Tuesday, June 2, 2015

आज दुर्मिळ झालेले अलौकिक नेतृत्व… ! मंगेश नाबर


भारतातल्या राजकारणी पुढा-यांचे आज अवमूल्यन झाल्याचे आपण पाहतो. त्यांच्यात नेतृत्वाचे गुण नसतात, सारे भ्रष्टाचाराने लडबडलेले असतात आणि विशेष म्हणजे त्यांना आपण आणि आपले कुटुंबीय सोडले तर इतरांबद्दल कोणत्याही प्रकारची कळकळ अथवा ममत्व नसतेच मुळी. परंतु आज अशीही एक व्यक्ती या देशात आहे की तिने आपल्या अलौकिक गुणांनी देशवासीयांवर चांगलाच प्रभाव पाडला आहे. आज जरी या व्यक्तीने निवृत्ती घेतली आहे तरी त्यांची एक आठवण येथे देण्याचा मोह आवरत नाही.
थुंबा या आपल्या देशातील रॉकेट्स सोडणा-या सुप्रसिद्ध केंद्रातले शास्त्रज्ञ आपापले काम दिवसाचे १२ ते १८ तासांच्या परिश्रमाने पार पाडत होते. त्यावेळची ही आठवण आहे. त्या केंद्रात तेव्हा सुमारे ७० शास्त्रज्ञ त्या प्रकल्पामध्ये कार्यरत होते. कामाचा प्रचंड ताण आणि त्यांच्या मुख्याधिका-यांच्या मागण्या यांनी सगळे शास्त्रज्ञ खरोखर त्रासून गेले होते. तरीही ते सारेच्या सारे, मुख्याधिकारी असलेल्या एका बुद्धिमान संशोधकावर  निष्ठा ठेवून काम करीत होते. आपले काम सोडून जाण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नव्हता.
एके दिवशी एक सहकारी या मुख्याधिका-याकडे आला आणि म्हणाला, ” सर, आज मी माझ्या मुलांना आपल्या शहरातल्या प्रदर्शनाला न्यायचं काबुल केलं आहे. मी संध्याकाळी साडे पाचला निघू का ? “
साहेबांनी परवानगी दिली आणि तो सहकारी आपल्या कामात गढून गेला. दुपारच्या जेवणानंतर तो काम करीत राहिला आणि नेहमीप्रमाणे कामात इतका गर्क झाला की त्याला घरी जाण्याची आठवण जेव्हा झाली तेव्हा घड्याळात पाहतो, तर रात्रीचे साडे आठ झाले होते.
त्याला आपण मुलांना वाचन दिल्याचे आठवले. त्याने साहेबांच्या खुर्चीकडे नजर टाकली, तर तेथे कोणीच नव्हते. मग या सहकारी शास्त्रज्ञाने आपले सारे आवरले आणि तो घरी जायला निघाला. घरी पोचतांना त्याला मुलांना निराश केल्याची बोच जाणवत होती. त्या अपराधित्वाच्या भावनेने त्याने घरचा दरवाजा ठोठावला. घरात मुले दिसली नाहीत. त्याची पत्नी दिवाणखान्यात मासिक वाचत बसली होती. आता आपण काही बोललो तर वातावरणात मोठा स्फोट होईल म्हणून आमचा हा शास्त्रज्ञ काहीही न बोलता मुकाट्याने कपडे बदलायला आतल्या खोलीत जाऊ लागला.
तेवढ्यात पत्नीने विचारले, ” आपण कॉफी घेणार की भूक लागली असेल तर सरळ जेवण वाढायला घेऊ का ? “
पतीराजांनी भीत भीत म्हटले, ” हो, तुलाही कॉफी हवी असेल तर घेईन की मी ! आणि मुलं कुठायत ? “
त्याच्या या प्रश्नाचे पत्नीला आश्चर्य वाटलेले दिसले. तिनेच प्रश्न केला,
“म्हणजे तुम्हाला माहित नाही ? “
“कसली माहिती ? ” पतीने प्रश्न केला.
” अहो, तुमचे साहेब आपल्या घरी सव्वा पाचला आले आणि मुलांना प्रदर्शनाला घेऊन गेले ! “
इथे प्रत्यक्षात असे घडले होते की साहेबांनी आपल्या सहका-याला लवकर जाण्याची परवानगी दिली होती पण त्यांना हेसुद्धा दिसले की हा सहकारी सायंकाळी ५ च्या नंतर कामात गढून गेला आहे. त्यांना पुरेपूर ठाऊक होते, की हा माणूस, जरी त्याने आपल्या मुलांना प्रदर्शनाला नेण्याचे वाचन दिले असले तरी आता आपले काम पूर्ण केल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही.
मग त्यांनीच निर्णय घेतला आणि त्या प्रदर्शनाला जाण्यासाठी आतुर झालेल्या त्याच्या मुलांना आपण न्यायचे ठरवले. एखाद्या संस्थेचा प्रमुख अशा प्रकारचे औदार्य आणि कनवाळू वृत्ती आपल्या सहका-याबद्दल दाखवेल का ? असे आगळेवेगळे झाल्यावर कुणाला त्यांच्याविषयी आदर नि निष्ठा वाटणार नाही ? थुंबाच्या या शास्त्रज्ञांना ठाऊक होते की आपल्याला लाभलेला हा बॉस आपली काळजी वाहणारा आहे आणि म्हणून ठुन्बाचे सर्व शास्त्रज्ञ प्रकल्पाच्या कामाचा कितीही ताण पडला तरी त्या बॉसच्या हाताखाली कसलेही काम पार पाडण्यास एका पायावर तयार असत.
हा असा आगळावेगळा बॉस कोण होता, हे ओळखा बरे ?
होय, माझ्या प्रिय मित्रांनो, ते होते आपले माजी राष्ट्रपती माननीय ए. पी. जे. अब्दुल कलाम.

No comments: