एका मराठी मालीकेचे शीर्षक गीत होते
"ज्याने दिल्यात चोची,देईल तोच चारा
हां ठेवुनी भरोसा केला प्रवास सारा"
अर्थात तो अज्ञात जगतनियंता अन्नदाता बनून जग रहाट गाडगे चालवत आहे , पण याचा चुकीचा अर्थ काढून "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" हेही कर्मविरोधी वाक्य चुकीचेच आहे.
अन्नदाता म्हणजे अन्न देणारा
मग तो देव असेल अन्न बनवणारा ,
शेतकरी असेल धान्य,भाजीपाला पिकवणारा ,
गृहिणी असेल जी स्वयंपाक करून धान्य खाण्यायोग्य पदार्थात रूपांतरित करते,
व असंख्य हात जे धान्य व अन्न रूपांतरणामध्ये हातभार लावतात उदा.ख़त किटकनाशके उत्पादका पासून पीठ गिरणी कामगार पर्यंत व शेतात राबणाऱ्या मजुरापासून ते मिठागरात मीठ ओढणाऱ्या कामगारापर्यंत
वरील सर्व हात अव्याहत राबताहेत व म्हणूनच उदरभरण झाल्यावर पोटभर ढेकर देताना आपल्याला तृप्ती मिळते , या तृप्तीमुळेच जे अनामिक हात ,मने , हृदये काम करत असतात ते समाधानी होतात.
पण या सर्व मनाना समाधानी करण्यासाठी आपण एक गोष्ट नक्की करू शकतो ते म्हणजे अन्न वाया न घालवणे , जेवढे पाहिजे तेवढेच घेणे व अव्याहत राबणाऱ्या दृश्य अदृश्य अन्नदात्यांचा अपमान न करणे.
लहानपणीची एक आठवण , मी दहावीपर्यंत खुप चुझी होतो ,तिखट नको ,भाज्या मोजक्याच् व फक्त वरण भात , यावर माझे बाबा खुप ओरडायचे पण त्याना अन्न पानात टाकलेले अजिबात आवडत नसायचे
एकदा मी मला न आवडणारे पदार्थ मुद्दाम वाढायला लावले व मग नको म्हणून पानात सर्व पदार्थ टाकून मी उठलो
बाबाना प्रचंड राग आला , त्यांनी सर्व उरलेले पदार्थ पानासहित गाईला भरवायला लावले व नंतर झाडाला बांधून ठेवले चांगला एक तास
नंतर समजवलेही की चुझी असणे चुकीचेच आहे पण त्यापेक्षाही अन्न वाया घालवणे गुन्हा आहे, आज गाईला आपण ते अन्न भरवले तिचे पोट भरले पण जगाच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी हे शक्य नाहीये व त्यासाठी पाहिजे तेच पदार्थ घेवून पूर्ण संपवणे व जेवण सुरु करण्याअगोदर नको असलेले पदार्थ काढून ठेवणे असे उपाय आपण करू शकतो. तेव्हापासून कांनाला खडा अन्न वाया घालवणे असे काही करणे मनात पण येत नाही.
आपण अन्न उष्टे करून टाकून देतो तेव्हा किती जणांच्या मेहनतीवर अक्षरशः आपण पाणी फिरवतो
त्यात आपली आई,बायको असेल जी मनापासून पदार्थ बनवते,शेतकरी असेल जो प्रसंगी पोटाला चिमटा देवून निसर्ग लहरीपणा वर मात देवून अन्न निर्मिति करत रहातो.काहीजण हॉटेल मध्ये अन्न टाकतात व यावर स्पष्टिकरणही देतात, त्यात काय आम्ही पैसे दिलेत त्याचे ,
पण पैसे देवून अन्न वाया घालवणे पण अयोग्यच आहे ना? कारण देवकृपेने आपण दोन वेळचे पोटभर जेवतोय पण असे अनेक जण आहेत जे अन्नाअभावी कुपोषित होवून प्राण त्यागतात
शेवटी अन्न हा ऊर्जा स्त्रोत आहे व ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे ऊर्जा फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात परावर्तित करू शकतो. पण अन्न वाया घालवून आपण ही ऊर्जा कवडीमोल करतोय.
महिंद्रा नाशिक प्लांट मध्ये मी कॅंटीन कमीटिवर होतो
तेथे अत्यल्प 300 रु मंथली कटिंग मध्ये सर्व कर्मचाऱ्यांना जेवण नाश्ता उपलब्द होतो ,तेथे एका कैंटीन कमिटी मीटिंग मध्ये रोजचे वाया जाणारे उष्टे अन्न यावर चर्चा झाली
1200 ते 1500 kg ते पण एका वेळी म्हणजे आम्ही जवळ जवळ 3000 kg दर दिवशी उष्टे अन्न वाया घालवत होतो ,
चांगले उरलेले अन्न आमचा कैंटीन कॉन्ट्रैक्टर जवळच्या 3 अनाथआश्रमात जेवण पोचवायचा त्यामुळे फक्त उष्टे अन्न वाया जाऊ न देणे हेच आमचे ध्येय ठरले
आमची यावर खुप चर्चा करून आम्ही सर्व कंपनीत जनजागृति करायची ठरवली
त्या माध्यमातून आम्ही पोस्टर बनवले ,अन्न वाया घालवु नका , अन्न ताटात टाकू नका असे पोस्टर प्रत्येक नोटिस बोर्ड , प्रत्येक लंच ,ब्रेकफास्ट टेबल वर लावले
लोकांच्या मीटिंग्स घेवून अन्न टाकू नका आवाहन केले व कैंटीन मध्ये कालचे उष्टे अन्न किती टाकले याचा तपशील मोठ्या बोर्ड वर लिहायला चालु केले
सर्वांचा पॉझिटिव्ह परिणाम मिळाला , 20 दिवसात आम्ही रोजच्या 3000 kg उष्टे अन्नवरून आम्ही फक्त 30-50 kg अन्न वेस्ट वर आणण्यात यशस्वी झालो
शेवटी बचत हीच निर्मिति नाही का?
काही दिवसापूर्वी मोदीजी,आपले पंतप्रधान संसद कैंटीन मध्ये भेट दिल्यावर तेथील गेस्ट बुक मध्ये अन्नदाता सुखी भवः असा शेरा लिहून सर्वप्रति कॄतज्ञता व्यक्त केली व तेव्हा आपल्या छोट्या मुलाखतीत हाच संदेश दिला की उदरभरण करताना अन्न वाया घालून असंख्य लोकांचा अपमान करू नका.
चला तर मित्रांनो,
आज या पवित्र श्रावण महिन्यात सर्वजण एक शपथ घेवुया की
"मी अन्नग्रहण करताना अन्नदाता सुखी भवः या उक्तीची आठवण ठेवून अन्न , पाणी वाया घालवणार नाही,
अन्न उरणार नाही व वाया जाणार नाही याची काळजी स्वयंपाक करताना घेईन,
एखादया समारंभात पदार्थ, अन्न उरलेच तर गरजू लोकांना , अनाथश्रमात देईन,
सर्व दृश्य अदृश्य असंख्य हातांच्या मेहनतीचा आदर ठेवून अन्न हे ऊर्जा स्त्रोत आहे हे लक्षात घेवून त्याचा जपून वापर करेन,
व ही चांगली सुरुवात माझ्या स्वतः पासून , माझ्या कुटुंबापासून करून हा विचार समाजात पसरवायला हातभार लावेन."
चला रोज तृप्तिचा ठेकर देताना सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करून,त्यांना धन्यवाद देवून म्हणुया "अन्नदाता सुखी भवः"
--निलेश जोशी
No comments:
Post a Comment