आज एक किर्तन ऐकायचा योग आला , घाग बुवा यांचे चिरंजीव शरदबुवा घाग नृसिंह वाड़ी यांचे चिंचवडला किर्तन होते.
त्यात त्यांनी अतिशय सुंदर शब्दात शब्दांचे सामर्थ्य व बळ समजावून सांगितले, शब्द रत्ने आहेत (धन अशा अर्थी) तशीच ती शस्त्रेही ( शब्दाने माणूस तुटू शकतो अशा अर्थी )आहेत
त्यात त्यांनी शब्दाचे महत्त्व सांगताना एक गोष्ट सांगितली.
एक भगिनी चालत येत होती व तिच्या कानातून रक्त येत होते , म्हणून तिच्या मैत्रिणीने काळजीने विचारले की कानाला इजा कशी झाली ?
त्यावर त्या हुशार , साहित्यिक व विद्याप्रविण भगिनीने खालील पद्य रचना ऐकवून दाखवली,
अलिकुलवहनाचेवाहन आणीत होते
शशीधरवाहनाने ताडिले मार्ग पंथे
नदीपतीरिपु त्याचा तात भंगोनी गेला
रविसूत महीसंगे फार दुःखित झाला
मैत्रिणीला काहीही समजले नाही की ह्या पद्द्याचा व कानाला इजा होण्याचा काय संबंध ??
त्यावर त्या भगिनीने हे कूट सोडवून सांगितले
अलिकुलवहनाचेवाहन आणीत होते
अलि म्हणजे भुंगा (हृदयाम्बुज़ि लीन लोभी अलि हां)
अलि कुल म्हणजे भुंग्याचा समूह
अलिकुलवाहनाचे म्हणजे असा समूह वाहन करतो असे ठिकाण म्हणजे कमळ
वाहन - कमळाचे वाहन म्हणजे पाणी
म्हणजे ही भगिनी पाणी आणत होती
शशीधरवाहनाने ताडिले मार्ग पंथे
शशी धर म्हणजे शंकर
त्याचे वाहन नंदी म्हणजे बैल
त्याने ताडिले मार्ग पंथे
म्हणजे बैलाने वाटेत धक्का दिला
नदीपतीरिपु त्याचा तात भंगोनी गेला
नदी पती म्हणजे समुद्र
समुद्राचा रिपु शत्रु म्हणजे एका पळीत समुद्र पिणारे अगस्ति ऋषि
अगस्ति ऋषींचा तात त्यांचे नाव कुंभ
म्हणजे डोक्यावरचे कुंभ - मडके फुटले
रविसूत महीसंगे फार दुःखित झाला
रविसूत म्हणजे कर्ण म्हणजे कान
महीसंगे म्हणजे जमिनीवर खरचटल्यामुळे
फार दुःखित झाला म्हणजे कानाला ईजा झाली
कित्ती सुंदर होते आपले साहित्य ??
एक मराठी भाषेचा वेगळा पैलू पहायला मिळाला व हे फक्त अभ्यास करून किंवा किर्तन प्रवचन यातूनच शिकायला ऐकायला मिळेल नाही का ???
-- निलेश जोशी
No comments:
Post a Comment