Friday, September 15, 2023

झेन कथा - गाडीवाला व त्याचे तत्वज्ञान

झेन कथा

'हे पाहा, गाडी सांभाळून हाक. फार मोठे संन्यासीमहाराज बसणार आहेत
मागे. आत्मनिग्रहासाठी १०८ दिवस पाण्याचा थेंबही न घेता उपोषण करतात
ते. नुसत्या फरशीवर झोपतात, अनवाणी चालतात. फार  मोठी विभूती आहे,'
असं भक्ताने बग्गीवाल्याला सांगितलं.

'बरं बरं, काळजी करू नका,' म्हणून कोचवानाने घोडे जुंपले आणि बग्गी
निघाली. बग्गीच्या संथ चालीनं आणि घोड्यांच्या टापांच्या लयबद्ध
आवाजानं संन्यासी महाराजांचा हलकासा डोळा लागला.

ते ताडकन् जागे झाले तेव्हा कोचवान चाबकाचे सपकारे ओढत होता. त्यांनी
पडदा सारून पाहिलं, तर तो बग्गीवर चाबूक ओढत होता. त्यांनी विचारलं,
काय झालं?

'काही नाही, एका खड्ड्यात चाक फसलंय, गाडी हलतच नाहीये.'

'अरे मग, बग्गीवर चाबूक ओढून ती हलेल का, घोड्यांवर चाबूक ओढायला हवा.'

'असं आहे होय? म्हणजे आतापर्यंत मी तसंच करत होतो. पण, तुमच्याकडे
पाहून वाटलं की ती पद्धत चुकीची असणार…'

हिर्र करून घोड्यांकरवी बग्गी खड्ड्याबाहेर काढल्यावर कोचवान प्रश्नार्थक
मुद्रेने पाहणाऱ्या संन्यासीबुवांना म्हणाला, 'अहो, तुम्ही मन ताब्यात आणण्यासाठी शरीराला कष्टवता ना! ते पाहून मला वाटलं की 
घोड्यांऐवजी बग्गीवर ओढून पाहावा चाबूक!'

Monday, August 9, 2021

श्रीशिवलिलामृत अध्याय अकरावा

श्रीशिवलिलामृत अध्याय अकरावा
श्रीगणेशाय नमः ॥
धन्य धन्य तेचि जन । जे शिवभजनीं परायण ।
सदा शिवलीलामृत श्रवण । अर्चन सदा शिवाचे ॥ १ ॥
सूत म्हणे शौनकादिकांप्रति । जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती ।
त्यांच्या पुण्यास नाहीं मिती । त्रिजगतीं तेचि धन्य ॥ २ ॥
जोसहस्र रुद्राक्ष करी धारण । त्यासी वंदिती शक्रादि सुरगण ।
तो शंकरचि त्याचें दर्शन । घेतां तरती जीव बहु ॥ ३ ॥
अथवा षोडश षोडश दंडी जाण । बांधावे रुद्राक्ष सुलक्षण ।
शिखेमाजी एक बांधावा पूर्ण । शिवस्वरुप म्हणवुनी ॥ ४ ॥
त्यावरोनि करितां स्नान । तरी त्रिवेणी स्नान केल्यासमान ।
असो द्वादश द्वादश मनगटीं पूर्ण । रुद्राक्ष बांधिजे आदरे ॥ ५ ॥
कंठी बांधावे बत्तीस । मस्तकाभोंवते चोवीस । 
सहा सहा कर्णीं पुण्य विशेष । बांधितां निर्दोष सर्वदा ॥ ६ ॥
अष्टोत्तरशत माळ । सर्वदा असावी गळां ।
एकमुखी रुद्राक्ष आगळा । पूजितां भाग्य विशेष ॥ ७ ॥
पंचमुख षण्मुख अष्टमुख । चतुर्दशमुख लक्ष्मीकारक ।
सकळ मंत्र सुफळ देख । रुद्राक्षजप नित्य करितां ॥ ८ ॥
नित्य रुद्राक्षपूजन । तरी केलें जाणिजे शिवार्चन ।
रुद्राक्षमहिमा परम पावन । इतिहास ऐका येविषयीं ॥ ९ ॥
काश्मीर देशींचा नृप पावन । नामाभिधान भद्रसेन । 
विवेकसंपन्न प्रधान । परम चतुर पंडित ॥ १० ॥
प्रजा दायाद भूसुर । धन्य म्हणती तोचि राजेश्र्वर ।
लांच न घे न्याय करी साचार । अमात्य थोर तोचि पैं ॥ ११ ॥
सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी । पूर्वदत्तें ऐसी लाघिजे कामिनी ।
सुत सभाग्य विद्वान गुणी । विशेष सुकृतें पाविजे ॥ १२ ॥
गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर । शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार ।
वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार । विशेष सुकृतें लाहिजे ॥ १३ ॥
श्रोता सप्रेम चतुर सावधान । यजमान साक्षेपी उदार पूर्ण ।
काय आरोग्य सुंदर कुलीन । पूर्वसुकृतें प्राप्त होय ॥ १४ ॥
असो तो भद्रसेन आणि प्रधान । बहुत करितां अनुष्ठान ।
दोघांसी झाले नंदन । शिव भक्त उपजतांचि ॥ १५ ॥
राजपुत्र नाम सुधर्म । प्रधानात्मज तारक नाम ।
दोघे शिवभक्त निःसीम । सावधान शिवध्यानीं ॥ १६ ॥
बाळें होऊनि सदा प्रेमळ । अनुराग चित्तीं वैराग्यशीळ ।
लौकिकसंगे ध्रुव अमंगळ । त्यांची संगती नावडे त्यां ॥ १७ ॥
पंचवर्षी दोघे कुमर । लेवविती वस्त्रें अलंकार ।
गजमुक्तमाळा मनोहर । नाना प्रकारें लेवविती ॥ १८ ॥
तंव ते बाळ दोघेजण । सर्वालंकार उपाधी टाकून ।
करिती रुद्राक्ष धारण ।भस्म चर्चिती सर्वांगीं ॥ १९ ॥
आवडे सर्वदा एकांत । श्रवण करिती शिवलीलामृत ।
बोलती शिवनामावळी सत्य । पाहाणें शिवपूजा सर्वदा ॥ २० ॥
आश्र्चर्य करिती राव प्रधान । यांसी कां नावडे वस्त्रभूषण ।
करिती रुद्राक्षभस्म धारण । सदा स्मरण शिवाचें ॥ २१ ॥
विभूति पुसोनि रुद्राक्ष काढिती । मागुती वस्त्रें भूषणें लेवविती ।
ते सवेंचि ब्राह्मणांसी अर्पिती । घेती मागुती शिवदीक्षा ॥ २२ ॥
शिक्षा करितां बहुत । परी ते न सांडिती आपुलें व्रत ।
राव प्रधान चिंताग्रस्त । म्हणती करावें काय आतां ॥ २३ ॥
तों उगवला सुकृतमित्र । घरासी आला पराशर ।
सवें वेष्टित ऋषींचे भार । अपर सूर्य तेजस्वी ॥ २४ ॥
जो कृष्णद्वैपायनाचा जनिता । त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टिकर्ता ।
जो वसिष्ठाचा नातू तत्त्वतां । राक्षससत्र जेणें केलें ॥ २५ ॥
जेवीं मनुष्यें वागती अपार । तैसेचि पूर्वीं होते रजनीचर ।
ते पितृकैवारें समग्र । जाळिले सत्र करुनियां ॥ २६ ॥
जनमेजयें सर्पसत्र केलें । तें आस्तिकें मध्येंचि राहविलें ।
पराशरासी पुलस्तीनें प्रार्थिलें । मग वांचले रावणादिक ॥ २७ ॥
विरंचीस दटावूनि क्षणमात्रें । प्रतिसृष्टि केली विश्र्वामित्रें ।
तेवीं पितृकैवारें पराशरें । वादी जर्जर पैं केले ॥ २८ ॥
ते सांगावी समूळ कथा । तरी विस्तार होईल ग्रंथा । 
यालागीं ध्वनितार्थ बोलिलों आतां । कळलें पाहिजे निर्धारें ॥ २९ ॥
ऐसा महाराज पराशर । ज्याचा नातू होय शुक योगींद्र । 
तो भद्रासेनाचा कुळगुरु निर्धार । घरा आला जाणोनी ॥ ३० ॥
राव प्रधान सामोरे धांवती । साष्टांग नमूनि घरासी आणिती ।
षोडशोपचारीं पूजिती । भाव चित्तीं विशेष ॥ ३१ ॥
समस्तां वस्त्रें भूषणें देऊन । राव विनवी कर जोडून ।
म्हणे दोघे कुमर रात्रंदिन । ध्यान करिती शिवाचें ॥ ३२ ॥
नाचडती वस्त्रें अलंकार । रुद्राक्षभस्मावरी सदा भर ।
वैराग्याशील अणुमात्र । भाषण न करिती कोणासीं ॥ ३३ ॥
इंद्रियभोगावरी नाहीं भर । नावडे राजविलास अणुमात्र ।
गजवाजियानीं समग्र । आरुढावें आवडेना ॥ ३४ ॥
पुढें हे कैसें राज्य करिती । हें आम्हांसी गूढ पडलें चित्तीं ।
मग ते दोघे कुमर आणोनि गुरुप्रती । दाखविले भद्रसेनें ॥ ३५ ॥
गुरुनें पाहिलें दृष्टीसीं । जैसे मित्र आणि शशी ।
तैसे तेजस्वी उपमा तयांसी । नाहीं कोठें शोदहितां ॥ ३६ ॥
यावरी बोले शक्तिसुत । म्हणे हे कां झाले शिवभक्त ।
यांची पूर्वकथा समस्त । ऐक तुज सांगतो ॥ ३७ ॥
पूर्वी काश्मीर देशांत उत्तम । महापट्टण नंदिग्राम ।
तेथील वारांगना मनोरम । महानंदा नाम तियेचें ॥ ३८ ॥
त्या ग्रामींचा तोचि भूप । पृथ्वीमाजी निःसीम स्वरुप ।
ललिताकृति पाहोनि कंदर्प । तन्मय होवोनि नृत्य करी ॥ ३९ ॥
जैसा उगवला पूर्णचंद्र । तैसें तिजवरी विराजे छत्र ।
रत्नखचित यानें अपार । भाग्या पार नाहीं तिच्या ॥ ४० ॥
रत्नमय दंडयुक्त । चामरें जीवरी सदा ढळत ।
मणिमय पादुका रत्नखचित । चरणीं जिच्या सर्वदा ॥ ४१ ॥
विचित्र वसनें दिव्य सुवास । हिरण्मय रत्नपर्यंतक राजस ।
चंद्ररश्मिसम प्रकाश । शय्या जिची अभिनव ॥ ४२ ॥
दिव्याभरणीं संयुक्त । अंगीं सुगंध विराजित ।
गोमहिषीखिल्लारें बहुत । वाजी गज घरीं बहुवस ॥ ४३ ॥
दास दासी अपार । घरीं माता सभाग्य सहोदर ।
जिचें गायन ऐकतां किन्नर । तटस्थ होती कोकिळा ॥ ४४ ॥
जिच्या नृत्याचें कौशल्य देखोन । सकळ नृप डोलविती मान ।
तिचा भोगकाम इच्छून । भूप सभाग्य येती घरा ॥ ४५ ॥
वेश्या असोनि पतिव्रता । नेमिला जो पुरुष तत्त्वतां ।
त्याचा दिवस न सरतां । इंद्रासही वश्य नव्हे ॥ ४६ ॥
परम शिवभक्त विख्यात । दानशील उदार बहुत ।
सोमवार प्रदोषव्रत । शिवरात्र करी नेमेंसीं ॥ ४७ ॥
अन्नछत्र सदा चालवीत । नित्य लक्षत्रिदळें शिव पूजित ।
ब्राह्मणहस्तें अद्भत । अभिषेक करवी शिवासी ॥ ४८ ॥
याचक मनीं जें जें इच्छीत । तें तें महानंदा पुरवीत ।
कोटि लिंगें करवीत । श्रावणमासीं अत्यादरें ॥ ४९ ॥
ऐकभद्रसेना सावधान । कुक्कुट मर्कट पाळिले प्रीतीकरुन ।
त्यांच्या गळां रुद्राक्ष बांधोन । नाचूं शिकविलें कौतुकें ॥ ५० ॥
आपुलें जें कां नृत्यागार । तेथें शिवलिंग स्थापिलें सुंदर ।
कुक्कुट मर्कट त्यासमोर । तेथेंचि बांधी प्रीतीनें ॥ ५१ ॥
करी शिवलीलामृतपुराणश्रवण । तेंही ऐकती दोघेजण । 
सवेंचि महानंदा करी गायन । नृत्य करी शिवापुढें ॥ ५२ ॥
महानंदा त्यांसी सोडून । नृत्य करवी कौतुकेंकरुन ।
त्यांच्या गळां कपाळीं जाण । विभूति चर्ची स्वहस्तें ॥ ५३ ॥
एवं तिच्या संगतीवरुन । त्यांसही घडतसे शिवभजन ।
असो तिचें सत्त्व पाहावया लागोन । सदाशिव पातला ॥ ५४ ॥
सौदागराचा वेष धरिला । महानंदेच्या सदना आला ।
त्याचें स्वरुप देखोनि ते अबला । तन्मय झाली तेधवां ॥ ५५ ॥
पूजा करोनि स्वहस्तकीं । त्यासी बैसविलें रत्नमंचकीं ।
तों पृथ्वीमोलाचें हस्तकीं । कंकण त्याच्या देखिलें ॥ ५६ ॥
देखतां गेली तन्मय होऊन । म्हणे स्वर्गींची वस्तु वाटे पूर्ण ।
विश्र्वकर्म्यानें निर्मिली जाण । मानंवी कर्तृत्व हें नव्हे॥ ५७ ॥
सौदागरें तें काढून । तिच्या हस्तकीं घातलें कंकण । 
येरी होवोनि आनंदघन । नेम करी तयासी ॥ ५८ ॥
पृथ्वीचें मोल हें कंकण । मीहि बत्तीस लक्षणी पद्मिण ।
तीन दिवस संपूर्ण । दासी तुमची झालें मी ॥ ५९ ॥
तयासी तें मानलें । सवेंचि त्यानें दिव्यलिंग काढलें ।
सूर्यप्रभेहूनि आगळें । तेज वर्णिलें नवजाय ॥ ६० ॥
लिंग देखोनि ते वेळीं । महानंदा तन्मय झाली ।
म्हणे जय जय चंद्रमौळी । म्हणोनि वंदी लिंगातें ॥ ६१ ॥
म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी । कोटी कंकणें टाकावी ओवाळूनी ।
सौदागर म्हणे महानंदेलागूनी । लिंग ठेवी जतन हें ॥ ६२ ॥
म्हणे या लिंगापाशीं माझा प्राण । भंगलें कीं गेलें दग्ध होऊन ।
तरी मी अग्निप्रवेश करीन । महाकठीण व्रत माझें ॥ ६३ ॥
येरीनें अवश्य म्हणोन । ठेविलें नृत्यगारीं नेऊन ।
मग दोघे करिती शयन । रत्नखचित मंचकीं ॥ ६४ ॥
तिचें कैसें आहे सत्त्त्व । धैर्य पाहे सदाशिव ।
भक्त तारावया अभिनव । कौतुकचरित्र दाखवी ॥ ६५ ॥
त्याच्या आज्ञेंकरुन । नृत्यशाळेसी लागला अग्न ।
जन धांवों लागले चहूंकडोन । एकचि हांक जाहली ॥ ६६ ॥
तीस सावध करी मदनारी । म्हणे अग्नि लागला ऊठ लवकरी ।
येरी उठली घाबरी । तंव वातात्मज चेतला ॥ ६७ ॥
तैशामाजी उडी घालून । कंठपाश त्यांचे काढून ।
कुक्कुट मर्कट दिधले सोडून । गेले पळोन वनाप्रती ॥ ६८ ॥
नृत्यशाळा भस्म झाली समग्र । मग शांत झाला सप्तकर ।
यावरी पुसे सौदागर । महानंदेप्रति तेधवां ॥ ६९ ॥
माझें दिव्यलिंग आहे कीं जतन । महानंदा घाबरी ऐकोन ।
वक्षःस्थळ घेत बडवून । म्हणे दिव्यलिंग दग्ध झालें ॥ ७० ॥
सौदागर बोले वचन । नेमाचा आजि दुसरा दिन ।
मी आपुला देतों प्राण । लिंगाकारणें तुजवरी ॥ ७१ ॥
मग त्रिचरण चेतविला । आकाशपंथें जाती ज्वाळा ।
सौदागर सिद्ध झाला । समीप आला कुंडाच्या ॥ ७२ ॥
अतिलाघवी उमारंग । जो भक्तजनभवभंग ।
उडी घातली सुवेग । ॐ नमः शिवाय म्हणवुनी ॥ ७३ ॥
ऐसें देखतां महानंदा । बोलाविलें सर्व ब्रह्मवृंदा ।
लुटविली सर्व संपदा । कोशसमवेत सर्वही ॥ ७४ ॥
अश्र्वशाळा गजशाळा संपूर्ण । सर्व संपत्तिसहित करी गृहदान ।
महानंदेनें स्नान करुन । भस्म अंगीं चर्चिलें ॥ ७५ ॥
रुद्राक्ष सर्वांगी लेऊन । हृदयीं चिंतिलें शिवध्यान ।
हर हर शिव म्हणवुन । उडी निःशंक घातली ॥ ७६ ॥
सूर्यबिंब निघे उदयाचळीं । तैसा प्रगटला कपाळमौळी ।
दशभुज पंचवदन चंद्रमौळी । संकटीं पाळी भक्तांतें ॥ ७७ ॥         
माथां जटांचा भार । तृतीयनेत्रीं वैश्र्वानर । 
शिरी झुळझुळ वाहे नीर । भयंकर महाजोगी ॥ ७८ ॥
चंद्रकळा तयाचे शिरीं । नीळकंठ खट्वांगधारी ।
भस्म चर्चिलें शरीरीं । जगचर्म पांघुरला ॥ ७९ ॥
नेसलासे व्याघ्रांबर । गळां मनुष्यमुंडांचें हार ।
सर्वांग वेष्टित फणिवर । दशभुजा मिरवती ॥ ८० ॥
वरचेवरी कंदुक झेलीत । तेवीं दहाभुजा पसरोनी अकस्मात ।
महानंदेसी झेलूनि  धरीत । हृदयकमळीं परमात्मा ॥ ८१ ॥
म्हणें जाहलों मी सुप्रसन्न । महानंदे माग वरदान ।
ती म्हणे हे नगर उद्धरुन । विमानीं बैसवीं दयाळा ॥ ८२ ॥
माताबंधूंसमवेत । महानंदा विमानीं बैसत ।
दिव्यरुप पावोनि त्वरित । नगरासमवेत चालली ॥ ८३ ॥
पावलीं सकळ शिवपदीं । जेथें नाहीं आधिव्याधी ।
क्षुधातृषाविरहित त्रिशुद्धी । भेदबुद्धि कैंची तेथें ॥ ८४ ॥
नाहीं काम क्रोध द्वंद्व दुःख । मद मत्सर नाहीं निःशंक । 
जेथींचें गोड उदक । अमृताहूनि कोटिगुणें ॥ ८५ ॥
जेथें सुरतरुंचीं वनें अपारें । सुरभींचीं बहुत खिल्लारें ।
चिंतामणींचीं धवलागारें । भक्तांकारणें निर्मिलीं ॥ ८६ ॥
जेथें वोसणतां बोलती शिवदास । तें तें मास होय तयांस ।
शिवपद सर्वदा अविनाश । महानंदा तेथें पावली ॥ ८७ ॥
हे कथापरम सुरस । पराशर सांगे भद्रसेनास ।
म्हणे हे कुमर दोघे निःशेष । कुक्कुट मर्कट पूर्वींचे ॥ ८८ ॥
कंठीं रुद्राक्षधारण । भाळीं विभूति चर्चून ।
त्याचि पूर्वपुण्येंकरुन । सुधर्म तारक उपजले ॥ ८९ ॥
हे पुढें राज्य करतील निर्दोष । बत्तीसलक्षणीं डोळस ।
शिवभजनीं लाविती बहुतांस । उद्धरितील तुम्हांतें ॥ ९० ॥
अमात्यसहित भद्रसेन । गुरुसी घाली लोटांगण ।
म्हणे इतुकेन मी धन्य । सुपुत्र उदरीं जन्मले ॥ ९१ ॥
भद्रसेन बोलत पुढती । हे राज्य किती वर्षें करिती ।
आयुष्याप्रमाण किती । सांगा यथार्थ गुरुवर्या ॥ ९२ ॥
बहुत करितां नवस । एवढाचि पुत्र आम्हांस ।
परम प्रियकर राजस । प्राणांहूनि आवडे बहु ॥ ९३ ॥
तुमच्या आगमनेंकरुन । स्वामी मज समाधान ।
तरी या पुत्रांचें आयुष्यप्रमाण । सांगा स्वामी मज तत्त्वतां ॥ ९४ ॥
ऋषि मी सत्य बोलेन देख । परी तुम्हांसी ऐकता वाटेल दुःख ।
हे सभा सकळीक । दुःखार्णवीं पडेल पैं ॥ ९५ ॥
प्रत्ययसदृश बोलावें वचन । ना तरी आंगास येतें मूर्खपण ।
तुम्हां वाटेल विषाहून । विशेष ऐसी ते गोष्टी ॥ ९६ ॥
भद्रसेन म्हणे सत्य वचन । बोलावया न करावा अनमान ।
तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण । झालीं असतां जाणपां ॥ ९७ ॥
आजपासोनि सातवे दिवशीं । मृत्यु पावेल या समयासी ।
राव ऐकतां धरणीसी । मूर्छा येऊनि पडियेला ॥ ९८ ॥
अमात्यासहित त्या स्थानीं । दुःखाग्नींत गेले आहाळोनी ।
अंतःपुरीं सकळ कामिनी । आकांत करिती आक्रोशें ॥ ९९ ॥
करुनियां हाहाकार । वक्षःस्थळ पिटी नृपवर ।
मग रायासी पराशर । सावध करोनि गोष्ट सांगे ॥ १०० ॥
नृपश्रेष्ठा न सोडीं धीर । ऐक एक सांगतों विचार ।
जें पंचभूतें नव्हतीं समग्र । शशिमित्र नव्हते तैं ॥ १०१ ॥
नव्हता मायामय विकाार । केवळ ब्रह्ममय साचार ।
तेथें झालें स्फुरणजागर । अहं ब्रह्म म्हणोनियां ॥ १०२ ॥
तें ध्वनि माया सत्य । तेथोनि जाहलें महत्तत्त्व ।
मगत्रिविध अहंकार होत । शिवइच्छेंकरुनियां ॥ १०३ ॥
सत्त्वांशें निर्मिला पीतवसन । रजांशें सृष्टिकर्ता द्रुहिण ।
तमांशें रुद्र परिपूर्ण । सर्गस्थित्यंत करविता ॥ १०४ ॥
विधीसी म्हणे सृष्टि रचीं पूर्ण । येरु म्हणे मज नाहीं ज्ञान ।
मग शिवें तयालागून । चारी वेद उपदेशिले ॥ १०५ ॥
चहूं वेदांचें सार पूर्ण । तो हा रुद्राध्याय परम पावन ।
त्याहूनि विशेष गुह्य ज्ञान । भुवनत्रयीं असेना ॥ १०६ ॥
बहुत करीं हा जतन । त्याहूनि आणिक थोर नाहीं साधन ।
हा रुद्राध्याय शिवरुप म्हणून । श्रीशंकर स्वयें बोले ॥ १०७ ॥
जे रुद्राध्याय ऐकती पढती । त्यांच्या दर्शनें जीव उद्धरती ।
मग कमलोद्भव एकांतीं । सप्तपुत्रां सांगे रुद्र हा ॥ १०८ ॥
मग सांप्रदायें ऋषीपासोन । भूतलीं आला अध्याय जाण ।
थोर जप तप ज्ञान । त्याहूनि अन्य नसेचि ॥ १०९ ॥
जो हा अध्याय जपे संपूर्ण । त्याचेनि दर्शनें तीर्थें पावन ।
स्वर्गींचे देव दर्शन । त्याचे घेऊं इच्छिती ॥ ११० ॥
जप तप शिवार्चन । याहूनि थोर नाहीं जाण ।
रुद्रमहिमा अगाध पूर्ण । किती म्हणोनि वर्णावा ॥ १११ ॥
रुद्रमहिमा वाढला फार । ओस पडिलें भानुपुत्रनगर ।
पाश सोडोनि यमकिंकर । रिते हिंडो लागले ॥ ११२ ॥
मग यमें विधिलागी पुसोन । अभक्तिकृत्या निर्मिली दारुण ।
तिणें कुतर्कवादी भेदी लक्षून । त्यांच्या हृदयीं संचरली ॥ ११३ ॥
त्यांसी मत्सर वाढविला विशेष । वाटे करावा शिवद्वेष ।
तेणें ते जावोनि यमपुरीस । महानरकीं पडलें सदा ॥ ११४ ॥
यम सांगे दूतांप्रती । शिवद्वेषी जेपापमती । 
ते अल्पायुषी होती । नाना रीतीं जाचणी करा ॥ ११५ ॥
शिव थोत विष्णु लहान । हरि विशेष हर गौण ।
ऐसें म्हणतीजे त्यालागून । आणोनि नरकीं घालावे ॥ ११६ ॥        
रुद्राध्याय नावडे ज्यांसी । कुंभीपाकीं घालावें त्यांसी ।
रुद्रानुष्ठानें आयुष्यासी । वृद्धि होय निर्धारें ॥ ११७ ॥
याकरितां भद्रसेना अवधारीं । अयुत रुद्रावर्तनें करीं ।
शिवावरी अभिषेकधार धरीं । मृत्यु दूरी होय साच ॥ ११८ ॥
अथवा शतघट स्थापून । दिव्यवृक्षांचे पल्लव आणून ।
रुद्रें उदक अभिमंत्रून । अभिषिंचन पुत्रा करीं ॥ ११९ ॥
नित्य दहा सहस्र आवर्तनें पूर्ण । क्षोणीपाळा करीं सप्तदिन ।
रायें धरिलें दृढ चरण । सद्गद होवोनि बोलत ॥ १२० ॥
सकळऋषिरत्नमंडितपदक । स्वामी तूं त्यांत मुख्य नायक ।
काळ मृत्यु भय शोक । गुरु रक्षी त्यांपासूनि ॥ १२१ ॥
तरी त्वां आचार्यत्व करावें पूर्ण । तुजसवें जे आहेत ब्राह्मण ।
आणीक सांगती ते बोलावून । आतांचि आणितों आरंभी ॥ १२२ ॥
मग सहस्र विप्र बोलावून । ज्यांची रु्रानुष्ठानीं भक्ति पूर्ण ।
न्यासध्यानयुक्त पढून । गुरुपासून जे आले ॥ १२३ ॥
परदारा आणि परधन । ज्यांसी वमनाहूनि नीच पूर्ण ।
विरक्त सुशील गेलिया प्राण । दुष्ट प्रतिग्रह न घेती ॥ १२४ ॥
जे शापानुग्रहसमर्थ । सामर्थ्यें चालों न देती मित्ररथ ।
किंवा साक्षात उमानाथ । पुढें आणोनि उभा करिती ॥ १२५ ॥
ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण । बैसला व्यासपिता घेऊन ।
सहस्र घट मांडून । अभिमंत्रोनि स्थापिले ॥ १२६ ॥
स्वर्धुनीचें सलिल भरलें पूर्ण । त्यांत आम्रपल्लव घालून ।
रुद्रघोषें गर्जिन्नले ब्राह्मण । अनुष्ठान दिव्य मांडिलें ॥ १२७ ॥
शास्त्रसंख्या झाले दिवस । सातवे दिवशीं मध्यान्हीं आला चंडांश ।
मृत्युसमय येतां धरणीस । बाळ मूर्छित पडियेला ॥ १२८ ॥
एक मूहूर्त निचेष्टित । चलनवलन राहिलें समस्त ।
परम घाबरला नृपनाथ । गुरु देत नाभीकारा ॥ १२९ ॥
रुद्रोदक शिंपून । सावध केला राजनंदन ।
त्यासी पुसती वर्तमान । वर्तलें तेंचि सांगत ॥ १३० ॥
एक काळपुरुष भयानक थोर । ऊर्ध्व जटा कपाळीं शेंदूर ।
विक्राळ दाढा भयंकर । नेत्र खदिरांगारासारखें ॥ १३१ ॥
तो मज घेऊनि जात असतां । चौघे पुरुष धांवोनि आले तत्त्वतां ।
पंचवदन दशभुज त्यांची साम्यता । कमळ भवांडीं दुजी नसे ॥ १३२ ॥
ते तेजें जैसे गभस्ती । दिगंततम संहारिती ।
भस्म अंगीं व्याघ्रांबर दिसती । दश हस्तीं आयुधें ॥ १३३ ॥
ते महाराज येऊन । मज सोडविलें तोडोनि बंधन ।
त्या काळपुरुषासी धरुन । करीत ताडन गेले ते ॥ १३४ ॥
ऐसें पुत्रमुखींचें ऐकतां उत्तर । भद्रसेन करी जयजयकार ।
ब्राह्मणांसी घाली नमस्कार । आनंदाश्रु नेत्रीं आले ॥ १३५ ॥
अंगीं रोमांच दाटले । मग विप्र चरणीं गडबडां लोळे ।
शिवनाम गर्जत तये वेळे । देव सुमनें वर्षती ॥ १३६ ॥
अनेक वाद्यांचे गजर । डंका गर्जे अवघ्यांत थोर ।
मुखद्वयांची महासुस्वर । मृदंगवाद्यें गर्जती ॥ १३७ ॥
अनेक वाद्यांचे गजर । शिवलीला गाती अपार । 
श्रृंगेंभृंगे काहाळ थोर । सनया अपार वाजती ॥ १३८ ॥
चंद्रानना धडकत भेरी । नाद न माये नभोदरीं । 
असो भद्सेन यावरी । विधियुक्त होम करीतसे ॥ १३९ ॥
षड्रस अन्नें शोभिवंत । अलंकार दिव्य वस्त्रें देत ।
अमोलिक वस्तु अद्भुत । आणोनि अर्पीं ब्राह्मणांसी ॥ १४० ॥
दक्षिणेलागी भांडारें । मुक्त केली राजेंद्रें ।
म्हणे आवडे तितुके भरा एकसरें । मागें पुढें पाहूं नका ॥ १४१ ॥
सर्व याचक केले तृप्त । पुरे पुरे हेचि ऐकिली मात । 
धनभार झाला बहुत । म्हणोनि सांडिती ठायीं ठायीं ॥ १४२ ॥
ब्राह्मण देती मंत्राक्षता । विजय कल्याण हो तुझिया सुता ।
ऐसा अति आनंद होत असतां । तों अद्भुत वर्तलें ॥ १४३ ॥
वसंत येत सुगंधवनीं । कीं काशीक्षेत्रावरी स्वर्धुनी ।
कीं श्र्वेतोत्पलें मृडानी । रमण लिंग अर्चिलें ॥ १४४ ॥
कीं निर्दैवासी सांपडे चिंतामणी । कीं क्षुधितापुढें क्षीराब्धि ये धांवूनी ।
तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणीं । नारदमुनी पातला ॥ १४५ ॥
वाल्मीक सत्यवतीनंदन । औत्तान पादीकयाधुहृददयरत्न ।
हे शिष्य ज्याचे त्रिभुवनीं जाण । वंद्य जे कां सर्वांतें ॥ १४६ ॥
जो चतुःष्ठिकळाप्रवीण  निर्मळ । चतुर्दशविद्या करतळामळ ।
ज्याचें स्वरुप पाहतां केवळ । नारायण दुसरा कीं ॥ १४७ ॥
हें कमळभवांड मोडोनी । पुनः सृष्टि करणार मागुतेनी ।
अन्याय विलोकितां नगनीं । दंडें ताडील शक्रादिकां ॥ १४८ ॥
तों नारद देखोनि तेचि क्षणीं । कुंडांतूनि मूर्तिमंत निघे अग्नी ।
दक्षिणाग्नि गार्हपत्य आहवनी । उभे ठाकले देखतां ॥ १४९ ॥
पराशरादि सकळ ब्राह्मण ।  प्रधानासहित भद्रसेन । 
धांवोनि धरिती चरण । ब्रह्मानंदें उचंबळले ॥ १५० ॥
दिव्य गंध दिव्य सुमनीं । षोडशोपचारें पूजिला नारदमुनी ।
राव उभा ठाकें कर जोडोनी । म्हणे स्वामी अंर्तीदिव्यद्रष्टा तूं ॥ १५१ ॥
त्रिभुवनीं गमन तुझें सर्व । कांहीं देखिलें सां अपूर्व ।
नारद म्हणे मार्गीं येतां शिव- । दूत चौघे देखिले ॥ १५२ ॥
दशभुज पंचवदन । तिहीं मृत्यु नेला बांधोन ।
तुझ्या पुत्राचें चुकविलें मरण । रुद्रानुष्ठानें धन्य केलें ॥ १५३ ॥
तव पुत्ररक्षणार्थ ते वेळां । शिवें वीरभद्र मुख्य पाठविला ।
मज देखतां मृत्युसी पुसूं लागला । शिवसुत ऐका तें ॥ १५४ ॥
तूं कोणाच्या आज्ञेवरुन । आणीत होतासी भद्रसेननंदन ।
त्यासी दहा सहस्र वर्षें पूर्ण । आयुष्य असे निश्र्चयें ॥ १५५ ॥
तो सार्वभौम होईल तत्त्वतां । रुद्रमहिमा तुज ठाऊक असतां ।
शिवमर्यादा उल्लंघूनि तत्त्वतां । कैसा आणीत होतासी ॥ १५६ ॥
मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन । पत्रिका पाहिली वाचून ।
तव द्वादशवर्षीं मृत्युचिन्ह । गंडांतर थोर होतें ॥ १५७ ॥
तें महत्पुण्यें निरसूनि सहज । दहा सहस्र वर्षें करावें राज्य ।
मग तो सूर्यनंदन महाराज । स्वापराधें कष्टीं बहू ॥ १५८ ॥
मग उभा ठाकूनि कृतांत । कर जोडोनि स्तवन करीत ।
हे अपर्णाधव हिमनगजामात । अपराध न कळतां घडला हा ॥ १५९ ॥
ऐसें नारदें सांगतां ते क्षणीं । रायें पायांवरी घातली लोळणी ।
आणीक सहस्र रुद्र करुनी । महोत्साह करीतसे ॥ १६० ॥
शतरुद्र करितां निःशेष । शतायुषी होय तो पुरुष । 
हा अध्याय पढतां निर्दोष । तो शिवरुप याचि देहीं ॥ १६१ ॥
तो येथेंचि झाला मुक्त । त्याच्या तीर्थें तरती बहुत ।
असो यावरी ब्रह्मसुत । अंतर्धान पावला ॥ १६२ ॥
आनंदमय शक्तिनंदन । रायें शतपद्म धन देऊन ।
तोषविला गुरु संपूर्ण । ऋषिंसहित जाता झाला ॥ १६३ ॥
हें भद्रसेन आख्यान जें पढती । त्यांसी होय आयुष्य संतती ।
त्यांसी काळ न बाधे अंतीं । वंदोनि नेती शिवपदा ॥ १६४ ॥
दशशत कपिलादन । ऐकतां पडतां घडे पुण्य ।
केलें असेल अभक्ष्यभक्षण । सुरापान ब्रह्महत्या ॥ १६५ ॥
एवं महापापपर्वत तत्त्वतां । भस्म होती श्रवण करितां ।
हा अध्याय त्रिकाळ वाचितां । गंडांतरें दूर होती ॥ १६६ ॥
यावरी कलियुगीं निःशेष । शिवकीर्तनाचा महिमा विशेष ।
आयुष्यहीन लोकांस । अनुष्ठान हेंचि निर्धारें ॥ १६७ ॥
मग तो राव भद्रसेन । सुधर्म पुत्रासी राज्य देऊन ।
युवराज्य तारकालागून । देता झाला ते काळीं ॥ १६८ ॥
मग प्रधानासमवेत राव जाणा । जाता झाला तपोवना ।
शिवअनुष्ठान रुद्राध्याना । करितां महारुद्र तोषला ॥ १६९ ॥
विमानीं बैसवूनि त्वरित । राव प्रधान नेलें मिरवित ।
विधिलोकीं वैकुंठीं वास बहुत । स्वेच्छेंकरुनि राहिले ॥ १७० ॥
शेवटीं शिवपदासी पावून । राहिले शिवरुप होऊन ।
हा अकरावा अध्यय जाण । स्वरुप एकादश रुद्रांचें ॥ १७१ ॥
हा अध्याय करितां श्रवण । एकादश रुद्रां समाधान ।
कीं हा कल्पद्रुम संपूर्ण । इच्छिलें फळ देणार ॥ १७२ ॥
मृत्युंजयजप रुद्रानुष्ठान । त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न ।
पिशाचबाधा रोग दारुण । न बाधीच सर्वथाही ॥ १७३ ॥
येथें जो मानील अविश्र्वास । तो होईल अल्पायुषी तामस ।
हें निंदी तो चांडाळ निःशेष । त्याचा विटाळ न व्हावा ॥ १७४ ॥
त्यासी प्रसवोनि वांझ झाली माता । त्याची संगती न धरावी तत्त्वतां ।
त्यासी संभाषण करितां । महापातक जाणिजे ॥ १७५ ॥
ते आपुल्या गृहासी न आणावे । आपण त्यांच्या सदनासी न जावें । 
ते त्यजावे जीवेंभावें । जेवीं सुशील हिंसकगृह ॥ १७६ ॥
जो प्रत्यक्ष भक्षितो विष । जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस ।
त्यांसी मृत्यु आला या गोष्टीस । संदेह कांहीं असेना ॥ १७७ ॥
असों सर्वभावें निश्र्चित । अखंड पहावें शिवलीलामृत ।
हें न तरी त्वरित । हा अध्याय तरी वाचावा ॥ १७८ ॥
या अध्यायाचें करितां अनुष्ठान । तयासी नित्य रुद्र केल्याचें पुण्य ।
त्याचे घरीं अनुदिन । ब्रह्मानंद प्रगटेल ॥ १७९ ॥
अपर्णाहृदयाब्जमिलिंद । श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद । 
जो जगदानंदमूळकंद । अभंग न विटे कालत्रयीं ॥ १८० ॥   
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । 
परिसोत सज्जन अखंड । एकादशाध्याय गोड हा ॥ १८१ ॥
॥ इति एकादशोऽध्यायः संपूर्णः ॥ 
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
ShriShivLilamrut Adhyay 11
श्रीशिवलिलामृत अध्याय अकरावा

Friday, May 14, 2021

गुरु पादुका स्तोत्रम् – मराठी अर्थ सहित

आदि शंकराचार्य विरचित गुरु पादुका स्तोत्रम् – मराठी अर्थ सहित 

 

अनन्त संसार समुद्रतार नौकायिताभ्यां गुरुभक्तिदाभ्याम् |
वैराग्यसाम्राज्यदपूजनाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् 
 १ 

जन्म मरणाच्या संसारच्या फेऱ्यातून पार करण्यासाठी नौका बनवून येणाऱ्या, गुरु भक्ती वाढविणाऱ्या आणि वैराग्य रूपी समृद्धी / राज्य देणाऱ्या , माझ्या प्रिय सदगुरन्च्या पूजनीय अशा पादुकांना मी वारंवार शरण येऊन नमस्कार करतो.

 

कवित्व वाराशि निशाकराभ्यां दौर्भाग्यदावां बुदमालिकाभ्याम् |
दूरिकृतानम्र विपत्ततिभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् 
 २ 

दुर्दैवाच्या आगीला पाऊस बनून बरसून ती आग विजवणाऱ्या आणि असे करून श्री सद्गुरूना शरण जाणाऱ्यांचे विविध समस्या दूर करणाऱ्या आणि ज्ञानरूपी सागराला पौर्णिमेच्या चंद्रा प्रमाणे प्रेरित करणाऱ्या, माझ्या प्रिय सदगुरन्च्या पूजनीय अशा पादुकांना मी वारंवार शरण येऊन नमस्कार करतो.

 

नता ययोः श्रीपतितां समीयुः कदाचिदप्याशु दरिद्रवर्याः |
मूकाश्र्च वाचस्पतितां हि ताभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् 
 ३ 

जे श्री सदगुरूंच्या पादुकांनसमोर शरण जातात, ते सर्व श्रीमंत होतात, इतके की ते अत्यंत दारिद्राच्या दलदलीत अडकले असेल तरीही त्यांची त्यातून सुटका होते, ते श्रीमंत होतात. ह्यांच्या दर्शनाने मुका व्यक्ति एक उत्तम वक्ता होतो, अशा माझ्या प्रिय सदगुरन्च्या पूजनीय अशा पादुकांना मी वारंवार शरण येऊन नमस्कार करतो.

 

नालीकनीकाश पदाहृताभ्यां नाना विमोहादि निवारिकाभ्यां |
नमज्जनाभीष्टततिप्रदाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् 
 ४ 

अज्ञानातून निर्माण होणाऱ्या विविध इच्छा नष्ट करणाऱ्या आणि सद भावनेतून शरण आल्यास आपल्या शिष्याच्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या अशा, कमळाप्रमाणे कोमल असे गुरूंचे पद नेणाऱ्या आणि समृद्धी देणाऱ्या माझ्या प्रिय सदगुरन्च्या पूजनीय अशा पादुकांना मी वारंवार शरण येऊन नमस्कार करतो.

 

नृपालि मौलि व्रज रत्नकान्ति सरिद्विराजज्झषकन्यकाभ्यां |
नृपत्वदाभ्यां नतलोकपङ्कते: नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् 
 ५ 

माझ्या प्रिय सदगुरन्च्या पूजनीय अशा पादुकांना मी वारंवार शरण येऊन नमस्कार करतो जे हीऱ्यांच्या तलावात तरुण माशांसारखे चमकत असतात, हे हिरे राजाच्या मुकूटात लावले जातात आणि ते भक्ताला एक सार्वभौम सम्राटाप्रमाणे राज्य देतात.

 

पापान्धकारार्क परम्पराभ्यां तापत्रयाहीन्द्र खगेश्र्वराभ्यां |
जाड्याब्धि संशोषण वाडवाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् 
 ६ 

ह्या पादुका पापरूपी अंधकार नष्ट करणाऱ्या सूर्यमालिके सारखे आहेत. ते  भक्ताच्या त्रिस्तरीय कष्ट (दैहिकदैविक/प्राकृतिकभौतिक) रूपी सापाला , पक्ष्यांचा राज्य, गरुडा  सारखे आहेत, अशा माझ्या प्रिय सदगुरन्च्या पूजनीय अशा पादुकांना मी वारंवार शरण येऊन नमस्कार करतो..

 

शमादिषट्क प्रदवैभवाभ्यां समाधिदान व्रतदीक्षिताभ्यां |
रमाधवान्ध्रिस्थिरभक्तिदाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् 
 ७ 

ह्या पादुका भक्ताला मनात निर्माण होणारे सहा वैभव मिळवून देतात. आणि रमा – माधव (विष्णु लक्ष्मी) यांच्या चरणी चिरकाल भक्तीचे स्थान मिळवून देण्याचे वचन देतात. अशा माझ्या प्रिय सदगुरन्च्या पूजनीय अशा पादुकांना मी वारंवार शरण येऊन नमस्कार करतो.

