Sunday, August 7, 2016

दिव्यानुभव 3

#दिव्यानुभव

गजानन विजय 18 व्या अध्यायात खामगाव वासी डॉक्टर राजाराम कवर यांची कथा आहे , काहीसा तसाच अनुभव मला स्वतःला आलेला आहे.
हि माझी लग्न व्हायच्या आधीचा अनुभव ,साधारण 2003 ला पुण्यात मी जॉब करत होतो व स्वतःचा फ्लॅट घेतल्यावर तेथे एकटाच राहायचो.
         पायाला अवघड जागी मला फोड आला होता व त्यामुळे चालताना खूप त्रास व्हायचा. फोड लहान होता तोपर्यंत मी कंपनीत जायचोे व डॉक्टरनी दिलेले मलम लावायचो , होईल कमी असे वाटले होते पण हळूहळू फोड खूपच मोठा झाला व त्यात पु झाल्याने खूप वेदना व्हायच्या , तरी पण रोजच्या नामस्मरणात दिवस ढकलत होतो.
एके दिवशी सकाळी उठलो पण चालायलाही जमेना . त्या दिवशी नेमकी पौर्णिमा होती , सकाळी उठून कंपनीत कळवले कि आज येऊ शकत नसल्याने सुट्टी घेत आहे .गादीवर पडून विचार केला कसा हा फोड कमी होणार व डॉक्टर कडे जायचे म्हटले तरी कसे जाणार ?
      साधारण सकाळचे 7 वाजले , घरात असलेले सफरचंद खाल्ले , पाणी प्यालो व अचानक देव्हाऱ्याकडे लक्ष गेल्यावर पौर्णिमा असल्यान गजानन विजय ग्रंथाचेे पारायण करण्याचे मनात आले.अनायासे सुट्टी घेतलीच होती व मन दुसरीकडे गेल्यावर वेदनांचा विसर पडेल हा मूळ उद्देश ,
लागलीच सर्व आवरून आंघोळ करून देवघरात आलो व पूजा करून संकल्प करून पारायण चालू केले , अर्थात एकाच दिवसात पारायण संपवायचे होते , पौर्णिमा होती व भूकही लागली नव्हती ,
हाहा म्हणता संध्याकाळी 6 वाजता 21 अध्याय संपवले .
साधारण 4.40 ला 18 व अध्याय सुरु झाला आणि म्हणताना खूप चूका होऊ लागल्या ,
असे झाले की मी ती ओवी पुन्हा एकदा पूर्ण  वाचतो , 18 व्या अध्यायातील खामगाव वासी राजाराम कवर याना फोड झाला व अंगारा लावल्यावर त्याचा फोड फुटला या वर्णन असलेल्या सर्व ओव्या मला 2-3 वेळा वाचाव्या लागल्या .
सर्व अध्याय संपवले व आरती केली , साखर व सफरचंद नैवेद्य म्हणून दाखवले व पारायण समाप्ती केली.
शांतपणे बसलो असता पारायण वाचताना मी जेवढ्या अगरबत्ती लावल्या होत्या त्याचा अंगारा एका डबीत भरून ठेवला व  क्षणात आठवले 18 व्या अध्यायातील चूक झाल्यामुळे पुन्हा पुन्हा वाचलेल्या ओव्या , गजानन प्रसाद अंगाऱ्याने जर राजाराम कवर बरे होऊ शकतात तर पारायण करताना जमलेला अंगारा हाही गजानन प्रसादच आहे .
मी क्षणभर शहारलो व तो अंगारा हातावर घेऊन त्यात थोडे पाणी मिसळून माझ्या झालेल्या फोडावर चोळला  व थोडा अंगारा पाण्यात मिसळून तीर्थ म्हणून प्यालो,
थोड्या वेळाने बाहेर जाऊन चहा , नाष्टा केला व थोडी फळे घेऊन घरी आलो .
21 मोदकाऐवजी 21 फळांचा नैवेद्य दाखवला व बेडवर पडलो आराम करायला , शांत झोप लागली साधारण 9 वाजता जाग आली तेव्हा लक्षात आले फोड फुटून साफ झाला आहे व वेदनाही कमी झाल्यात .
महाराजांना नमस्कार करून त्यांना दाखविलेल्या नेवेद्यातील काही फळे प्रसाद म्हणून खाल्ली व पुन्हा नामस्मरण करत झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी खूप आराम पडला होता व कामावर सुद्धा जाऊ शकलो व पुढील 3-4 दिवसात तो फोड निमुन सर्व त्रास नाहीसा झाला.

जय गजानन , गण गण गणात बोते

No comments: