#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान
#कोकण_संस्कृती #नवे_करणे
भाताचं नवे करायची परंपरा !!
(ही संपूर्ण पोस्ट Vinayak Bhagwat यांची असून भारतीय संस्कृती व विज्ञान या सदरात पुन्हा देत आहे)
कोकणात साधारण नवरात्रोत्सवाच्या आसपास भातशेतीत भाताची केसरं तयार होतात. शेतात कष्ट करून पिकवलेल हे धान्य असच वाटेल तेव्हा खाण्यास सुरु करत नाहीत तर ते सुद्धा पारंपरिक पद्धतीने सोहळा करून ग्रहण करण्यास सुरुवात करतात. यालाच 'नवे करणे' म्हणतात. हे नवं करण्याचे दिवसही घरा घरातुन ठरलेले असतात. काही ठिकाणी बसता घट म्हणजे घटस्थापनेला करतात काही ठिकाणी उठता घट म्हणजे दसऱ्याला (किंवा नवमीला) करतात. बहुतांशी नवान्न पौर्णिमेला करतात. नवान्न पोर्णिमा म्हणजे कोजागिरी पोर्णिमा. काही ठिकाणी चंपाषष्ठी ला नवं करतात, कारण तोपर्यंत भात शेती पूर्णपणे तयार झालेलीे असते.
भात कापणीला आल्यावर सुरुवात करण्यापूर्वी पहीले पाच आवे कापून घरी आणायचे, ते केळीच्या पानावर ठेवून त्यांची केसरं काढायची (लोंब्या). त्याची पूजा करून हळदीकुंकू वाहून हे नवीन धान्य प्रथम देवाला वाहतात. मग या लोंब्या व याच शेतात उगवलेली रानफुले व मांगल्याच प्रतीक असणाऱ्या आंब्याची पाने एकत्र बांधून ते देव्हारा, धान्य ठेवण्याची कणगी, कोठीची जागा, इतकच काय पण ताक करायचा खुंटा व शिंके, हे धान्य (भात) मिळवण्यासाठी जे जे वापरलं तिथे म्हणजे नांगर जु वगैरे, पूर्वी धान्य कांडण्यासाठी मुसळ वापरीत म्हणून त्याला, भात भरडायची घिरट, जाते, घडवंची ई. ठिकाणी बांधतात. काही लोंब्या हातांत सोलून किंवा पाटावर एखाद्या नळीने भरडून तांदूळ बाहेर काढायचे त्या ताज्या तांदळाची (बाकीच्या तांदळात घालून) खीर व भात करायचा त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आधी ज्यांच्यामुळे हे उत्पादित झाले त्या गायी गुरांना, जोताच्या बैल/ रेड्याना घास (नैवेद्य) द्यायचा आणि मग सहभोजन करायचे. नवे दाणे थोडेच असले तरी मग संपूर्ण जेवणच नवं होऊन जातं ही परंपरेची किमया.
काही लोंब्या, रानफुल व आंब्याची पानं बांधून "तोरण" करून मुख्य दरवाजावर बांधलं जातं. हे दारात दिसलं की कळतं या घरात नवं करून झालयं. कारण काही जुनी माणसं अजूनही ज्या घरात नवं केलं नाही त्या घरात जेवत नाहीत, देवाला आणि ज्यापासून हे मिळालं त्या वस्तुंना अर्पण केल्याशिवाय आपण खायचं नाही हा नियम. आता हे कमी होत चाललंय.. फार कशाला माझी पण नजर या काळात दारावर नवं बांधलंय का हे बघतेच. हे तोरण खूप दिवस दरवाज्यावर टिकाव त्यातील भाताचे गोटे पडून जाऊ नये म्हणून ते बांबूच्या काठीत बांधूनही दारावर अडकवतात, आणि अशी दारं हे घर शेतकऱ्यांचं आहे, तुमच्या अन्नदात्याच आहे हे सांगत मानानं मिरवत उभी राहतात. कृतज्ञतेचा खरा अर्थ जाणून तो कृतीत उतरवणारी अशी ही आपली संस्कृती एकदा जाणून घेतली मग टाकावी म्हटली तरी टाकवत नाही.
हे 'नवं' एवढ्या श्रद्धेने केलं जातं की ज्याची शेती नाही त्याला गावातील इतर शेतकरी या भाताच्या लोंब्या व रानफुल नेऊन देतो. आधी देवाला ठेवल्या शिवाय आणि ज्यामुळे आपल्याला हे मिळालं त्या औजाराना, जोताच्या बैल रेड्यांना अर्पण केल्याशिवाय आपण खायचं नाही ही त्यामागील भावना.. अशी ही आपली संस्कृती. घरात ठिकठिकाणी बांधण्यामागेही घरीदारी धान्य भरून राहावे हीच भावना. अधिक काय लिहिणे..
©विनायक भागवत