 

स्वार्चापराणां अखिलेष्टदाभ्यां स्वाहासहायाक्षधुरन्धराभ्यां |
स्वान्ताच्छभावप्रदपूजनाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् 
 ८ 
जे भक्त सदैव परोपकार सेवा करण्यास सदैव तयार असतात अशानचे सर्व मनोकामना ह्या पादुका सदैव पूर्ण करतात. ते प्रत्यक्ष तीन नेत्र असणाऱ्या शिव इतकेच श्रेष्ठ आहेत. ज्या पादुकांचे पूजन केल्यास आत्मा आणि स्वतःव एक होतात,  अशा माझ्या प्रिय सदगुरन्च्या पूजनीय अशा पादुकांना मी वारंवार शरण येऊन नमस्कार करतो.

 

कामादिसर्प व्रजगारुडाभ्यां विवेकवैराग्य निधिप्रदाभ्यां |
बोधप्रदाभ्यां दृतमोक्षदाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् 
 ९ 

सर्प रूपी काम आणि मोहाला गरुड प्रमाणे असणाऱ्या, वैराग्य आणि विवेक-भावाचे वैभवशाली प्रदान करणारे, आणि असे करून तात्काळ मोक्ष प्रदान करू शकणारे ज्ञानाची जाणीव करून देणाऱ्या माझ्या प्रिय सदगुरन्च्या पूजनीय अशा पादुकांना मी वारंवार शरण येऊन नमस्कार करतो..

आनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी

श्री स्वामी समर्थ महाराज की जय, 

अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त  

*श्री स्वामी चरणारपानमास्तू*

Monday, March 8, 2021

#ध्यानानुभव ते ज्ञानानुभव १

#ध्यानानुभव
आज श्रीसद्गुरूंची मानसपूजा झाली आणि त्यांच्या पायावर डोके ठेवले, तो चरणस्पर्श, नुकताच त्यांच्या पावलांना लावलेला चंदनलेप,त्याचा सुगंध अनुभवत होतो, त्यावेळी श्रीसद्गुरूंनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यावा असे मनापासून वाटतं होते, लगेच श्रीसद्गुरूंचा आवाज कानी पडला, सद्गुरू त्रिसूत्री माहिती आहे ना,? मग त्यानुसार श्रीसद्गुरूंची इच्छा असेल तर ते डोक्यावर हात ठेवतील, नाहीतर नाही ठेवतील ,असाही श्रीसद्गुरूंचा अदृश्य हात प्रत्येक साधकाच्या डोक्यावर असतोच, त्यामुळे अपेक्षा का करतोस ? हे हवे ,ते हवे याच आशा अपेक्षा तुम्हाला प्रपंचाच्या दलदलीत घेऊन जातात ,तिकडे तुम्ही हात पाय मारता पण उलट त्यात अजुन फसत जाता. गजेंद्रमोक्ष कथा माहिती आहे ना? त्यावेळी त्या हत्तीने आर्ततेने हाक मारली आणि भगवंतानी त्याची मगरीच्या तोंडातून व दलदलीतून सुटका केली.आताही तुम्ही प्रपंचाच्या दलदलीत फसत जात आहातच, हात पाय मारताय पण अजून रुतत जाता ,अश्यावेळी दोन अवयव यापासून अलिप्त आहेत ते म्हणजे यांचे मन व तुमचे तोंड. मग यांचाच वापर करून श्रीसद्गुरू दलदलीतून बाहेर यायचा उपाय सांगतात ते म्हणजे श्रीसद्गुरूचरणी मनाचे समर्पण व श्रीसद्गुरूंनी दिलेले नाम स्मरण जास्तीत जास्त केले की जसे दलदलीतून काढायला फायर ब्रिगेडची क्रेन येते व तुम्हाला अलगद बाहेर काढते तसाच श्रीसद्गुरूंचा आशीर्वाद व मार्गदर्शन लाभते व त्या क्रेनच्या साहाय्याने तुम्ही त्या दलदलीतून बाहेर येताही.
        आता प्रश्न पडतो एकदा अनुभव आलाय ,प्रपंचाची दलदल रुतवून ठेवते आणि ती संकटात टाकते तरीही माणूस त्याच दलदलीत असलेली आकर्षक कमळे बघून पुन्हा त्या दलदलीत जायला वळतो ,ही आकर्षित करणारी कमळे म्हणजेच माया आहे, या मायेच्या मोहात तुम्ही पुन्हा तिकडे जाता आणि पुन्हा त्याच दलदलीत फसता. आता यावर उपाय काही नाही का? तर निश्चितच आहे ,माझे घर तळ्याशेजारी आहे तर ती दलदल तर मी नाहीशी करू शकत नाही ,पण प्रपंचातील नित्य काम करत असताना अनेकदा मोह होईल ,इच्छा होईल व ती आकर्षक कमळे खुणवायला लागतील त्या त्यावेळी माझे श्रीसद्गुरू बघत आहेत ,माझ्यावर लक्ष ठेऊन आहेत हे भाव पक्का हवा. श्रीसद्गुरूंनी अनेकदा हे ठोकताळे सुद्धा दिले आहेत की तू अमुक काम करताना तुला मी अमुक वेशात भेटलो किंवा सावध केले ,म्हणजेच श्रीसद्गुरू प्रत्येक क्षणी बघत आहेत ,नजर ठेवून आहेत असा विचार केला की मग आपोआप आपल्या मनाला आपण कायम जागृत ठेऊ, श्रीसद्गुरूंच्या आठवणीत आपला प्रत्येक विचार मनातून परावर्तित होईल आणि मग आपले नित्यकर्म चोख पार पडेल ,त्यातील इच्छा आकांशा ,लोभ ,मोह ,माया यातून थोडे का होईना आपण अलिप्त व्हायला लागू. सर्व या विकारांवर श्रीसद्गुरू काकामहाराज यांनी दिलेले एकच औषध लागू पडते आणि ते म्हणजे श्रीसद्गुरू माझी प्रत्येक लहानातील लहान कृती बघत आहेत. आणि मग जर त्यांची माझ्यावर दृष्टी आहे तर मग
श्रीसद्गुरू काकासाई ,कृपादृष्टी मजकडे पाही,
तुजविण आश्रय नाही,तुजविण आश्रय नाही,
जगतामाजी या जिवां
-- निलेश जोशी

Sunday, June 7, 2020

अजय व अतुल यांची बेस्ट songs

#निलउवाच
आज खुप दिवसांनी गाणी ऐकायचे ठरवले आणि amazon prime music वर समोर आली ती अजय व अतुल यांची बेस्ट songs प्लेलिस्ट
मग काय कानात हेडफोन घालून ऐकायला सुरुवात केली. ऐकलेली गाणीच होती तरीही प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सापडत होत.
आज अजय अतुल संगीतशैली बद्दल थोडं बोलायचं धाडस करतो ,कारण मी काही संगीतातील तज्ञ नाही फक्त ठेका धरायला लावते ते गाणे आवडते ,हा निकष लावला तर सर्वच अजय अतुल गाणी सर्वोत्तम वाटायला लागतात.
आज ऐकलेल्या 30 गाण्यात नटरंग ,जोगवा ,सैराट ,धडक ,अग्निपथ ,सुपर30 ,झिरो, सिंगम ,जाऊ द्या ना बाळासाहेब,पि के ,लय भारी ,पानिपत आणि नीलकंठ मास्तर मधील गाणी होती. आता वरील चित्रपटाची नावे वाचूनच साधारण कल्पना आली असेल की किती दमदार गाणी असतील. त्यांनतर ऐकताना lyrics पण वाचताना मजा येत होती ,Amazon prime music वर x-ray lyrics म्हणून सर्व गाण्याचे बोल येतात आणि ते ऐकताना वाचत अजून मजा येते, फक्त हे मराठी गाण्यांना नाहीये ,मी लगेच tweet करून विनंती केली आहे पण सर्वानी मराठी गाण्यांना lyrics द्या अशी विनंती करायला हवी.असो,
तर मी बोलत होतो शैलीबद्दल, पारंपरिक बॉलिवूड संगीत म्हटले की एक अंतरा धून असते ,मग पहिला मुखडा व अंतरा आणि त्याच चालीत दुसरा मुखडा ,मग तिसरा असे दळण चालू, तसेच 2 मुखड्यातील संगीतही प्रत्येक मुखड्यात सेमच, म्हणजे समजा एखादे गाणे इन्स्ट्रुमेंटल म्हणून ऐकले तर सगळे मुखडे सेमच वाजवले जातात. आणि इथेच अजय अतुल शैली वेगळी आहे हे जाणवते.त्यांच्या 30 गाण्यात फक्त 2 गाणी अशी सापडली त्यांचा अंतरा ,मधील संगीत ,मुखडा ,पुन्हा संगीत व दुसरा मुखडा अशी मांडणी आहे ,बाकी 28 गाण्यात अंतऱ्याच्या आधी संगीत ,मग अलगद अंतरा चालू होतो ,music pieses वाजतात ,हळुवार वेगळ्याच दुनियेत हरवून टाकतात हे दोघे ,आणि नंतर पुन्हा पहिला मुखडा चालू होतो ,त्यानंतरचे संगीत सुमधुर तरीही वेगळेच आणि अलगद दुसऱ्या मुखड्यापर्यंत पोचवतात हे दोघे. संगीतातील जाण असणारे याबद्दल जास्त चांगले सांगू शकतात पण तरीही एक श्रोता म्हणून हा नाविन्यपूर्ण प्रकार लोकांना आवडतोय ,आणि म्हणूनच त्यांची गाणी सुपरहिट आहेत.दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हिंदीत फक्त सुफी गाण्यांवर भर, भक्तीभावपूर्ण सुफी गाण्यात अल्ला,मौला शब्दांचा भडीमार, पण अजय अतुल यांनी पहिल्यांदा हिंदीत घालीन लोटांगण,देवा श्रीगणेशा पासून मोरया मोरया,गौरी तनयाय धीमही ची भुरळ सर्वाना घातली.मोठे यश आहे हे दोघांचेही, आता भक्ती गीते म्हणजे फक्त उर्दू,हिंदी शब्द नाही तर मराठी ,संस्कृत शब्दही आहेत,हे जगाला सांगितले.एखाद्या गाण्याचा sequel असू शकतो हे त्यांनीच दाखवून दिले(लय भारी मधील माऊली गाणे व त्याचा sequal माऊली चित्रपटातील पंढरीची माय - दोन्ही गाणी लागोपाठ ऐका -एकदम superb व गाण्याचे शब्दही अप्रतिम आहेत)
अजून एक जाणवले ते म्हणजे जवळपास 90% गाण्यात male vocal अजय गोगावले ,काही ठिकाणी अतुल सुद्धा छान गाऊन जातो. अनेक गाणीही त्यांनीच लिहिली आहेत त्यात सैराट ,जाऊ द्या ना बाळासाहेब(या चित्रपटाची निर्मिती त्यांचीच होती) हे प्रमुख चित्रपट. अजून एक साम्य म्हणजे त्या त्या गाण्याच्या वैशिष्ट्यनुसार गायक निवड , स्वतः अजयशिवाय हिंदीत विशाल दादलानी त्यांचा आवडता गायक असावा व बेला शेंडे आवडती गायिका असावी.हिंदीत गीतलेखन अमिताभ भट्टाचार्य कडून लिहून घेतलेली आहेत.एक गाणे तर चक्क उदित नारायण सारख्या अनुभवी गायकाकडून गाऊन घेतले आहे.वाद्यांमध्ये ढोल ताशा ,सिंफनी ,ब्रास मेटल ही विशेष आवडीची आहेत. ते बोलताना उल्लेख करतात की ढोल म्हटले की पंजाबी ठेकाच का?आमचा मराठी ठेका पण खुपच सुंदर आहे आणि म्हणून मुद्दाम आम्ही मराठी पारंपरिक वाद्ये वाजवतो, किती अभिमान आहे या दोघांनाही मराठी असण्याचा,खुपच भारी वाटलं.
सैराट सिंफनी त्यांनी LA मधील SONY स्टुडिओ मध्ये रेकॉर्ड केली जी निव्वळ अफलातून. तिकडे ते नावाजलेले मुझिशिअन सुद्धा अजय अतुल यांची तारीफ करत होते ,म्हणजे काय ग्रेट वर्क घेऊन ते तिकडे गेले आणि त्यांच्याकडून काम काढून घेतले याची कल्पना न केलेली बरी.
दस्तरखुद्द रेहमाननलासुद्धा त्याचा हटके संगीताचा वारसा कोण सांभाळेल असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने अजय अतुल यांचे नाव घेतले, पहिले मराठी चित्रपटाचे संगीतकार ज्यांनी जोगवासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला(त्याआधी 2006 मध्ये अशोक पत्की यांना पुरस्कार मिळालेला आहे पण तो कोकणी चित्रपटासाठी होता) ,ज्या बॉलिवूड मध्ये मराठी माणसाला घाटी म्हटले जाते तिथे अनेक लोक रांगेत आहेत की अजय अतुल संगीत देतील तर बरंय , लवकरच 2021ला शिवाजी trialogy म्हणजे शिवाजी महाराजांवर 3 चित्रपट ज्यात अजय अतुल संगीत आहे ,ते बघायला मिळतील. एकूण संगीतात बाप माणूस म्हणजे आमचे मराठी अजय अतुल.
अर्थात हे माझे निरीक्षण.
खाली प्लेलिस्ट मधील गाण्यांचे स्नॅपशॉट देतोय ,ही गाणी अवश्य ऐका व माझें आवडते संगीतकारअजय अतुल यांच्या जबरदस्त संगीताची मजा घ्या.
आणि हो , मीरा कहे हा त्यांचा अल्बम नक्की ऐका, अप्रतिम रचना आहेत पण फारच कमी लोकांना माहिती असेल,खाली लिंक देतोय.
https://youtu.be/EBBCy5x-9_M
खालील गाणी जरूर ऐका व खाली कमेंटमध्ये अभिप्राय द्या.
Njoy the sound of Ajay Atul
Bring it on Baby.......
-- निलेश जोशी



https://amzn.to/3dKrB2R

Sunday, May 24, 2020

दाढ दुखी व सदगुरु अनुभूती

श्री सद्गुरवे नमः
25 एप्रिल ला माझ्या दाढ दुखीची पोस्ट लिहिली ,त्यात सद्गुरूंनी ,मी चुकीची गोळी घेतली हे सांगितले व त्यांनतर उदी लावायला सांगितली. हा उपाय केल्यावर पूर्णपणे अक्कलदाढ दुखायची थांबली ,ज्या दाढेला सर्जरी आवश्यक असे डॉचे मत तिथे सद्गुरूंनी विज्ञानालाही निरुत्तर केले.
  त्यानंतर 6 दिवसांनी माझ्या अजून 2 दाढा ज्यात कॅव्हिटी होती म्हणून सिमेंट भरले होते,ते निघून आले. आता कॅव्हिटी ओपन झाल्याने अन्नकण अडकणे व दुखणे चालू झाले. 2 दिवस सुसह्य होते पण नंतर मात्र हा त्रास खूपच व्हायला लागला. सद्गुरूंनी शांत केलेली दाढ एकदम निपचित पडून आणि या कॅव्हिटी झालेल्या दाढा मात्र दुखताहेत ,खरंच सद्गुरूंना मनोमन शरण गेलो. त्यादरम्यान फेसबुक ग्रुपवर डेंटिस्ट लोक सांगतील या हिशोबाने घरगुती काही फिलिंग आहे का अशी चौकशी पोस्ट टाकली. त्यावर अनुभूती सदस्य सौ कुमुदताई ढवळेकर यांनी त्यांची मुलगी कामाला आहे त्या डेंटिस्ट चालू आहे असे कळवले ,पत्ता बघितला तर घराजवळच म्हणजे जायला हरकत नाही.तिकडे फोन करून अपॉइंटमेंट घेतली ,थोडक्यात अतिहुषारी दाखवलीच. पण नंतर मनात भीती वाटायला लागली कारण सद्गुरूंनी एकदा कोरोना पासून वाचवले आणि मी डेंटिस्टकडे गेलो तर हा संसर्ग डेंटिस्टकडे पसरण्याची शक्यता जास्त कारण समान टूल्स वापरतात व सॅनिटायझेंशनला मर्यादा आहेत. पुन्हा एकदा श्रीसद्गुरूंना शरण गेलो व घाबरत त्यांना मेसेजच्या माध्यमातून जाऊ का अशी परवानगी मागितली.सद्गुरूंनी मेसेज वाचून फोनच केला व सांगितले की डेंटिस्टकडे जाऊ नकोस ,आता जाणे घातक आहे.कॅव्हिटीवर घरगुती उपाय कापसात लवंग तेल किंवा लसूण ठेचून त्या दातात ठेव ,कीड मरून जाईल व दुखणेही बंद होईल.लवंगतेल जास्त लागले तर तोंड येईल किंवा आतील त्वचा सोलवटेल तीही काळजी घ्यायला सांगितली जय साईराम म्हणून फोन ठेवला एकतर श्रीसद्गुरू बोलले ,दाढ दुखणे थांबणार आहे असेही सांगितले म्हणजे आता काळजीच नाही.
डेंटिस्टकडे न जाण्याची सद्गुरुआज्ञा मिळाली आणि हायसे वाटले ,वाईटही वाटले की माझ्यामुळे सद्गुरूंना त्रास झाला असेल ,पण आपले डॉक्टर ,वैद्य सर्वच काही ब्रम्हांडनायक श्रीसदगुरु काकामहाराज. त्यामुळे क्षणात मनातील किंतु परंतु संपला ,डॉ क्लिनिकला फोन करून अपॉइंटमेंट कॅन्सल करायला सांगितली ,बाहेर जाऊन लवंग तेल आणले ,मेडिकल मधून सर्जिकल कॉटन आणले आणि सद्गुरुस्मरण करून दातात तो तेल लावून बोळा ठेवला.हे सर्व 2 मेला झाले अन त्यानंतर आतापर्यंत कॅव्हिटी असलेल्या दाढा दुखल्याच नाहीत. रोज सद्गुरुनी सांगितलेला उपाय करतोय ,2-3 वेळ थोड्या वेदना झाल्या पण नामासोबत त्याचे दुखणे जाणवलेच नाही.
श्रीसद्गुरू यांनी वेळोवेळां खरंच या लोकडाऊनमध्ये मला तीनवेळा संकटातून बाहेर काढले ,मग ते कोरोना इन्फेक्शन असो की दाढदुखी असो. 
 सूक्ष्मातून कार्य करणाऱ्या श्रीसद्गुरूंना साष्टांग नमस्कार. एकाचवेळी अनेक ठिकाणी अनेकांना मार्गदर्शन आणि तेही एकदम घरगुती उपायांनी. खरंच आपले काहीतरी पुण्यसंचय आहे म्हणून श्रीसद्गुरूचा वरदहस्त डोक्यावर आहे ,तो सदोदित राहावा म्हणून नामाची कास सोडायची नाही.
श्रीसद्गुरुंच्या ऋणात जन्मोजन्मी राहायला आवडेल, त्यांच्या असीम कृपेला साष्टांग नमस्कार
जय साईराम
निलेश जोशी

