“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या महामंत्राचे माहात्म्य
(परमपूजनीय ब्रह्मर्षी दत्तमहाराज कवीश्वर यांच्या प्रवचनातून)
ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं | द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् |
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् | भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरूं तं नमामि ||
दिगंबराची धून चालू असताना तन्मय अवस्था प्राप्त होणे ही ईश्वराची मोठी कृपा आहे. ‘मदभक्ता: यत्र गायंती तंत्र तिष्ठामि नारद’ असे भगवंत नारदाला म्हणतात. तेंव्हा जिथे असं ईश्वराचे भजन, गायन चालू असते त्या ठिकाणी ईश्वराचा निवास असतो.
या महामंत्राचा अर्थ विशद करण्याकरिता सदगुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी एक आरती केली आहे. त्या आरतीचा विचार आज यथामती थोडासा करावयाचा आहे. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हे शब्द मूळ संस्कृत असल्याने मंत्ररूप आहेत. मराठी आणि संस्कृतमधे शब्दांचा उच्चार सारखाच होतो. ती मूळ आरती इथे देत आहे,
दिगंबरा! दिगंबरा! श्रीपाद वल्लभ दिगंबरा |
आरती हे तव चरणी राहो नति तति गुरुवरा ||धृ||
दिग्भिर-वेष्टित अंबरं एव प्रत्यग-ब्रम्हेति |
खं-ब्रह्मेती श्रुतिर अपि वदती दिगंबराच इति ||१||
दिग्वत च अंबरं एव व्यापक पूर्ण ब्रह्मेति |
सच्चितसुख धनम आयातीतं दिगंबरा वदति ||२||
श्रीपादवल्लभ नाम प्रापहि नक्रगजेंद्रम इव |
द्रौपद्यंबरीषचारे ग्रसित द्विजमेव ||३||
दिगंबरा गुरु वासुदेव दत्त सत्वं ब्रह्म |
काम क्रोध ग्रसितं माम लभ सदैव झटितिवह ||४||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
वेदांत शास्त्राप्रमाणे दृकतत्व आणि दृश्यतत्व असे दोनच पदार्थ जगात दाखवलेले आहेत. ज्ञात होणारे, प्रकाशित होणारे असे एक दृश्यतत्व आहे आणि दुसरे दृक-परमात्म तत्व आहे. बहिर्मुखी चित्तवृत्ती ज्या वेळेला असते (तशी ती सर्वदाच असते, तसा स्वभावच आहे चित्ताचा, इंद्रियांचा) त्या वेळेला (म्हणजे सर्वदा) दृश्यतत्व प्रकाशित होत असते आणि ती चित्तवृत्ती ज्या वेळेला अंतर्मुख होईल त्यावेळी प्रकाशमान होणारा तो, ‘प्रत्यगात्मा’ म्हंटले आहे, त्याला त्याची अनुभूती येते.
बाहेरचे पदार्थ जसे भासतात त्याच्या उलट आतले आहे. दुःखरूप आपल्याला बाहेर दिसते तो आतला आनंद-स्वरूप आहे. बाहेरच्या जगात विनाशी पदार्थ दिसतात तर आत हा अविनाशी आहे. बाहेर अशुद्ध पदार्थ सर्वत्र आहेत तर आत हा शुद्धच आहे. बाहेर परप्रकाशी सर्व पदार्थ आहेत तर हा स्वयंप्रकाशी आहे. बाहेरचे सर्व पदार्थ विकारी आहेत तर हा निर्विकार आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक बाह्य पदार्थास षडविकार आहेत तर हा परमात्मा ‘भावातीतम त्रिगुणरहितम’ म्हणजे भावपदार्थाच्या पलीकडे आहे, सत्व-रज-तम या त्रिगुणांच्या परे आहे, रहित आहे.
तर असा हा जो परमात्मा आहे त्याचे अनुसंधान करावयाचे आहे. इंद्रियांची बहिर्वृत्ती असल्यामुळे देहत्रयाशिवाय दुसरं काहीही आपल्याला प्रकाशित होत नाही. देहत्रयामध्ये शास्त्रकारांनी पंचकोषांची रचना केलेली आहे. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे पांच कोष आहेत. स्थूल देह हा अन्नमय कोष म्हंटलेला आहे. आत्म्याची ओळख करून देताना स्थूल देहालाच आत्मा म्हणून त्यांनी सांगितलेले आहे. इथून सुरुवात करायला सांगितलेली आहे. हाच अन्नमय कोष म्हणजे आत्मा आहे. त्याच्यानंतर प्राणमय कोष आहे. प्राणवायू, कर्मेंद्रिये हा जो विभाग आहे हा प्राणमय कोष सांगितलेला आहे. त्याच्यानंतर मनोमय आणि विज्ञानमय असे दोन कोष आहेत. ‘ज्ञानेंद्रिये आणि मन’ म्हणजे मनोमय कोष, व ‘ज्ञानेंद्रिये आणि बुद्धी’ म्हणजे विज्ञानमय कोष, असे दोन विभाग म्हणजे हे दोन कोष आहेत. शेवटी आनंदमय कोष आहे. चित्ताचा संबंध इथे संपलेला आहे. त्या ठिकाणी केवळ अज्ञान म्हणून आहे. मूळ अज्ञान शक्ती ईश्वराची आहे. कर्मशक्ती ईश्वराची आहे आणि कार्यशक्तीही ईश्वराची आहे आणि शक्तींच्या द्वारा सृष्टीच्या नियमनाचे कार्य चाललेले आहे.
तर स्वयंप्रकाशी असा जो आत्मा आहे. ज्याला प्रत्यगात्मा म्हणतात, तो आपली प्रवृत्ती बाहेर आहे म्हणून तो आत आहे असे म्हणतात. नाहीतर तो आत आहे म्हणजे बाहेर नाही असे म्हंटले तर सिद्धांत भंग होईल. तो सर्वव्यापी आहे. देशाची-काळाची-कशाचीही त्याला मर्यादा नाही. असे ते परमतत्व आहे.
ज्ञानी भक्तांनी नामदेवांना या तत्वदृष्टीने कच्चे ठरविले. नामदेव पांडुरंगाच्या जवळ गेले आणि विचारले तर देवांनीही ज्ञानी भक्तांच्या म्हणण्याला संमती दिली. ‘हो कच्चे मडके आहेस तू’ असे देव सुद्धा म्हणाले.
तेव्हा नामदेव म्हणाले, “देवा, माझ्याशी तुम्ही बोलता, माझ्या घरी येता, माझ्या हातचे जेवता, माझी कामे सुद्धा करता, तरी मी कच्चा कसा?”
यावर देव म्हणाले, “नामदेवा, मी फक्त राऊळामध्येच आहे हे समजणे कच्चेपणाचे लक्षण आहे. पांडुरंग सर्व ठिकाणी आहे. सर्वस्वरूप आहे. हे ईश्वरदर्शन, पूर्ण दर्शन आहे.”
तर याप्रमाणे अंतरात्मा प्रत्यगात्मा, प्रत्यग ब्रह्मा, या पूर्ण स्वरूपाचे दर्शन होण्याकरता, ज्या मनाचं, बुद्धीचं साहाय्य घ्यायचं ती बुद्धी त्याच्यापर्यंत जाऊच शकत नाही. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या पांच कोषांपर्यंतही त्या बुद्धीची झेप पोहोचत नाही आणि तो तर आनंदमय कोषाच्याही पलीकडे असलेला. स्वयंसिद्ध आनंदमय कोष म्हणजे तरी काय? सुषुप्तीच्या वेळी जो आनंद मिळतो, त्याची कोणतीही इंद्रिये नाहीत. ज्याला केवळ अज्ञान म्हणतात, असा तो अज्ञान संमिश्रित जो आनंद मिळतो, तो आनंदमय कोष. परमात्म स्वरूप शुद्ध आनंद-रूप आहे म्हणजे बाहेरून मन ज्यावेळी परावृत्त होईल, त्या वेळेला कोषांचे अनुसंधान करता करता, आनंदमय कोषाच्याही पलीकडे एक स्वयंसिद्ध निर्विकार आत्मतत्व आहे, हे मनाला समजून येते. त्या साक्षी स्वरूपाचं अनुसंधान तितकंच उत्कटतेने होत राहील पाहिजे. साक्ष म्हणजे दिसणारे दृश्य, ते तटस्थपणे पाहणारा म्हणून साक्षी.
मात्रा स्पर्शास्तु कौंत्येय शोतोष्ण सुखदुःखदा: | आगमापायिनोस नित्यस्तांस्तितिक्षस्व भारत ||
भगवद्गीता २.१४
अर्थात, “हे कुंतीपुत्र अर्जुना, शीत-उष्ण आणि सुख-दुःख देणारे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पत्ती आणि नाश आहेत. म्हणून ते अनित्य आहेत, हे भारता अर्जुना, तू ते सहनच केले पाहिजेस.”
ही उच्च भूमिका अर्जुनाला सांगितली आहे. वेदांत श्रवण, मनन, निदिध्यासन करणे, समाधी आणि मग साक्षात्कार त्या बुद्धितत्त्वाला करून घेण्याइतकी बुद्धीची योग्यता झाली पाहिजे. यासाठी ती योग्यता येण्यापूर्वी ते अनुसंधान इथून सुरु करावयाचे आहे.
सर्व ही विश्व ‘आगमा-बाह्य आहे आणि अनित्य’ आहे. याकरिता तितिक्षेचा अभ्यास शास्त्रकारांनी सांगितला आहे. इष्ट-अनिष्ट कोणत्याही घटना घडल्या तरी समचित्त राहणे हा तितिक्षेचा अभ्यास आहे.
“सहनं सर्व दुःखानां अप्रतिकार पूर्वकं सा तितिक्षा” हे साधून मग स्वरुपानुसंधान करायला सांगितले आहे. याचे स्पष्टीकरण थोरल्या महाराजांनी ‘आत्मानात्म-विवेक’ मध्ये केले आहे. हे स्वरुपानुसंधान ज्या बुद्धीने किंवा मनाने करावयाचे आहे ते समचित्त-स्थिर पाहिजे.
निर्विकार जे स्वरूप आहे, तो ‘दिगंबर’ शब्दाचा अर्थ आहे. साक्षीस्वरूप सूर्याच्या उदय आणि अस्तानुसार आपण पूर्व, पश्चिम वगैरे दिशा समजतो. सूर्यनारायणाच्या मूर्त स्वरूपानुसार उदयाप्रमाणे पूर्व दिशा समजतो आणि जो मूर्त पदार्थ त्या सूर्यनारायणापासून दूर असेल त्याला पश्चिम दिशा समजतात. सूर्यनारायणापासून आमच्या पाठीमागे असलेल्या पदार्थापेक्षा आम्ही जवळ आहोत म्हणून सूर्यनारायणापेक्षा दूर असलेल्या पदार्थाला पश्चिम दिसा असे समजतात. व्यवहारामध्ये दृकतत्वांप्रमाणे विभाग केले जातात. तेव्हा येथे अंबर म्हणजे आकाशाप्रमाणे सर्वव्यापी परमात्म तत्व आहे. दृकतत्वांप्रमाणे मूर्त पदार्थ अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोषांनी वेष्टित असतात. किंवा स्थूल, सूक्ष्म, कारण या तीन देशांनी वेष्टित झाले आहे, आवृत्त झाले आहे. त्या आवरणांनां काढावयाचे आहे. त्यासाठी बुद्धीचे सहायय घ्यायचे आहे, शुद्ध प्रकाशमान आत्मतत्वाचं अनुसंधान करावयाचें आहे.
मी बसलो, मी उठलो, हे सगळे देहाचे धर्म आहेत. मी पहातो, मी ऐकतो, हे सर्व इंद्रियाचे धर्म आहेत. मी संकल्प करतो, माझ्या मनात राग आहे, माझ्यांत दोष आहेत, हे सर्व मनोधर्म आहेत. हे सगळे धर्म “मी” च्या ठिकाणी आपल्याला भासतात. आणि शेवटी त्या “अहम्” ची शुद्धी होता होता देहत्रयातील देहत्रयाने होणारे सर्वही व्यवहार आपण पाहू शकतो – हा साक्षीभाव. या व्यवहाराची उत्पत्ती आणि नाश हा सर्व मला दिसतो आहे. त्यामुळे मी असंग आहे. माझा याच्याशी काही संबंध नाहीये, हे जे अनुसंधान आहे, तो “दिगंबरा” या पहिल्या शब्दाचा अर्थ आहे. हे जे आत्मतत्त्व आहे ते सर्व वेष्टीत झालेलं आहे. त्याचे अनुसंधान करून, बुद्धीने हे वेष्टन दूर करून, विश्लेषण करून, तसा मी आहे अशी धारणा करावी लागते. आकाशतत्त्वाप्रमाणे “खग” हे आकाशाचे नांव आहे, ब्रह्माचेही नांव आहे. पण खग म्हणजे आकाशाप्रमाणे असंग आहे आणि आकाशाप्रमाणे देश-काळ मर्यादा रहीत आहे. आकाशाला श्रीदत्तात्रेयांनी गुरु केले आणि या आकाशापासून असंग हा बोध घेतलेला आहे. सर्वांतर्यामी असलेल्या प्रत्यग ब्रह्मापर्यंत आपली बुद्धी नेणे हे दिगंबर पदार्थाचे अनुसंधान करणे आहे.
प्रत्यग् ब्रह्मापर्यंत आपली बुद्धी नेणे फार कठीण आहे असे म्हणतात. तार्किकांना हे सांपडणार नाही असे आद्य आचार्य महाराजांनी स्पष्ट सांगितले आहे. तिथे तर्काला आंतमध्ये प्रवेश नाही. कारण साक्षी म्हणून जो आहे तो जगात कुठे अनुभवाला येत नाही. निर्विकारी आणि स्वयंप्रकाशी आत्मतत्वाचा अनुभव बुद्धीने ठरवून घ्यावयचा आहे. त्याकरता योगमार्ग किंवा भक्तीमार्ग सांगितला आहे. तर त्या स्वरुपानुसंधानापर्यंत बुद्धी आली म्हणजे मी साक्षी आहे, इथे सुखदुःख वगैरे काही नाही असा अनुभव येतो. ‘द्वंद्वातीतम’ पर्यंत बुद्धी येऊन पोचली असा याचा अर्थ आहे.
ज्या तत्वाला कशाचाही संबंध नाही. सुख दुःखादी होणारी द्वंद्व हा फक्त पाहातो आहे. त्या सर्वांचा मी फक्त साक्षी आहे. जसा मी साक्षी आहे तसा दुसरा एखादाही साक्षी आहे. व्यापक दृष्टीने हे आहे. सर्वसाक्षी, सर्वव्यापी एकच आहे. जसे जीव अनंत आहेत तसे साक्षीही अनंत होतील. साक्षीस्वरूप अद्यापी मर्यादित राहीलेलं आहे. आत्मस्वरूपाचे जे निरनिराळे विभाग आहेत, अंश आहेत, कल्पनेने दाखविलेले ते सगळे अंश अजून लक्षात आलेले नाहीत. केवळ निर्विचार, असंग एवढंच ठरलेलं आहे. याकरता अनंत जन्मांचा अभ्यास, सुकृत आहे, महात्म्यांची कृपा आहे. त्यामुळे बुद्धी येथपर्यंत येऊन पोचली आहे.
आणि साक्षीस्वरूप समजल्यानंतर ते अनेक आहे. साक्षी जो आहे, तो सर्वत्र व्यापक आहे. कालमर्यादा असेल पण देशमर्यादा त्याला नाहीये. “सर्वगतः” एवढेच समजून घ्यायचे आहे.
ते पूर्ण ब्रह्म आणि हे प्रत्यग् ब्रह्म.
साक्षी ब्रह्म पूर्ण आहे. सर्वव्यापी आहे. सर्वत्र एकच आहे. हे दुसऱ्यांदा आलेल्या “दिगंबरा” शब्दाच्या अर्थात त्यांनी सांगितले आहे. दिशा एक तत्त्व आहे, काल एक तत्त्व आहे, आकाश एक तत्त्व आहे, परंतु उपाधीमुळे त्यांच्यात भेद दिसतो. भांड्यातले, खोलीतले, ताटातले आकाश निराळे हा जो भेद दिसतो तो उपाधीमुळे दिसतो. जसं काल हे एक तत्त्व असताना कालाची उपाधी क्रियेवरुन त्यांनी मानलेली आहे. आणि त्या क्रियेवरुन कालाचा भेद शास्त्रकारांनी मानला आहे. साठ सेकंदाला एक मिनिट, साठ मिनिटे म्हणजे एक तास ही नांवे आपण जरी दिली असली (म्हणजे भेद केला असला) तरी वस्तुतः कालतत्त्व एकच आहे. त्याचप्रमाणे एक दृकतत्त्व मानून ते जसे सर्वव्यापी आहे त्याप्रमाणे पूर्ण ब्रह्म आहे.
साक्षीभाव जो आहे तो सुद्धा शेवटी नाहीसाच झाला पाहिजे. मी साक्षी आहे, आणि साक्ष मात्र निराळे आहे. पुन्हा हा भ्रम अद्यापि शिल्लक राहिला आहे, तो देखील जायला पाहिजे. तर साक्षीस्वरूप सर्वव्यापी आणि पूर्ण आहे, हे कळण्याकरिता पदात पुढे ‘सच्चितसुख धनम आयातीतं’ असे म्हंटले आहे. सचिदानंद स्वरूप जे आहे ते सत-स्वरूप म्हणजे अविनाशी आहे आणि चित-स्वरुप म्हणजे स्वयंप्रकाशी आहे. दुसऱ्याच्या प्रकाशाची आवश्यकता नाही. सूर्य चंद्रादिकांना देखील त्याच्यामुळे प्रकाश आला आहे.
यद आदित्य गतं तेजो जगद भासयते अखिलम् | यत चन्द्रम असि यत च अग्नौ तत तेजो विद्धि मामकम्||
– भगवद गीता १५- १२
असे भगवान म्हणत आहेत. असे सर्वप्रकाशी एक तत्व आहे आणि ते आनंदरूप आहे. तो आनंद सर्वसिद्ध आनंद आहे. आणि “मायतीतं” म्हणजे मायेने निर्मण झालेल्या बौटिक पदार्थांच्याही पलीकडचा तो आनंद आहे. आणि हे दोन्ही तत्वे एकच आहेत, हे दुसऱ्या “दिगंबरा” शब्दाने सांगितले आहे.
“श्रीपादवल्लभ” हे निर्गुण निराकार असे जे आत्मतत्व आहे ते परमतत्व साक्षीरूपाने आधी दाखवले गेले. पुनः सर्वसाक्षी, सर्वव्यापी अशा परिपूर्ण रूपाने त्याचे प्रकटीकरण केलेले आहे. अगोदर साक्षीचे अनुसंधान केले. अहंब्रह्म म्हणजे अहंसाक्षी असा मनाचा अभ्यास होण्याकरिता मनाचं फार साहाय्य पाहिजे, आणि हे मनाचे साहाय्य होण्याकरिता शास्त्रकारांनी बाकीची साधने सांगितली आहेत. त्यासाठी भक्तियोगाचा पुरस्कार थोरल्या महाराजांनी केला आहे. श्रीपादवल्लभ हे सगुण स्वरूप आहेत.
श्रीपादवल्लभ ज्या स्थानी राहिले त्या स्थानात राहणाऱ्यांची इष्टसिद्धी होते. श्रीपादवल्लभ निवासी, साधकाने यज्ञ, दान, तप, इत्यादी करून मिळणाऱ्या फळांपेक्षा कितीतरी अधिक पट फळ त्याला मिळते. त्याची प्रगती लवकर होते. श्रीपादांचे स्वरूप हे फक्त भौतिक शरीर नसून ज्ञानमय सगुण रूप त्यांनी धारण केले आहे. असा परमेश्वर स्वरूप अवतार ज्या ठिकाणी राहिले ते स्थान पवित्र होत असते. आळंदीला माउली सातशे वर्षे समाधिस्थ आहेत. अशा ठिकाणी जाणाऱ्यांची कार्यसिद्धी कशी होते? त्यांना बातमी कोण पोचवितो? सिद्धपुरुषांच्या या स्थानामध्ये असं काही वैशिष्ट्य निर्माण झालाय कि तिथे जाणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.
आत्मानुसंधान करणाऱ्या साधकांना निरनिराळ्या विघ्नांना तोंड द्यावे लागते. पहिले विघ्न म्हणजे झोप. स्वरुपानुसंधानास बसल्यावर झोप आली तर मनोलय होतो. मग कसे करायचे अनुसंधान? त्यासाठी आहार-विहाराचे कटाक्षाने पालन व्हावयास पाहिजे. हिताहार-मिताहार आदी पळाले पाहिजेत. म्हणजे हा लय-दोष उत्पन्न होत नाही.
त्यानंतरचा मोठा दोष म्हणजे अनेक प्रकारच्या वृत्ती निर्माण होतात आणि त्यातच माणूस रममाण होतो. वृत्ती निर्माण होणं हा संसार आहे आणि वृत्ती नाहीशा होणं हा मनोनाश. वृत्ती निर्माण होऊन स्वरुपानुसंधानात विक्षेप निर्माण करतात. आपल्या अंतःकरणात षडविकारादि दोष किती प्रबळ आहेत याचा पत्ता आम्हाला लागत नाही. प्रत्यक्ष ते विकार प्रकट झाल्यानंतर देखील ते जाणवत नाही.
यानंतर रसास्वाद हा एक भयंकर मोठा दोष आहे. ज्यांना प्रगती साधावयाचे आहे ते रसास्वादाच्या मागे लागत नाहीत. आपली प्रसिद्धी आपणच आपल्या तोंडाने करायची. व्यवहारात जरी हे उपयोगी असले तरी परमार्थात हा दोष म्हणूनच मनाला आहे. मला असा-असा अनुभव आला आहे, मी इतके नाम घेतो, इतकी साधना करतो, जप, तप, दानादि करतो, माझी एवढी प्रगती झाली आहे असे सांगणे, आपल्याला जो काही थोडाफार चांगला अनुभव आला त्याची प्रसिद्धी करायची, हे परमार्थात अपेक्षित नाहीये. प्रगती या शब्दाचा अर्थ काय तर साधन व्यवस्थित चालले आहे. ती ईश्वराची कृपा आहे, आपले कर्तृत्व काय त्यात? अशा या रसास्वादात सर्व काळ निघून जातो, तो घातकच. यामुळे साधनेत प्रतिबंध निर्माण होतो. असे अनेक दोष आहेत.
आत्मस्वरूपाचे अनुसंधान म्हणजे मी साक्षीरूप आहे, मी पूर्णब्रह्म आहे याचा निदिध्यास. निदिध्यास म्हणजे साक्षात्कार नाही पण साक्षात्काराजवळची ज्ञानभूमिका. श्रवण ही सुद्धा ज्ञानभूमिका. मनन-चिकित्सा ही देखील ज्ञानभूमिकाच. त्यानंतर मनोलय झाल्यावर आत्मस्वरूपाचे अनुसंधान करणे ही तिसरी भूमिका आहे. त्यामुळे आपले अंतःकरण अखंड परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर होत गेलं तर मग ती समाधी अवस्था. आणि समाधीतून पुढे साक्षात्कार होतो.
या पायरीने जाताना वेगवेगळ्या अवस्थेत येणाऱ्या विघ्नांचे निरसन कसे होणार? आपल्याला वाटते मन-इंद्रिये-बुद्धी माझी आहे, पण तसे नसते. आपल्यासारखे साधारण जीव शरीराला वेदना झाल्यावर तिकडे दुर्लक्ष करू शकत नाही. साधी खाज आली, किंवा डास-मुंगी बसली, अगदी केसाच्या हालचालीने देखील मन विचलित होते, आपली तंद्री सुटते, आपण चिडतो. देहापासून मन, बुद्धी, इंद्रिये ही परावृत्त होत नाहीत. सर्पदंश झाल्यावर देखील थोरले महाराज समाधिस्त बसत, एकदा तर आठ तास बसले होते. हा साधनानंद, इंद्रियानंदापासून मोठा. शरीर वेदना असताना, दुर्लक्ष करून समाधिस्थ राहणे सोपे आहे का? पंडित राजेश्वर शास्त्री द्रविड एकदा ग्रंथालयात जाऊन बसले कि दोन-दोन दिवस बसत असत, अन्नपाणी, झोप कशाचीही साधी आठवण देखील येत नसे त्यांना, असा विद्यानंद होता, इंद्रियानंदापासून मोठा. इंद्रियानंद मोठा वाटलं तरी तो अल्प आणि अस्थिर आहे. विषयापासून, देहापासून मन परावृत्त करण्याची तयारी पाहिजे.
ईश्वर दयाळू आहे. भक्तांचे कल्याण करण्यासाठी निरनिराळे अवतार झाले आहेत. चार भक्तांची उदाहरणे यासाठी या आरतीमध्ये पुढे सांगितली आहेत. पहिले उदाहरण म्हणजे नक्र आणि गजेंद्रची कथा सर्वांना माहित आहे. नक्राने गजेंद्राचा पाय धरून आत चालवले आहे, गजेंद्राने खूप प्रतिकार केला पण शरीर सामर्थ्य संपले. गजेंद्राला कळून चुकले कि आता आपण पाण्याबाहेर येऊ शकत नाही. मग पूर्वजन्मात त्याच्याकडून जे अनुसंधान घडले त्याचे स्मरण करून तो भगवंताला शरण गेला नि त्याची स्तुती केली. गजेंद्राने परमेश्वराची केलेली स्तुती भागवतात गजेंद्रस्तुती म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात परमेश्वराच्या स्वरूपाचे वर्णन गजेंद्रने केले आहे.
आपल्यासारख्या सामान्य बुद्धीवाल्याला वाटेल कि हत्ती कधी स्तुती करतो का? पण चंद्रलोकात बुद्धी (मानव) जाऊ शकते हे अगोदर कुणी मान्य केले होते का? शक्ती ही आधी मान्य करावी लागते. आपल्यामध्ये असलेल्या शक्तीचा विकास कसा करून घ्यायचा ती साधना आम्हाला मान्य नाही किंवा सांगणाऱ्यांवर विश्वास नाही. वास्तविक हा आपल्या बुद्धीचा दोष आहे पण तो दोष न समजता त्या चिकित्सेचे आपल्याला कौतुक वाटते. दोष न समजता आपण ते अशक्य समजून बसतो, असंभवना हा फार मोठा दोष आहे.
ही असंभवना, हे अशक्य आहे ही समजूत, हा दोष बुद्धीतून गेल्याशिवाय परमार्थ साध्य होणे शक्य नाही. शक्यतेची भावना निर्माण झाली कि संशय कमी होतो. संशय दोन प्रकारचे असतात, असेल असे वाटणे हाही संशय आणि नसेल असे वाटणे हा देखील. बुद्धीवाद्याला यातले काहीच मान्य नसते त्यामुळे अर्धवट स्थिती होते, “संशयात्मा विनश्यति |”. असे घडणे शक्य आहे, हे संभवनात्मक ज्ञान आहे, निश्चितपणे नाही, शक्यतेचाही अर्धवटपणा, अशी स्थिती ही संशयाच्या वरची पायरी आहे.
याच्या नंतर निःसंशय बुद्धी, त्याच्या वर निर्णयात्मक बुद्धी, याच्याही वर निश्चयात्मक बुद्धी. असा हा बुद्धीचा विकास करावयाचा आहे. अशा विकसित बुद्धीचे संस्कार कायम राहू शकतात. मागच्या जन्मीचे, पश्वादिक योनीमध्ये असतानाही ते पूर्वजन्माची बुद्धीचे संस्कार कायम असू शकतात. मागच्या जन्मी केलेलं साधन, त्या साधनेचा आलेला अनुभव, त्या साधन संस्कारांचे महत्व इतके आहे कि या पशूच्या, गजेंद्रच्या जन्मात आलेला असताना सुद्धा त्या बुद्धीवर संस्कार कायम आहेत.
बुद्धीतत्व हे अविनाशी आहे, जीवनमुक्ती होईतोवर बुद्धितत्त्व बरोबर राहते. शास्त्रकार देखील बुद्धीनेच आत्मतत्व दिसू शकते म्हणून बुद्धितत्त्वाचा पुरस्कार करतात. गजेंद्राचे शुक्राचार्यांनी कौतुक केले आहे. गजेंद्राने सर्वव्यापी ईश्वरत्त्वाची प्रार्थना केली आहे. सर्व जग ज्याने निर्माण केले, सर्व जीवांच्या बुद्धीला प्रेरणा करणारा, ज्या शक्तीने सर्व विश्वाचे कार्य चालविले आहे त्याला मी शरण आलेलो आहे, अशी गजेंद्राने प्रार्थना केल्यावर शुक्राचार्य म्हणतात कि, देवादिकांना देखील आपल्या नावाचा कर्तृत्वाचा अभिमान आहे. पण पशु जन्माला येऊन देखील गजेंद्रची बुद्धी इतकी शुद्ध झालेली होती कि सर्व ठिकाणी एकच परमात्मतत्त्व आहे याची जाणीव त्याला होती. बुद्धी शुद्ध असली कि अशा रीतीने ती कोणत्याही जन्मी कामी येते.
अशा प्रकारे नाव आणि रूप धारण करून भगवंत येतात. असेच नाव प्राप्त झालेले भगवान श्रीपादवल्लभ. नक्र आणि गजेंद्रासारखेच दुसरे द्रौपदीचे उदाहरण आरतीमध्ये सांगितले आहे. धर्मराजांनी वनवासात गृहस्थ धर्माचे पालन करता यावे म्हणून सूर्यनारायणांना प्रसन्न करून इच्छित-भोजन-थाळी मिळवली. द्रौपदीचे जेवण झाले कि ते पात्र अन्न देणार नाही, म्हणजे द्रौपदीला शेवटी जेवण आले. कर्म करायचे ते सुद्धा किती कठीण असते बघा, सत्वपरीक्षाच ती. ध्येय पूर्ण करण्याकरिता मनाचा निर्धार किती पाहिजे? भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग हे तर कर्मानंतरचे आहेत, पण कर्ममार्गात देखील निश्चित दृष्टी (बुद्धी) पाहिजेच.
दुर्योधनाने दुर्वासांना प्रसन्न करून पांडवांचे सत्वभंग करण्याकरिता, द्रौपदीचे जेवण झाल्यावर, त्यांच्याकडे अतिथी म्हणून जेवायला पाठवले. म्हणजे दुर्योधनासारखी माणसे ही सत्संग करतात पण त्याचा असा दुरुपयोग करतात. वास्तविक दुर्वास ऋषींना प्रसन्न करून घेणे सोपे नाही. दुर्योधनाला मनाचा निग्रह करावा लागला. पण त्याने ते सर्व केले तेव्हा कुठे दुर्वास ऋषी प्रसन्न झाले. ही असुरी प्रवृत्तीची मंडळी असली तरी त्यांच्याजवळ मनोनिग्रह, इंद्रियसंयम, तितिक्षा, आदी साधने आहेत. दुर्वास ऋषींना प्रसन्न करवून त्यांच्याद्वारे म्हणजे पाहुण्यांच्या हाताने साप मारायचा असे झाले. पण दुर्वासांना देखील नाईलाज म्हणून जावे लागले. पांडव योग्य आहेत, धर्मनिष्ठ आहेत हे दुर्वासांना माहित नव्हते असे नाही. ऋषी आश्रमात आले, धर्मराज अतिथी धर्माचे पालन करीत होता पण आता द्रौपदीचे जेवण झाल्याने दुर्वासांना आणि ऋषी समुदायाला जेवण कसे देणार? न द्यावे तर दुर्वासांचा कोप होऊन ते शाप देणार.
पण द्रौपदी काही कामी नव्हती. सर्व भगवंताचीच इच्छा किंवा शक्ती आहे अशी तिची पक्की खात्री होती. ‘त्वमेव सर्वम मम देव देव’ ही भूमिका उत्पन्न होणे हे फार कठीण आहे पण ते द्रौपदीजवळ होते. साधनेवर विश्वास असल्यानंतर, मी साधना करतो असा स्वतःचा विश्वास वाटतो आणि वाढतो. पुढे त्याचे रूपांतर अभिमानात होते. पण द्रौपदीचे तसे नव्हते. साधनेतून देवांवर विश्वास दृढ झाला पाहिजे. द्रौपदीने तळमळीने श्रीकृष्णांना आवाहन केले. भगवान आले आणि पात्राला लागलेले भाजीचे पान भक्षण केले. ‘पत्रं पुष्पम फलं तोयं’ हे स्वतः आचरून दाखविले आणि द्रौपदीच्या प्रेमाला-भक्तीला महत्व दिले. मग त्या थाळी-पत्राने परत अन्न दिले. याप्रमाणे द्रौपदीच्या भक्ती भूमिकेने पांडव संकटातून मुक्त झाले आहेत. भक्तिभावासाठी भगवान वाटेल त्या वेळेला येऊन संकटातून मुक्त करतात. आरतीमध्ये चोथे उदाहरण म्हणून अंबरीश राजाला कसे भगवंताने दुर्वासांच्या शापातून मुक्त केले आहे ते घेतले आहे.
चौथे उदाहरण गुरुचरित्राच्या दहाव्या अध्यायातल्या सकाम भक्ताचे घेतले आहे. श्रीपाद वल्लभांचा नवस फेडून, सहस्त्र भोजन घालण्यासाठी, तो भक्त कुरुगड्डीला निघाला आहे. वाटेत चोरांनी गाठून फसवून त्याचा वध केला. भगवंतांची वात्सल्य शक्ती अशी आहे कि तिथे येऊन चोरांना मारून, ब्राह्मणाला जिवंत केले आहे आणि त्याचा तो संकल्प पूर्ण करवून घेतला आहे. मेल्यावर आयुष्य संपले असे सांगता नाही का येत देवांना?
निर्विकार ब्रह्मरूप समजणे, सर्वव्यापक ब्रह्मरूप समजणे, त्यांचे अनुसंधान करणे, सगुण श्रेष्ठ कि निर्गुण श्रेष्ठ असा भेदभाव संपणे महत्वाचे. भक्तकार्य करणारा भगवानच साक्षात ब्रह्मरूप आहे, निर्गुण निराकार तोच आहे, सगुण साकार तोच आहे, त्याची मला प्राप्ती व्हावी. काम क्रोधरूपी अनंत विक्षेप चित्तात उत्पन्न होतात, चित्त स्थिर करण्याचे सामर्थ्य माझ्याकडे नाही. साधन मिळाले तरी त्या साधनेवर माझा तितका संपूर्ण विश्वास माझा कुठे आहे? त्यामुळे साधनाचाही उपयोग मी करून घेऊ शकत नाही. याकरता तुमचे सहायय मला व्हावे, तुमची प्राप्ती मला व्हावी, ही प्रार्थना या आरतीत शेवटी केली आहे. अशा रीतींत सामान्यतः एकंदर तत्वानुसंधान, वेदांतसिद्धांत यात मांडले आहेत. या सिध्दांतापर्यंत आपली बुद्धी जाण्याकरिता भगवतभक्तीचे महत्व इथे सांगितले आहे.
