Sunday, January 14, 2018

यशाचे रहस्य #निलउवाच

यश म्हणजे काय? प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी. काहींसाठी पैसा हा मापदंड तर काहींसाठी समाजात मानसन्मान महत्वाचा.
याशिवाय जोडलेली मित्रमंडळी आणि भरपूर कर्तृत्व म्हणजे यश.त्याबरोबरच
व्यक्तिगत व व्यावसायिक संदर्भात यशाच्या संदर्भातील धारणा म्हणजे काहीच्या मते अधिकाधिक उद्दिष्टपूर्ती साध्य करणे. कुणाच्या मते व्यक्ती वा व्यावसायिक संदर्भात ध्येयाकडे यशस्वी वाटचाल करणे म्हणजे यश व काहीच्या मते व्यक्तीचे आपल्या आयुष्यात इतरांना आपापल्यापरी व यथासंभव मदत करणे म्हणजे यश.
यावरूनच ‘यशा’चे वेगवेगळय़ा संदर्भात अर्थ स्पष्ट होतात.
असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक स्त्री असते , 80% हे वाक्य खरेही आहे कारण एका व्यक्तीला,पुरुषाला घडवण्यात त्याची आजी,आई ,बायको ,बहीण सर्वांचा हातभार असतोच .पण त्याचबरोबर या स्त्रीशक्तीसोबत अनेक पुरुष सुद्धा त्यांचे योगदान देत असतात जसे आजोबा,वडील,भाऊ,शिक्षक,मित्र व अनेक आजूबाजूचे लोक.
या सर्वांच्या मदतीने किंवा सहभागाने खरं तर माणूस अनुभवाने मोठा होतो,समृद्ध होतो आणि हाच अनुभवांचा ठेवा त्याची वाटचाल यशस्वीतेकडे करतो.
काल एक हिंदी वाक्य वाचले व त्यावरून वरील सर्व सुचले,ते वाक्य होते, "वोह धागा ही था जिसने छिपकर पुरा जीवन मोतियों को दिया और ये मोती अपने तारीफ पर इतरते रहे उम्रभर"

किती वास्तववादी आहे ना हे वाक्य, मोठे मोठ्या व्यक्ती जसे पु.ल.देशपांडे,अब्दुल कलाम ,नारायण मूर्ती ,सावरकर ,टिळक,आंबेडकर,ज्योतिबा फुले,विवेकानंद,गांधीजी हे सर्व म्हणजे त्यांच्या क्षेत्रात कर्तृत्वाने मोतीच आहेत पण त्यांच्या मोत्याच्या झळालीला एकत्र गुंफून ठेवले त्या मागील अनेक व्यक्तींनी ,विशेष करून महिलांनी.
"आहे मनोहर तरी" सारखे पुस्तक वाचले की हे विशेष जाणवते. शेवटी या धाग्याचे महत्वाचे काम करणाऱ्या असंख्य व्यक्तिमत्वांना ना विसरता त्यांनाही मोतीच्या माळेने महत्व नको का द्यायला? कारण स्पष्ट आहे जेव्हा हा धागा तुटेल तेव्हा मोती विखुरले जातील आणि क्षणात मातीमोल होतील. आपल्याही आयुष्यात अशी धाग्याची माणसे आहेतच ,त्यांचे महत्व लक्षात घेऊन त्यांनाही आपण  आपल्या आयुष्यात सर्वोत्तम मान देऊया, कृतज्ञता व्यक्त करूया व नेहमी या धाग्यांचे महत्व लक्षात ठेवूनच वागूया. काय पटतंय ना?
-- निलेश जोशी

No comments: