Tuesday, May 19, 2020

भरवसा कविता

श्री सद्गुरवे नमः

श्रीसद्गुरुच सर्व करवून घेतात ,आणि तेच लिहवून घेतात ,आपले सौभाग्य की ते आपल्याला लेखनिक व्हायची संधी देतात.
      हा अनुभव सध्या चैतन्य चिंतन ही लेखमालिका लिहीतोय या संदर्भातील.मूळ लेखमालिकेच्या यादीमध्ये लेख क्रमांक 43 ते 48 हे लेख दिललेच नव्हते म्हणजे त्या वेबसाईटवर उपलब्द नाहीत.लेख 42 पर्यंत एकाच बैठकीत श्रीसद्गुरूंनी ६ लेख लिहून घेतल्याने काळजी नव्हती.पण जेव्हा समजले ज्या लेखमालिकेतून मी संदर्भ व गोषवारा घेतो ते ६ लेखच गायब. मी क्षणभर घाबरलो ,आता संदर्भ कोणता घेणार आणि लिहिणार काय? त्यात लेख ४३ मी कसाबसा लिहिला पण मनाला पटत नव्हता ,कारण तो श्रीसद्गुरूंनी सुचवला नव्हता. लेख ४३ प्रसिद्ध करायच्या दिवशी नोटस मध्ये लिहिलेला लेख नव्हता ,म्हटलं श्रीसद्गुरूंना माझ्याकडून नवीन लिहून घ्यायचे असेल आणि अक्षरश सदगुरूंचे नाव घेऊन तो लेख लिहिला व अनेकांना तो लेख आवडला.आता पुढील ४ लेख कसे लिहिणार ही काळजी होती ,संध्याकाळी नित्योपासना म्हणून झाली ,श्रीसदगुरूंना प्रार्थना केली.दुसऱ्या दिवशी पहाटे गॅलरीत चिमण्या दाणा पाणी खायला आल्या आणि सद्गुरुकृपेने एक कविता स्फुरली ,झरझर लिहून काढली आणि मग मनात विचार आला ,सद्गुरूंनी या ८ कडवी लिहून घेतली व ४ लेख लिहायचा संदर्भ दिला. मूळ लेख नाहीत म्हणून ही सदगुरूंनीच योजना केली आहे.खुप आनंद झाला ,त्यादिवशीचा लेख अवगुण सद्गुरूरनीच लिहून घेतला होता. त्यापुढील ४ लेख असेच श्रीसद्गुरूंनी एक बैठकीत लिहून घेतले आणि मनाला विश्वास मिळाला की सदगुरु सदोदित सोबत आहेतच.कालच प्रज्ञताईने छान लिहिताय यावर मी श्रीसद्गुरुच लिहून घेतात असे लिहिले ,तेव्हा हा प्रसंग लिहायचा होता ,पण नंतर सेपरेट पोस्ट करू असे ठरवले.
सद्गुरू कृपेने स्फुरलेली कवीता मागील 4 लेखात दिली ,ती आज सलग देतो आणि श्रीसद्गुरूंना वंदन करून असेच साहित्य लिहून घ्या अशी मनःपूर्वक विनंती करतो.

*भरवसा*

*गाईंचा कळप चरतो माळरानावर, आपली भूक भागवतात*
*म्हशी जातात पाणवठ्यावर, पाण्यात छान डुंबून घेतात*
*गवत विषारी की पाणी गढूळ, चिंता त्यांना कधीच नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*कोकिळा छान करते रियाझ,तिला गरम पाणी लागत नाही,*
*पोपटाचा रंग हिरवा,त्याला लिपस्टिक मेकअप चालत नाही*
*घश्याची व दिसण्याची काळजी, प्राणी कधीच करत नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*चिमण्या येतात खिडकीत,मस्त दाणेपाणी टिपून जातात*
*गल्लीतील कुत्रेही येऊन, रस्त्यावरची पोळी खाऊन जातात*
*दाणे तुटके,पोळी करपली याची चिंता ते करत नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*कोल्हे,लांडगे मांसाहारी तरीही ते जंगलातच राहतात*
*हत्ती ,हरीण शाकाहारी तेदेखील जंगलातच असतात*
*मेनू वेगळा म्हणून कोणी वेगळी रेस्टोरंट शोधत नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*मोर म्हणतो,मनाला येईल तेव्हा सरावाशिवाय मी नाचतो*
*बगळा शांत समाधी लावून हळूच मासे टिपून घेतो*
*ही स्किल्स यायला त्यांना, क्लास लावायला लागत नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*गरुड घेतो उंच भरारी ,मस्त तोल सावरत जातो*
*सुतारपक्षी कठीण खोडात, कोरून छान ढोल बनवतो*
*पडेन मी ,चोच तुटेल याची भीती त्यांना वाटत नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*इतके प्राणी ,इतके पक्षी हे उपाशी कधी झोपले का?*
*उद्याची चिंता असूनही त्यांनी साठेबाजी केली का?*
*माणसाची शंका घ्यायची वृत्ती ह्यांची कधी दिसत नाय*
*प्रपंचात सद्गुरूंच सर्व देणार,यावर त्यांचा भरोसा हाय*

*उद्याच काय, पुढच्या पिढीचं काय ,कोडं प्राण्यांना का नाही?*
*शास्त्रद्यांनी शोध लावला की,म्हणे त्यांना ब्रेनच नाही*
*मेंदू असलेला माणूस तरी इतकी युगं सुधारला काय?*
*कारण प्रपंचात सद्गुरूंच देईल यावर त्याचा भरोसा नाय*

जय साईराम
 सद्गुरुदास निलेश जोशी

No comments: