Friday, October 20, 2023

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान ४

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान  ४

आज एका समूहावर एका ताईंनी दिव्याच्या पूजेविषयी प्रश्न विचारला ,त्या संदर्भात विचार करताना जे सुचले ते लिहितोय ,काही चुकल्यास माफी असावी.

मी स्वतः सर्वपूजा अभ्यासली आहे ,त्यानुसार जेव्हा मी षोडष-उपचार पूजा हा विधी बघतो त्यावेळी मला माझ्या इंजिनिअरिंग भाषेत ती "चेकशीट" वाटली ,पूजेत पुढे लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत की नाहीत हे बघत पुढे जाणे हे या चेकशीटचे घटक आणि मुख्य काम.हे सर्व खूपच सुंदर पद्धतीने या पूजाविधी मध्ये गुंफले आहे.

आपण एक एक उपचार बघूया

आचमन - अंशतः पाणी बघणे म्हणजे जे पाणी देवाच्या पूजेसाठी वापरणार ते चाखणे,हाताळणे 
त्याचबरोबर आपले हात स्वच्छ करणे व स्वतःकडे उपवस्त्र आहे की नाही हा चेक पॉईंट. तसेच  गुरुचरित्रात सांगितले तसे आचमन केल्यामुळे रोजच्या व्यवहारात पाणी प्यालो तर कधीच ऍसिडिटी होणार नाही. आधुनिक विज्ञानदेखील मान्य करते की आपण कितीही पाणी प्यालो तरीही त्यातील थोडाच अंश रक्तात उतरतो.सावकाश व थोड्या प्रमाणात प्राशन केलेलं पाणी शरीराच्या नसातून रक्तात मिसळते व त्यामुळे रक्ताची घनता योग्य प्रमाणात राखायला मदत होते,ज्यामुळे ऍसिटीडी ,रक्तदाब यापासून आपण दूर राहतो. आचमन हे एखाद्या सलाईनसारखेच आहे.आचमन केल्याने शरीरही हलके रहाते.

भूमी आवाहन - आपण बसलोय ती जागा साफ आहे, आसन घेतलय का व ते व्यवस्थित आहे का हा चेक पॉईंट

घंटा ,दीप ,शंख ,कलश पूजा व आवाहन -
या सर्व पुढे लागणाऱ्या गोष्टी बरोबर आहेत का व चालू आहेत का ? घंटा वाजविणे , दीप वाती ज्वलन असणे

गणेश पूजन - या पूजनात श्री गणेशाचे पूजन हा मंगल विचार आहेच पण त्यासोबत मुख्य देवतेला वाहायचा सर्व गोष्टी इथेच चेक केल्या जातात (दूध ,गंध ,हळद कुंकू ,वस्त्र ,जानवे ,पत्री ,फुल ,नैवेद्य , उदबत्ती ,स्थापित दीप व धूप)

हे सर्व झाल्यावर पुढे हे 16 उपचार करायचे मुख्य देवतेसाठी करायचे आहेत, ते 16 उपचार पुढीलप्रमाणे आहेत.

१.आवाहन- मूर्तीमध्ये स्वत: परमात्मा अतिथीरूपाने आला आहे अशा भावनेने देवतेचे स्वागत.

२.आसन- देवतेला बसण्यासाठी आसन 

३.पाद्य-मूर्तीच्या चरणांवर पाणी घालून तिचे पाय धुणे.

४.अर्ध्य-देवतेविषयी आदर व्यक्त करण्यासाठी पळी वा शंखात गंध,अक्षता ,फुल घालून ते पाणी देवतेला अर्पण करतात.

५.आचमन-देवतेला पिण्यासाठी पाणी मूर्तीच्या मुखाजवळ अर्पण करतात.

६.स्नान व अभिषेक- देवतेवर सतत पाण्याची संततधार अर्पण करणे.

७.वस्त्र-देवतेला कार्पासवस्त्र म्हणजे कापसाचे वस्त्र अर्पण करणे.

दुसऱ्या प्रकारे विचार केला तर वस्त्र हे कापसाचे का अर्पण करायचे ,ते ही बनवण्याची पद्धत बघा ,कापूस लांब ओढून सुटा करून थोड्या अंतराने मणी बनवून विशिष्ट जागी कुंकू लावून पीळ देणे 
ही वस्त्रमाला खरच एखाद्या मोत्याच्या माळेसारखी दिसते 
म्हणजे जुन्याकाळी लोकांकडे पैसे नव्हते पण अश्या प्रकारच्या गोष्टीतून त्यांनी स्वस्त पण सुबक पर्याय निर्माण केले. 
मग त्यात विविधता आणण्यासाठी गणपतीला वाहायचे सिंदूर लावून पीळ द्या ,महादेवाला भस्म लावून ,देवीला हळद कुंकू लावून अश्या प्रकारे वस्त्रमाला सजवायला चालू झाले. हे कुठल्याही धर्मग्रंथातून आलेले नसेल तर आपल्या पूर्वजचे शोध आहेत .
वस्त्रमाला आपण अर्पण करतो स्नान व पंचामृत अभिषेक झाल्यावर ,कापूस असल्याने मूर्ती ओली झाली असेल तर सर्व पाणी कापसाने शोषले जाईल व मूर्ती भंग होणार नाही .मणी वस्त्रमाला पद्धतीमुळे दिसायला सुबक व कापूस पुंजके तयार होतील म्हणजेच पाणी धरून ठेवायची कापसाची ताकत वाढली.

८.उपवस्त्र-उपरणे किंवा कंचुकी म्हणून अर्पण केले जाते.

९. गंध-सुगंधासाठी देवतेला चंदन लावले जाते.अत्तर लावले जाते.

१०.पुष्प-फुले व पत्री देवाकडे देठ करून अर्पण करणे.निसर्गात जे उपलब्ध आहे त्याचाच वापर, नको अती खर्च आणि नको अती चढाओढ, जी सजावट ती नैसर्गिक, उपलबधतेनुसारच आणि सहजजोगे मिळेल असे,आता अनेकजण दारी,परसात झाडे नाहीत असे असतील तर पत्रिसाठी तरी या वनस्पतींची लागवड आजूबाजूला करतील आणि त्याच्यायोगे शुद्ध वातावरण घराच्या आजूबाजूला सदोदित राहते. पत्रीच्या निमित्ताने बागेत, परसात पायपीट होते, पावसात झालेली पडझड लक्षात येते आणि येत्या काळात डागडुजी करणे, शुष्क वनस्पती काढून नवीन लागवड करणे शक्य होईल ही तजवीज असावी.परंतु जे फ्लॅट मध्ये राहतात व ज्यांना खरचं शक्य नाही त्यांनी अती वणवण आणि चिडचिड करून अमुक गोष्ट पाहिजेच असाही अट्टाहास टाळावा.पूजा सामग्री आणणे हा सोहळा व्हायला हवा त्याने अनेकजणांना दुखावून ,रसभंग करून त्यांच्यातील देवाला दुखावणे निषिद्ध असेल आणि देवालाही हे मान्य नसेल.

११.धूप-नैसर्गिक सुगंधी द्रव्याने तयार केलेली उदबत्ती अर्पण करणे. 

१२.दीप-तूपाचे निरांजन देवाला अर्पण करणे व देवतेतील त्जाच्या अंशाला ओवाळणे.

१३.नैवेद्य-लघुनैवेद्य,प्रसाद नैवेद्य व महानैवेद्य असे तीन प्रकार यात येतात.बरं नैवेद्य म्हणून गूळ खोबरे किंवा शेंगदाणे गूळ असतात ,हे काही देवाचा प्रसाद म्हणून घरातील मंडळी विशेषतः लहान मुलेच खातात.म्हणजेच त्यांना पौष्टिक आहार मिळण्याची तजवीज.

१४.प्रदक्षिणा-स्वत:च्या उजव्या बाजूने डाव्या बाजूकडे फिरून देवतेला प्रदक्षिणा घालणे.

१५.नमस्कार- देवतेला नमस्कार करणे.

१६.मंत्रपुष्प-पूजेत काही न्यून राहिल्यास त्याचे प्रतीक म्हणून अक्षता व फुले देवाला अर्पण करणे.

काय मग? आहे की नाही ही चेकशीट?  आपले पूर्वज खूप हुशार होते व त्यामुळे त्यांनी पंचामृत ,गूळखोबरे सारखे पोंष्टीक घटक आपल्या पूजेत समाविष्ट केले म्हणजे तीर्थ प्रसाद म्हणून ते खाल्ले जातील. आपल्या हिंदू संस्कृतीचा बारकाईने अभ्यास केला तर अतिशय सूक्ष्म विचार बघायला मिळतो हे सर्वात विशेष.
-निलेश जोशी

No comments: