आई माझ्याकडे चिंचवडला आली आहे
आज बोलता बोलता एक कवितेचे 2 ओळी म्हणून विचारते ही कविता कोणावर आहे?
क्षणभर नाही समजले मग पूर्ण कविता शोधली
बा भ बोरकर यांची ही कविता
चक्क माडावरची म्हणजे नारळाच्या झाडावरची
खूपच छान आहे
माड कल्पवृक्ष का आहे याचे यथार्थ वर्णन
॥ माडाचें भावगीत ॥
ताठ उंच मी उभा नभास नित्य बाहुनी
राहिलो तुझ्याचसाठिं बाहु हे उभारुनी
स्वर्ग सांडिला मुदें तुझ्याच मुक्तिकारणें
देव वाहिला तुला, तुलाच वाहिलें जिणें
तापतां उन्हीं तुला दिली प्रशान्त सांवली
भागवावया तहान गोड गार शाहळीं
मेघ वारिले किती सुरम्य बांधुनी मठी
खावया दिलीं तुला फळें रसाळ गोमटीं
स्नान उष्ण घातलें तनूस तेल लावुनी
घास लाविले मुखा मुठेल तया मुठेल त्यात वाहुनी
रात दाटतां घरीं सुवर्णदीप लाविले
कुंतलीं प्रभातकालिं दैन्य सर्व झाडिलें
लग्नकारणीं, सणासुदीस, दुःखसंकटीं
साह्य मीं दिलें तुला सदैव बांधुनी कटी
स्वर्ग दाविण्या तुला स्वतःच जाहलों शिडी
चांदण्यांचिया तुला दिल्या भरून कावडी
गीत ऐकुनी तुझें तरारलों, थरारलों
नी चितारुनी भविष्य मी सहर्ष डोललो
तू परी कृपेमुळेंच होसि नित्य आंधळा
अन् सुखामुळेंच जासि दुर्गतीचिया तळा
शंभु ठाकतां समोर गांगतीर्थ सांडुनी
कंठिंच्या हलाहलास जासि शीघ्र मोहुनी
कोटितीर्थ, मानवा ! असून माझाया शिरीं
तूं विषार्थ लाविली गळ्यास माझिया सुरी
स्वर्ग लाभतां करीं तयास नेसि रौरवा
धन्य धन्य बुद्धि रे तुझी विचित्र मानवा !
दुर्गतींत परी तुला करीन साथ मी
भावबद्ध मी तुला, तुझाच मित्र नेहमीं
भाविलें तुझ्यासवेँ रमेन दिव्य गौरवीं
स्वप्न तें विरून आज मी विषण्ण रौरवीं !
No comments:
Post a Comment