येतो तेव्हा तो निरर्थक शब्दही अर्थशील होऊन जातो".किती सुंदर विचार ना ?
असे हे बडबडणे आणि अशी माझी बडबड , अरे हो सांगायलाच विसरलो ,हे सगळे सुचले कशावरून तर खाली आलेल्या वाक्यावरून ,आहे इंग्रजीत पण एकदम अर्थपूर्ण

Speak only when your words are more beautiful than the Silence
जेव्हा शब्द हे शांततेपेक्षा सुंदर असतील तेव्हाच बोला

थोडक्यात काय
बडबड टाळा ,मौन पाळा
बडबडीला लावा टाळा
शांतता हीच सुंदरता माना
अनावश्यक बोलणे टाळा

-- निलेश जोशी

Sunday, January 7, 2018

असेच एक अफलातून परीक्षण

परिक्षण #निलउवाच

जाहिरात बनवणे आणि त्या लोकांना सतत दाखवून प्रॉडक्ट्स गळी उतरवणे ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ,पण त्याचा आजकाल अतिरेक होताना दिसतोय .
काही जाहिराती अश्या असतात की त्या पाहिल्या की लगेच तोंडातून "वाह" शब्द बाहेर पडतो पण काहींची खूपच कीव येते . कालच नवीन ऍड बघितली जे सर्दीवरील रब औषध बनवणारी फेमस कंपनी , तर त्यांनी म्हणे लहान मुलांसाठी बेबी नाव असलेले रब बनवलेय ज्यात मुलांना इजा होणार नाही असे ऍलोवेरा ,खोबरेल तेल घटक वापरून बनवलेय ,इथपर्यंत खूपच छान वाटते जाहिरात व मनात भिडतेही ,आपल्यालाही त्या इनोव्हेशन चे कौतुकही वाटते . कारण सर्दी ,खोकला,ताप असतो स्पेशली लहान मुलांना तेव्हा त्यांना व मोठयाना किती त्रास होतो आपल्याला माहिती आहे.
जाहिरातीतील बाळ रब लावल्यावर शांत झोपते ,आई पण खुश वाटते ,मला वाटले जाहिरात संपली ,पण नाही ,रब च्या म्युसिक पीसला बाळ झोपलंय व मागे त्याचे आईबाबा नाचत आहेत असे दृश्य ,
खरोखर कीव आली ,आधीच्या 50 सेकंदात जो इम्पॅक्ट आलेला तो त्या 5 सेकंदात निघून गेला ,अरे नॉर्मल आयुष्य असे नसते यार ,आईबाबा मनातून खुश होतील पण ते दाखवायला नाच नाही करणार . खूप हसलो त्या जाहिरातीवर आणि मनातल्या मनात हसलोही.


अशीच एक दुसरी जाहिरात ज्यात कन्टिन्यूटी ची कमतरता आहे.आपण चित्रपटात कन्टीन्यूटी शोधतो तसच जर जाहिरातीत पण शोधायची ठरवली तर खुप त्रुटी मिळतील

उदा* एका प्रसिद्ध डिटर्जेंट कंपनीची जाहिरात,
आजोबा (रमेश देव) नातवाला सांगताहेत आम्ही लवकर परत येवू
नातू हिरमुसलेला तेवढ्यात त्याला ऐकू येते आजोबा बूट शोधत आहेत
नातू पळत पळत जाउन बूट शोधतो
बुटाना पॉलिश नसल्याचे लक्षात येताच स्वतः पॉलिश करतो अर्थातच पूर्ण पांढरा टी शर्ट व पैंट पॉलिशने काळी झालेली
आजोबा तारीफ करतात तर आजी कौतुकाने सुनेला म्हणते तुझ्या हातांचे काम वाढले
सुन अर्थात मुलाची आई म्हणते टीशर्ट वरील डाग काढणे सोप्पे आहे (अशी कौतुक करणारी आई फ़क्त जाहिरातीच दिसते खरी मिळणे दुरापास्तच)

नेक्स्ट 4 सेकन्द ग्राफिक्स च्या माध्यमातुन डिटर्जेंटचे कौतुक (दहा हातांची शक्ती वगैरे)

पुढील फ्रेम मध्ये आजोबा आजी आई मुलगा बाबा घराबाहेर
बाबा गाडीत बॅग चढवण्याचा प्रयत्न करताहेत
मुलगा म्हणतो बाबाना पण हवी दहा हातांची शक्ती
हे म्हणताना त्याचा टी शर्ट एकदम पांढरा सफेद पैंट पण स्वच्छ
म्हणजे आईने दहा हातांची शक्ती वापरली
शर्ट पैंट धुतली वाळवली
आजोबा आजी 5-6 थांबले व सर्व नीट झाल्यावर प्रवास चालु करणार

धन्य ती जाहिरात व धन्य ते कंट्यूयूटी पाळणारे दिग्दर्शक

(हा एक विनोद म्हणून घ्यावा ,त्या मुलाकडे तसेच 2  शर्ट पैंट होते अश्या कॉमेंट करू नयेत हाहाहाहा)

---निलेश जोशी

Saturday, January 6, 2018

आयुष्य #निलउवाच

🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

आयुष्यावर बोलू काही ....#निलउवाच

आयुष्य म्हणजे काय ? कोणी म्हणेल प्रवास ,कोणी म्हणेल संघर्ष ,कोणी म्हणेल सुंदर पण खडतर वाटचाल तर कोणी म्हणेल अनुभव देणारा शिक्षक , गुप्तेच्या भाषेत आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे.

माझ्या मते दोन श्वासामधील अंतर म्हणजे आयुष्य ,हे दोन श्वास कोणते ? आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर घेतलेला पहिला श्वास ते मरण्यापुर्वी घेतलेला शेवटचा श्वास .
मधले सर्व अंतर म्हणजेच आयुष्य .
या अंतरातील प्रवासात काय नाही मिळत आपल्याला ? प्रेम ,माया ,ईर्षा ,उमेद ,अडचणी ,त्यावर केलेली मात ,त्यामुळे आलेला आत्मविश्वास ,कधी भीती ,कधी शहारा ,कधी रोमांच तर कधी आलेला सेटबॅक.
हे सर्व म्हणजेच आयुष्य आणि जसे जेवताना पंचरसयुक्त जेवण नसेल तर मजा येत नाही तसेच हे सर्व नसेल तर आयुष्य रुटीन होत जाईल व बेचव वाटायला लागेल.
या सर्व प्रवासात संकटे येणारच आणि अशा वेळी आपलीच माणसे ,मित्र ,नातेवाईक आपल्यामागे खंबीर उभे राहतात ,धीर देतात ,आपल्याला धीट बनवतात.
आयुष्य म्हणजे एक रंगमंच ,एक कॅनव्हास ,त्यावर कलाकृती सादर करायची पूर्ण मुभा ,त्यावर आपण कसे चित्र रेखाटतो व सादर करतो हेच तर आयुष्य ..
काही कॅनव्हास ब्लॅक राहतात तर काही रंगानी उजळून निघतात आणि अशीच आयुष्य मग स्मरणात राहतात पिढ्यांन पिढ्या त्यांचा वारसा चालत राहतो ,अविरत झिरपत जातो पुढील अनेक जन्मामध्ये पिढीजात वारशासारखा.
सद्गुरू वामनराव पै म्हणतात तसे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ,ते शिल्प घडवायला तुला अवसर दिलाय देवाने आणि त्यातून जे अद्भुत शिल्प म्हणजे आपले आयुष्य साकारेल तेही तुमची मेहनत आणि त्याला मिळालेली देवाची साथ असेल .
वरून खुप साधा पण गहन असा हा विषय म्हणजे आयुष्य.
मला आयुष्याबद्दल काय वाटते ,ते म्हणजे मला सुचलेले पुढील चार विचार

भूतकाळात पहा आणि त्यातून अनुभव (Experience)घ्या.
भविष्यात पहा आणि आशा(Hope)वृद्धिंगत करा.
वर्तमानात पहा आणि वास्तव (Reality)काय आहे ते बघा.
स्वतःमध्ये शोध घ्या आणि आत्मविश्वास (Confidence) शोधा.

लहानपणी झोक्यावर बसायचो ,त्यासमोर तुळईवरील लाकडावर एक वाक्य लिहिलेले होते ,
"हे ही दिवस जातील " म्हणजेच आज जर दुःखात असशील तर हेही दिवस जातील आणि सुख येईल ,अर्थात त्याच्याच उलट आता सुखात असाल तरीही हेही दिवस जातीलच ,म्हणजेच अनित्य आयुष्याचा एक भाग आहोत आपण आणि या सर्वासाठी मनाची तयारी करून सुंदर जीवन व्यतीत करणे म्हणजेच आयुष्य ,बरोबर ना?

-- निलेश जोशी
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

Friday, January 5, 2018

जातीचा पिंजरा #निलउवाच

नमस्कार

कालचाच नाते विषय संदर्भात अजुन काही

2 दिवसांपूर्वी महाराष्ट्रात जी काही परिस्थिति होती त्याने खूपच बैचेनी वाढली.त्यात ज्यांना मारामारीची झळ सोसावी लागली त्यातला कोणीच नात्यांचा नव्हता पण माणूस म्हणून माणसाशी जे नाते आहे त्या माणुसकीच्या बंधाने तर आपण नक्कीच बांधलो गेलोय यात कुणाचेच दुमत नसेल. ज्यांनी स्वतःमधील माणुसकी जिवंत ठेवली आहे त्यांना नक्कीच या दोन दिवसात त्रास झाला . आपण रोज जगतानाही कोणाला साधे लागले,खरचटलं तरीही आपल्याला वाईट वाटते इकडे तर जीव जाईपर्यंत मारणे असो किंवा गाड्याची तोडफोड असो . यात नुकसान सामान्य व्यक्तीचेच झालेय व सार्वजनिक मालमत्तेचे जास्त नुकसान झाले ज्यात सामान्य माणसाने भरलेला कर बरबाद झाला. एक मुलाचा व्हिडीओ बऱ्याच लोकांनी बघितलेला असेल जो व्हायरल झालेला ज्यात जेमतेम 10 वर्षाचा मुलगा हातात दगड घेऊन जातोय व जेव्हा त्याला विचारले की दगड कशासाठी तर त्यांना मारायला ज्यांनी आपल्यावर हल्ला केला . खरंच एवढे ज्ञान त्याचे स्वतःचे असेल की त्याला भडकवलेले ,भरवलेले होते?
    उन्माद आणि उत्साह , भडकणे व भडकवणे यातील सीमारेषा खूपच धूसर आहे पण ज्याला ही सीमारेषा समजली ती व्यक्ती समंजस झाली असे आपण म्हणू शकतो . जन्माला माणूस येतो ते तेच सर्व शरीर घेऊन जे इतरांकडेही आहे पण जेव्हा त्याला जातीचे लेबल लागते आणि सगळं घोळ होतो . जीवनावश्यक गोष्टींना जातीचे लेबल लावून विकतो का आपण? ओपेरेशन करणारा डॉक्टर ,मदतनीस नर्स,फायर ब्रिगेडचा माणूस ,रक्तदाता यांची जर जात बघत नसू तर हे लेबल निव्वळ लोकांना भडकवण्यासाठी छापलेला बिल्ला आहे , फक्त नामनिधान , त्यातून ठोस फायदा काहीच नाही.
याउलट देवाने दिलेल्या शरीराचा समाजाला कसा उपयोग होईल असे जगलो तर अनेक जन्म त्या व्यक्तीला लक्षात ठेवतातच . बाबा आमटे याचे सर्वात योग्य उदाहरण म्हणावे लागेल .

ईश्वराने निर्मिताना भेदभाव नाही केला
धरतीने पालन पोषण करताना भेद नाही केला
वृक्षाने प्राणवायूचा पुरवठा सर्वाना एकच केला
नदीने ने पाणी देताना कोण कुठला ना पाहिला

पंचमहाभूताठायी मनुष्य एक समान असता
मनुष्यानेच जातीपातीचा घोळ तयार केला
आरक्षण ,पक्षातूनी स्वतःच गट तयार केला
अमर्याद निसर्ग नाकारून छोटा पिंजरा मान्य केला

सगळ्यांचा आदर करा तुमचा आदर नक्कीच केला जाईल....!!!!!

--- निलेश जोशी (बाबा निलेशानंद)

Thursday, January 4, 2018

नाते #निलउवाच

नमस्कार

आजपासून मनाला जो आवडेल तो विषय घेऊन लिहिणार आहे ,
हा झुक्या नेहमी सांगतोय write something ,तेव्हा म्हटलं एवढ्या श्रीमंत माणसाला नाराज नको करायला, नाही का?

आजचा विषय काय बरं घ्यायचा?
नाते

ना "हे" ना "ते" तरीही
आपलेच असते ते नाते
कितीही आपण चुकलो तरीही
सदैव साथ निभावते ते नाते

नाते म्हंटले आपण कोणाचा कोण ,नातेवाईक कसा वगैरे आठवायला लागतो ,पण माणसाचा पुर्वइतिहास लक्षात घेतला तर प्रत्येक भेटणारा माणूस आपला नातलग आहेच.
नाते शब्दाची उत्पत्ती झाली असेल समोरचा माणूस माझा कोण लागतो हे सांगायलाच, मग आई,बाबा,भाऊ ,बहीण ,काका ,मामा ,आजोबा ,
आजी,चुलत,मामे,आते etc etc नाती जन्माला आली . म्हणजेच माणूस खऱ्या अर्थाने सोशल झाला म्हणून नाती जन्माला आली ,बरोबर ना?
नवीन नाती नवीन काळानुसार वृद्धिंगत होताहेत जसे शेजारी ,मित्र ,फेसबुक फ्रेंड ,व्हाट्सअप ग्रुप मेम्बर ,मेंटर ,गाईड ,फिलॉसॉफर आणि बरेच काही . हम दो हमारा एक यामुळे काही नाती काळाच्या ओघात नाहीशीही होत आहेत. कालाय तस्मै नमः

खरं तर शब्दबद्ध करता येत नाही ते म्हणजे नातं असतं..
"नातं" एकाचं कधीच नसतं ,ते दोघांमधले बंध असते.
" नातं " म्हणजे विश्वासाचं द्योतक
नातं म्हणजे प्रेमाचं स्त्रोत असतं
नातं तुझं नसतं ,नातं माझं नसतं नातं आपलं असतं !!,
ज्यावेळी " माझं " "तुझ्या"वर विसम्बनं येतं,
त्यावेळी खरं तर नाते जन्माला येतं.

-- निलेश जोशी