Monday, July 1, 2019

श्री सद्गुरू आणि आनंद

श्री सद्गुरवे नमः
ओम श्री साईकाकाय नमः
ओम श्री साईनाथाय नमः

आनंद म्हणजे काय ? बऱ्याचदा आपल्या मनासारख्या गोष्टी झाल्या की आपल्याला आनंद होतो ,पण कित्येकदा त्या आनंददायक गोष्टी नंतर दुःख देणाऱ्या असू शकतात.
काही अनपेक्षित गवसले की दुप्पट आनंद होतो कारण त्यावेळी ती गोष्ट त्याला अपेक्षित नसते. पण माणसाला असाही आनंद मिळतो जेव्हा तो खुश असतो पण नाचू शकत नाही ,व्यक्त करू शकत नाही फक्त आनंदाश्रू ओघळत राहतात डोळ्यातून तासनतास ,तो खरा त्या माणसाने अनुभवलेला आनंद.
श्री सद्गुरू यांनी आपल्याला कृपा छत्राखाली घेतल्याचा आनंद असाच आहे ,अपरिमित आणि अव्यक्त..
श्री सद्गुरू म्हणजेच प्रत्यक्ष भगवंत आणि ते जेव्हा आपल्याला अनुभूती देतात ,काळजी नको मी आहे असे आश्वासन देतात त्यावेळी प्रत्यक्ष देवाच्या आशीर्वादात आपण असतो. सद्गुरू म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर , नित्यपाठात याचा उल्लेख आहेच की आताच्या युुगात जर श्रीराम किंवा हनुुुमान अवतरले तर आपण तेे तेज बघूून गांगरून जाऊ ,म्हणूूूनच सद्गुरु आपल्याला आश्वस्त करायला आले आहेत. ओवी क्रमांक ९८ - "म्हणोनि कालमान पाहोनी ,ईश्वरही झाला सौम्य सुवदनी ,काका स्वरूप आवडोन ,मानववेषी अवतरला.

आज सद्गुरुनी जो निबंध लिहायला सांगितलंय त्याला नित्यपाठतील ओव्या आधार घेऊनच आपण श्री सद्गुरू आणि आनंद हा विषय समजून घेऊया.

नित्यपाठ ओवी क्रमांक १४ "फेडफेडीची ही भाषा , करणे माझी मनाची मूर्खता,तुमच्या उपकारी राहता ,आनंद मजसी वाटतो" 

श्रीसदगुरू या मोहमयी व स्वार्थी जीवनात तुमच्या कृपेने हे जीवनच पालटले आणि आता मनांत विचार येतात की सद्गुरुंचे खूप उपकार आहेत आपल्यावर आणि ते कसे फेडू ,दुसऱ्याच क्षणी तुमच्याच कृपेने मनात विचार येतो की फेडफेडीची ही भाषा म्हणजे निव्वळ व्यवहार आहे आणि हा व्यवहार सदगुरूंना अपेक्षित नाही, त्यापेक्षा त्यांच्या उपकारात जन्मभर राहणे मला मनापासून आवडेल.आणि हे उपकारात आहोत याची जाणीव व्हायला सद्गुरुनी दिलेली चाकोरी सर्व साधकांनी व भक्तांनी मनापासून पाळायला हवी ,आचारायला हवी.ऑटोमोबाईल मेंटेनन्स भाषेमध्ये 3 term वापरल्या जातात , CBM म्हणजे कंडिशन बेस्ड मेंटेनन्स TBM म्हणजे टाइम बेस्ड मेंटेनन्स व IR म्हणजे इंस्पेक्शन व रिपेअर ,ह्याच व्याख्या आपल्याला या भक्तिमार्गात आचारता येतील. आपली पूर्वकर्मे जळून जावीत म्हणून सद्गुरूंनी दिलेली उपासना म्हणजे कंडिशन बेस्ड मेंटेनन्स ,सद्गुरूंनी आखून दिलेली चाकोरी जेणेकरून आपण भक्तिमार्गात राहू ,सदोदित सद्गुरूंचे स्मरण होईल म्हणजेच टाइम बेस्ड मेंटेनन्स व नैमित्तिक साधना सद्गुरू करवून घेतात जसे जप ,हे निबंध लेखन व मंदिरातील सत्संग - भजन हे आपल्यातील जाणीव नेणीव घासून पुसून लख्ख करतात म्हणजेच या गोष्टी इंस्पेक्शन व रिपेअर याचेच काम करतात.

नित्यपाठ ओवी क्रमांक ४१ "पुढे श्रीसाईंचीही कृपा झाली ,तू माझा बंधू ऐसी ओळख दिली ,शिरडीच आनंदनगरी आली ,साईमहिमा वाढविण्या" श्री सद्गुरु राहतात ते ठिकाण शिवकृपा ,आनंदनगर दोन्हीकडे बारकाईने बघितले तर सिंहगड रोड वरील आनंद देणारे नगर असेही आपण म्हणून शकतो.या वास्तूत स्वतः शिवस्वरूप सद्गुरू वास्तव्य करतात.

