बोल बच्चन #निलूउवाच
किती बडबड चालली आहे रे ,जरा गप्प राहा की ,नुसती टकळी चालू ,नशीब त्या देवाने ते तोंड चामड्याचे बनवले ,मातीचे बनवले असते तर आतापर्यंत फुटून गेले असते -- थोरामोठ्यांचे उद्गार
असे उद्गार ऐकत मोठे झालो आपण ,हमखास आयुष्यात हा संवाद ऐकला नाही याला अपवाद फार कमी असतील ,जे इतर अपवादात्मक असतील जे अपंग किंवा दिव्यांग श्रेणीतील .
पण खरंच नीट बघितले तर किती बोलतो आपण दिवसभरात ,महिन्याभरात ,वर्षभरात . हे सिद्ध झालेय की 70% बडबड ही अनावश्यकच असते आणि उरलेल्या 30% बडबडीला 10% मध्ये संपवू शकतो पण तरीही आपण बोलतो .
संवाद साधणे आणि त्यासाठी बोलणे हे आवश्यकच पण किती बोलणे हे आपल्या हातात आहे की नाही?
मला तर अशीच वाईट खोड होती की कोणी काही विचारले तर त्याचे उत्तर सविस्तर द्यायचे म्हणजे त्याचा इतिहास ,मला कसा समजला , माझे मत ,इतरांचे मत आणि मग एकदम शेवटी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर , पण यात वेळ वाया गेलाच बरोबर समोरचा माणूस वैतागून जाण्याचा धोका अधिक. पण नंतर समजायला लागले की सगळे थोडक्यात व सुटसुटीत पाहिजे तेवढीच माहिती देता येतेच आणि त्यासाठी पाल्हाळ लावायची काहीच गरज नसते .
8-9 वर्षांपूर्वी मंगेश पाडगावकर यांची मुलाखत ऐकली मालाड वाचनालयात. पाडगावकर महणजे बडबडगीते व बोलगीतांचा बादशाह. तसे मराठी साहित्यात पाडगावकर, विंदा ,गदिमा ,शांताबाई यांची बडबडगीते खूप प्रसिद्ध आहेत पण मंगेश जी त्या मुलाखतवजा कार्यक्रमात म्हणाले "बडबडगीते म्हणजे काय? तर मुलांचा चाळा ,त्यांना नवीन बोलायला आलेले असते मग बडबड करत राहायची ,त्या सवयीत गीते लिहिली म्हणण्यासाठी तर झाली बडबडगीते .बोबड्या बोलतील गाणी म्हणूया हवे तर....
बडबडमध्ये बड शब्द दोनवेळा आला ज्याला स्वतंत्र अर्थ काहीच नाही पण मग जेव्हा बड शब्द 2वेळा येतो तेव्हा तो निरर्थक शब्दही अर्थशील होऊन जातो".किती सुंदर विचार ना ?
असे हे बडबडणे आणि अशी माझी बडबड , अरे हो सांगायलाच विसरलो ,हे सगळे सुचले कशावरून तर खाली आलेल्या वाक्यावरून ,आहे इंग्रजीत पण एकदम अर्थपूर्ण
Speak only when your words are more beautiful than the Silence
जेव्हा शब्द हे शांततेपेक्षा सुंदर असतील तेव्हाच बोला
थोडक्यात काय
बडबड टाळा ,मौन पाळा
बडबडीला लावा टाळा
शांतता हीच सुंदरता माना
अनावश्यक बोलणे टाळा
-- निलेश जोशी
No comments:
Post a Comment