दाढदुखी व उदीची महती

श्री सद्गुरवे नमः

दाढेचे दुखणे व उदीची महती

श्रीसद्गुरू काकामहाराज अनेक अनुभव देत असतात ,ते अनुभव आयुष्यात आले की वाटते की खरंच श्रीसदगुरू किती सूक्ष्मातून कार्य करत असतात ,सदगुरु सर्वसाक्षी आहेत याचीच मनोमन खात्री पटते.
      काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणू संक्रमण श्रीसद्गुरूंनी आतून आवाज देऊन रोखले,त्यांनतर फोन करून सर्व घटना सविस्तर सांगितली. त्यानंतर सद्गुरुंच्या लीला आणि त्यासमोर आपण केवळ ऋणातच राहू शकतो हे पटले. त्यांनतर अजून 2 अनुभव आले ,त्यातील एक मुलाच्या समर कॅम्प संदर्भात जो नंतर सांगेन . आता जो अनुभव सांगणार आहे तो श्रीसदगुरूंच्या उदीची महती सांगणारा आहे व आजच सकाळी अनुभवायला आला ,आणि पुन्हा एकदा सदगुरुकृपेसमोर नतमस्तक झालो.
     काही महिन्यांपूर्वी माझ्या दाढेच्या सर्जरीवेळी श्रीसदगुरूंनी अवघड काम डॉ ना प्रेरणा देऊन त्यांच्या माध्यमातून सोपे केले. त्यानंतर माझ्या 3 दाढांचे काम चालू होते. डावी अक्कलदाढ जिथे आधी ब्रिज होता तो काढून ती दाढ काढायची होती.डॉ म्हणाले त्या दाढेची दुख कमी झाली की आपण काढू, त्यासाठी औषधे दिली ,दरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊन होणार अशी कुणकुण लागल्यावर डॉ नी फोन करून मला बोलावून घेतले व माझ्या एका दाताची कॅप बसवली व 2 दिवसांनी दाढ काढायला शस्त्रक्रियेसाठी बोलावले. दरम्यान विषाणू संसर्ग पुण्यात वाढला व दोन दिवसांनी अपॉइंटमेंट होती तेव्हा गेल्यावर म्हणाले की दाढ खोल रुतलेली आहे ,त्यामुळे आता सर्जरी केली टाके पडतील आणि जखम ओली असेल तर विषाणू संक्रमण होण्याची शक्यता जास्त ,त्यामुळे सर्जरी लॉक डाऊन संपल्यावर करूया ,तोपर्यंत गोळ्याच चालू ठेवा. मलाही त्यांचे म्हणणे पटले ,मला वाटले लॉकडाऊन 10-20 दिवसांत संपेल व नंतर सर्जरी करता येईल.त्यांनी अँटिबायोटिक गोळी क्लेवम 600 व एक दुखणे अगदीच सहन नाही झाले तर दुखीवर गोळी दिली.श्रीसद्गुरुकृपेने या काळात फक्त 4 वेळ दाढ दुखली व गोळी घ्यावी लागली.पण मागचे 2 दिवस म्हणजे गुरुवार व शुक्रवार रोज संध्याकाळी हमखास दुखायला लागतेच व त्याबरोबर कानही दुखायला लागला.डॉ ना फोन केला तर म्हणाले 3 मे पर्यंत क्लिनिक उघडणारच नाही, शेवटी दुखल्यावर गोळी हा एकच पर्याय होता.अर्थात हा माझा भ्रम होता कारण श्रीसद्गुरू यांच्या कृपेचा विचार आलाच नाही. त्यात भौतिक गोष्टीत सदगुरु एवढे भरभरून देताहेत मग अजून काय मागायचे? असा विचार करून मी दाढ दुखली की गोळी घेऊन नामस्मरण करायचो.आज पहाटे 3 वाजता दाढ प्रचंड दुखायला लागली म्हणून जाग आली ,नेहमीप्रमाणे उठलो व गोळी घेऊन बिछान्यावर पडलो ,तरीही दुखणे काही थांबायला तयार नाही. अर्ध्या तासाने सहन न होऊन मांडी घालून बसलो व श्रीसद्गुरूंना शरण गेलो ,की सदगुरु माझी दाढ दुखतेय म्हणजे तुम्हालाही त्रास होतोच आहे. मला गोळी घेऊनही त्रास थांबत नाहीये,आता तुम्हीच सर्वेसर्वा असे म्हणून डोळे मिटून सद्गुरुस्मरण केले व मानसपूजा केली व मानसपूजेतच श्रीसद्गुरुसमोर बसून जप करायला लागलो.त्यावर फक्त श्रीसद्गुरूंचा आवाज ऐकू आला ,"अरे ,कोणती गोळी घेतलीस? अँटिबायोटिक गोळी घेऊन दुखणे कसे थांबेल? नीट जाऊन बघ ,दुखीवरची गोळी घेतलीच नाहीयेस,तेव्हा आता जाऊन दुखीवरची गोळी घे ,पाणी पी ,नंतर मी दिलेली उदी आहे ती थोडी हातावर घेऊन ,त्या दाढेवर त्याचे आवरण कर ,दाढेचा बाहेरचा भाग कमकुवत झाला आहे ,उदी लावल्यावर ठीक होईल ,मी आहे ,जा, सांगितले तेवढे कर".
   श्रीसद्गुरू यांचा आवाज ऐकून मी उठलो ,जाऊन बघितले तर मी क्लेवम ही अँटिबायोटिक गोळी घेतली होती ,सोबतची दुखीची गोळी नीट प्रेस्क्रिपशन वाचून घेतली व नंतर सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे उदी लावून श्रीसद्गुरूना नमस्कार करून बेडवर पडलो. अक्षरश 4 मिनिटात गाढ झोप लागली आणि त्यांनतर आता 12 तासात ती दाढ दुखलीही नाहीये.आज कोणीही मान्य करेल की गोळी घेऊन 3 मिनिटात वेदना थांबणे अशक्य आहे म्हणजेच ही श्रीसद्गुरूंच्या उदीची महती आहे.श्रीसद्गुरू यांनी पुन्हा एकदा सर्वसाक्षीत्वाची प्रचिती दिली आणि दाढेच्या दुखण्यातून वाचविले. श्रीसदगुरु यांच्या चरणी माफी मागतो कारण त्यांना पुन्हा एकदा त्रास दिला, माझ्याकडून त्यांना अपेक्षित असे नामस्मरण ,चाकोरी पाळली जात नसूनही श्रीसद्गुरूमाऊलीनी कुपेचा वर्षाव केला, सांभाळून घेतले व प्रत्येक संकटाचे निवारण करायची शक्ती व युक्ती प्रदान करते आहे.श्रीसद्गुरू, असाच सदोदित आशिर्वाद राहू दे. त्रास दिलाच आहे त्याबद्दल माफी असावी.
श्रीसद्गुरू काकामहाराज यांच्या चरणी साष्टांग नमस्कार

जय साईराम
सद्गुरुदास निलेश जोशी