नित्यपाठ ओवी क्रमांक ६५ , "आपण आनंदी राहावे ,इतरांनाही आनंदी करावे ,कष्टाची भाकर खाऊन राहावे ,एका हरिसी धरुनी"या ओवीतही सद्गुरूंनी बोध दिलेला आणि तोही जसा कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली व जगण्यातील मर्म सांगितले तेच सर्वात सोपे करून सद्गुरू आपल्या सत्संगातून सर्वाना बोध करतात ,की षड्रिपूच्या पार जाण्यासाठी सर्व काही सद्गुरू घडवून आणतात हे सत्य जाणले तर मग आनंदी राहणे सोपे होते व आपोआप आपणसुद्धा सद्गुरूना अपेक्षित तसे वागायला लागतो , त्यासाठीच सद्गुरूंनी सांगितलेली त्रिसूत्री आपण आपल्या मनावर बिंबवायला हवी.

नित्यपाठ ओवी क्रमांक ९२ आहे " तुम्हा उद्धरण्यात मला आनंद ,तुमच्या कल्याणाचाच मला छंद ,तुमचे तोडोनी सर्व बंध ,माझ्यात तुम्हा मेळविन मी " या ओवीतून सद्गुरू साधकांना स्पष्ट सांगतात की अरे मुलांनो ,सद्गुरू यांना आनंद कधी मिळतो तर जेव्हा त्यांचे साधक सर्व बंध तोडून स्वतःमधील सदगुरु तत्वाला जाणायला शिकतील तेव्हा आपोआप श्री सद्गुरूंना अपेक्षित त्यांच्या स्वतःमध्ये साधकांना मेळवायची इच्छा म्हणजे प्रत्येक साधक भगवंत स्वरूप व सद्गुरू स्वरूप होण्याची इच्छा पूर्ण होईल आणि हाच असेल श्री सद्गुरू काकामहाराज यांना मिळालेला सर्वोच्च आनंद.

नित्यपाठ ओव्या व श्री सद्गुरू काकामहाराज यांनी जे विचार माझ्या मनात परावर्तित केले ,त्यांच्याच इच्छेने हा निबंध लिहिला गेला ,जे काही न्यून असेल त्याचा दोष निव्वळ माझ्या विचारातील मळभ असेल ,बाकी सद्गुरू यांनी बोध केलेल्या विचारात व विचार लिहिण्यात काही चूक झाली असल्यास सर्वांनी क्षमा करावी व श्री सद्गुरूंनी मार्गदर्शन करावे ही विनंती.

जय साईराम ,शिवस्वरूप सद्गुरू श्री काकामहाराज की जय ,उमास्वरूप सौ काकुमाऊली की जय,संतश्रेष्ठ श्री गडबोले महाराज की जय.

-निलेश जोशी









Tuesday, May 21, 2019

प्रिय प्रत्युष यांस

10 वर्षांपूर्वी याच दिवशी भेटला
डॉ जवळ येऊन म्हणाल्या मला
अभिनंदन मुलगा झालाय कविताला
त्यावेळी निलुचा बाबा झाला

इवलेसे हात, छोटुसे पाय
आईच्या कुशीत पहुडलेला
एकदम झोपमग्न असलेला
मी घेतलं उचलून तुला आणि
नर्स म्हणाल्या काळजी घ्या

दिवसा कमी झोपायचं
रात्र जागवण्यात पटाईत
आई बाबा सर्वाना त्रास,
देण्याची तुझी खासियत
दंगा जेवताना ,झोपतानाही
करामतीत तुझ्या दंग आम्ही

कार्टून बघत जेवायचं नेहमी
जेवताना आईला उठवायचं नेहमी
दिवाळीत उटणं लावायचं मलाही
कित्ती प्रताप करायचा दिसामाजी
त्यात स्वमग्नता अनुभवलीस तू
अनेक ट्रीटमेंटला सामोरा गेलास तू

आज सद्गुरुकृपेने या सर्वातूनही
सुखरूपपणे बाहेर आला आहेस
इतके दिवस न बोलणारा मात्र तू
सर्वच कसर भरून काढतो आहेस
माझ्या हाताचीही काळजी घेतोस
आईला बर नसतानाही संभाळतोस

पुढे मात्र आता खूप सांभाळायचं आहे
स्वतःला सर्व क्षेत्रात घडवायचं आहे
अभ्यासबरोबरीने माणूस व्हायचं आहे
समाजमन जपत स्वसिद्ध व्हायचं आहे
हट्ट बालपण अनुभवत मजा करायची आहे
आई बाबांना अभिमान असे वागायचे आहे


Saturday, April 20, 2019

सौभाग्यकांक्षीणी मुलीला शुभेच्छा

नवीन मुलीला लग्नाआधी द्यायच्या शुभेच्छा

शांत वाहणारी नदी तू
सागरा मिळण्या चालली,
अल्लड सखी ,मुलगी कुणाची
नवी नाती जोडाया चालली

नवे घर, नवे स्वप्न आता
तुला कवेत घ्यायचे आहे
अवखळपणा विसरुनी सारा
जबाबदारी घ्यायची आहे

नवे क्षितिज पेलताना
कधी ठेच लागेलही
घे भरारी पुन्हा एकदा
जुन्या आठवणी आठवुनी

आसमंत नवे खुणावत आहे
तुला सर्वांच्या शुभेच्छा आहे
बळ द्यायला पाठीशी तुझ्या
आईबाबांचा आशिर्वाद आहे
-- निलेश जोशी

Tuesday, February 19, 2019

बदल - गझल

सीमेवरील सैनिकांनी आता बळी होऊ नये
शस्त्र हातात असूनही अगतिक होऊ नये

माणसांतील राक्षसांनी मांडला उच्छाद हा
देवाने आता शंभर अपराधांची वाट बघू नये

माणसे जगतात जर का दहशतीखाली इथे
त्या तगमगीला चुकूनही कमी लेखू नये

अतिपाण्यात वाहून जातात अनेक संसार इथे
दुष्काळी संसारानी पाण्याअभावी दम तोडू नये

चप्पल चोरली तर पाप गेले ही समजूत आहे
चुकीचे वागणाऱ्या चोराला पुण्यदाता ठरवू नये

मीपणा जोपासत अहं विकसित करतात काही
त्यांनी स्मशानराखेतून शिकायची संधी सोडू नये

बोट करून तोच चुकीचा नित्य म्हणत आलोय
स्वयं बदल घडवून आणण्या मुळी लाजू नये

तर्जनी दाखवून तो चुकतो म्हणणे सोपे असेलही
तर्जनी सोडून तीन बोटे माझ्याकडे हे विसरू नये

-- निलेश जोशी

Saturday, February 9, 2019

अध्यात्म

कशाला चिंता सर्व क्लेशतापाची
त्या जाळण्याची ताकत जपात आहे

जाणून घेऊ माझे चुकले कोठे
त्यासाठीच आत डोकावणे आहे

हे सहा शत्रू परास्त करण्यास
हे मानवा ही शक्ती तुझ्यात आहे

आजचे काम उद्यावरी टाळतो
याचाच शेवट हारण्यात आहे

दर दिवशी दोन पावले चालू
अंती फलित ध्येय पूर्तीत आहे

का अट्टाहास सर्व मलाच हवे
खरे समाधान लोकां देण्यात आहे

"सत्य"सांग साखरेत घोळवून
लोकांना सवय कॅप्सूलची आहे

"मी" एवढा निर्ढावलो आता
मीच बरोबर,खोट इतरात आहे

ओळखपत्रे फोटोसहित माझ्या
फोटोत "मी" फक्त बाह्यरूप आहे

नाहीसे करण्या अवघी ही चिंता
फक्त सामर्थ्य "पांडुरंगात" आहे
              
               ----निलेश जोशी

Wednesday, January 2, 2019

लग्नाचा प्रवास - तुझ्यासोबत

बारा वर्षांपूर्वी आलीस
जीवनात माझ्या
जीवनाला खरा अर्थ
दिलास तू माझ्या

अनेक कडू गोड
हृद्य प्रसंगाची मजा
तुझ्यासंगे अनुभवली
कित्येकदा भोगलीही सजा

अनेकदा वाजलाही
भांडणाचा बँडबाजा
अनेकदा अनुभवलीही
तुझी अबोल्याची सजा

होता चार वर्षांचा बॅड पॅच
तेव्हाही तुझी मजबूत साथ
सर्व संकटावर मात करण्याचा
आत्मविश्वास दृढ केला तू माझा

सहजीवनात तूच माझी राणी
जन्मभर मीच ग तुझा राजा
लग्नाच्या वाढदिवसाच्या
तुला हार्दिक शुभेच्छा

Saturday, December 22, 2018

गझल - भलभलते सांगतेस

तू जन्माची भूल तरीही,
      तू माझ्या जगण्याचे कारण
तुझ्याचसाठी माझ्यापाशी,
      केवळ हे गझलेचे तारण
असेल माझे चुकले तेव्हा,
      तोल जायला नकोच होता
कशास उकरूनी काढतेस तू ,
      नवीन मुद्दे जुनेच भांडण

भलभलते सांगतेस, का उगाच भांडतेस ?
जन्माचे चुकलेले, गणित पुन्हा मांडतेस ।धृ।

रोज फक्त हासतेस , एवढे कसे पुरेल ?
सांग कधी मजसाठी ,चांदण्यात थांबतेस?

क्षणभर थांबून गडे ,मोज जुने ओरखडे
घाव नवे त्यावर तू ,मीठ किती सांडतेस ?

हे कबूल मी चुकलो ,ऐक जरा बाई ग
तेच तेच दळण पुन्हा ,तू कशाला कांडतेस

घरट्यातच रमणारी ,अबला तू पूर्वीची
आता तू जिद्दीने, सागर ओलांडतेस

गझलकार - मधुसूदन नानिवडेकर ,कणकवली