सीमेवरील सैनिकांनी आता बळी होऊ नये
शस्त्र हातात असूनही अगतिक होऊ नये
माणसांतील राक्षसांनी मांडला उच्छाद हा
देवाने आता शंभर अपराधांची वाट बघू नये
माणसे जगतात जर का दहशतीखाली इथे
त्या तगमगीला चुकूनही कमी लेखू नये
अतिपाण्यात वाहून जातात अनेक संसार इथे
दुष्काळी संसारानी पाण्याअभावी दम तोडू नये
चप्पल चोरली तर पाप गेले ही समजूत आहे
चुकीचे वागणाऱ्या चोराला पुण्यदाता ठरवू नये
मीपणा जोपासत अहं विकसित करतात काही
त्यांनी स्मशानराखेतून शिकायची संधी सोडू नये
बोट करून तोच चुकीचा नित्य म्हणत आलोय
स्वयं बदल घडवून आणण्या मुळी लाजू नये
तर्जनी दाखवून तो चुकतो म्हणणे सोपे असेलही
तर्जनी सोडून तीन बोटे माझ्याकडे हे विसरू नये
-- निलेश जोशी