आपण जर कृपा केलीत तरच मला आपले स्वरूप समजून येणार आहे. माझे कर्तृत्व काहीही नाही अशी अनन्यभावाने शेवटी प्रार्थना केली आहे. याचे नित्य अनुसंधान करीत राहून या आरतीचे पठण अर्थाकडे लक्ष देऊन झाले तर त्याचे फळ आपल्याला मिळणार आहे. हे एक वाङ्मय तपच आहे. अर्थानुसंधान नाही घडलं तरी जितके वाणीने होईल तेवढे करावे. त्या वाङ्मय तपाचेही महत्व काही कमी नाही. वाङ्मय तपाचे पर्यवसान मानस तपापर्यंत होत आहे हे थोरल्या महाराजांनी सांगितले आहे.
ब्रह्मस्वरूप भक्तांचं संरक्षण करण्याकरता आहे. संरक्षण याचा अर्थ भक्तांची बुद्धी शुद्ध करून आपल्या ठिकाणी स्थिर करणे. ‘श्रीपाद वल्लभ’ या संबोधनात ‘श्रीपाद’ आणि ‘वल्लभ’ असे दोन शब्द आहेत. “श्री पादेयस्य’, म्हणजे ज्याच्या चरणाजवळ ‘श्री’ आहे. लक्ष्मीयुक्त परमात्म, शक्तियुक्त परमात्म्याचे स्मरण श्रीपाद या शब्दाने केले आहे. सर्व ‘श्री’ लक्ष्मीदेवी ज्याच्याजवळ आहे आणि म्हणून तो सर्वांना वल्लभ, म्हणजे प्रिय आहे. सर्वांना संकटातून मुक्त करून कल्याण करणारा जो आहे, म्हणून तो वल्लभ म्हणजे प्रिय आहे. सर्व श्री-मायाशक्ती ज्याच्याजवळ आहे आणि सर्वही भक्तांना जो अत्यंत प्रिय आहे.
आरतीमध्ये आर्त भक्तांचे “न मे भक्त: प्रणश्यति” या वचनाप्रमाणे भगवंतांनी संरक्षण केले आहे. आणि शेवटी प्रार्थना केली आहे,
दिगंबरा गुरु वासुदेव दत्त सत्वं ब्रह्म | काम क्रोध ग्रसितं माम लभ सदैव झटितिवह ||४||
हे दिगंबरा, “श्रीपादवत लभ” असा एक अर्थ केला आहे. श्रीपाद ज्याप्रमाणे विष्णुरूपाने गजेंद्राला आणि अंबरीषाला, श्रीकृष्णरुपाने द्रौपदीला, श्रीपाद रूपाने द्विजाला स्वरूपात लभ म्हणजे प्राप्त झाले, त्याप्रमाणे मलाही आपली प्राप्ती व्हावी. कारण मी देखील काम-क्रोधादि ग्रसित आहे. इथे महामंत्रातील चौथ्या शब्दाचा म्हणजे तिसऱ्या ‘दिगंबरा’चा, शेवटच्या शब्दाचा अर्थ सांगताना आपण गुरुस्वरूप आहात, वासुदेवरूप आहात, दत्तरूप आहात असे म्हंटले आहे.
म्हणजे ही तिन्ही रूपे एकच आहेत. गुरु-वासुदेव आणि दत्त हे तिन्ही ब्रह्मस्वरूपच आहेत, सर्वही अनुसंधान एकरूपाने या ठिकाणी केले आहे.
‘वासुदेव’ याचा अर्थ देखील शास्त्रकारांनी केला आहे. ‘वस’ धातूचा अर्थ ‘आच्छादन’ असा आहे. सर्वही भुतांना काही दिसत नाही आणि स्वतः तो प्रकाशमान आहे. झाकून जरी टाकलेलं असलं तरी आत्मरूप प्रकाशमान आहे. अशा हे वासुदेवा, “दत्त: त्वम ब्रह्म”, आपण ‘गुरुर्ब्रह्मा वसुदेवा दत्तात्रेय’ आहात. ब्रह्मस्वरूप आहात. याप्रमाणे मूळ ब्रह्मरुपाने अनुसंधान करून प्रार्थना केली आहे.
“काम क्रोध ग्रसितं माम लभ” मला आपण प्राप्त व्हा कारण कामक्रोधांनी मी अगदी ग्रासलेले आहे. या सर्व विकारांनी पिटलेलो आहे. म्हणून आपण मला प्राप्त व्हा आणि त्याच प्रमाणे लवकर मला आपल्याकडे न्या, अशी शेवटी प्रार्थना केली आहे.
असा हा महामंत्र आहे. या महामंत्राचे सगुण-निर्गुण, व्यापक-अव्यापक अशा स्वरूपाचे ऐक्य कसे आहे, ते ऐक्य-ज्ञान आपल्याला व्हावे आणि आपण कृतार्थ व्हावे अशी प्रार्थना करून शेवट करतो.
|| अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ||
श्रीगुरुचरणरजामृतानंद सेवक